मुंबई : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी(एसएनडीटी) महिला विद्यापीठाचा ७३वा वार्षिक दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह (पाटकर हॉल), चर्चगेट, मुंबई येथे साजरा झाला. या ७३ व्या वार्षिक दीक्षांत समारंभामध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विविध अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्येल्या विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी भूषविले.
दरम्यान, दीक्षांत समारंभामध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्वायत्त महाविद्यालयासहित एकूण १३,७४९ विद्यार्थिनींना १९३ विषयातील पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. एकूण ४३ विद्यार्थिनींना विद्यावाचस्पती पदवी देण्यात आल्या. परीक्षेमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेल्या ७१ विद्यार्थिनींना सुवर्ण पदक, १ विद्यार्थिनींला रजत पदक, १ ट्रॉफी आणि १३३ विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी पदवी आणि पदविका प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पदवीधर विद्यार्थ्यांना नेतृत्व आणि उद्योजकतेच्या मार्गावर जाण्याचे आवाहन केले. उपस्थित सर्वांना संबोधित करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बदलांच्या दिशेने पावले उचलली आहेत आणि या धोरणाचा मुख्य उद्देश शैक्षणिक क्षेत्रात समानता, गुणवत्ता आणि संवर्धन हे आहे असे प्रतिपादन केले.
२१ व्या शतकात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजात त्यांच्या सक्षमीकरणासाठी हे महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. विद्यापीठाने महिलांची शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय प्रगती करून त्यांना समाजात समानतेची व सन्मानाची जाणीव करून दिली आहे आणि महिलांच्या आवडीनुसार अधिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठ समर्पित असून विद्यापीठ विकसित भारत @ २०४७ मिशनला चालना देत आहे हे अधोरेखित केले. एसएनडीटी महिला विद्यापीठामार्फत आदिवासी आणि ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक वंचित प्रवर्गातील विद्यार्थिनींन कडे लक्ष्य केंद्रित करून तांत्रिक व व्यवसाईक कौशल्य विकसीत करण्याच्या सूचना दिल्या.
एनईपी स्कूल कनेक्ट उपक्रमांतर्गत विद्यापीठाने ५००० शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१३-१४ ते २०२१-२२ पर्यंतची पदवी डिप्लोमा प्रमाणपत्रे डिजी-लॉकरवर अपलोड केली असून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची पदवी आणि पदविका प्रमाणपत्रे दीक्षांत समारोहानंतर एका तासात डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थिनींना उपलब्ध होतील हे जाहीर केले.
डॉ. संजय नेरकर, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी परितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थिनींच्या नावाची उद्धघोषणा केली. व्यासपीठावर उपस्थित महामहीम राज्यपाल श्री. रमेश बैस जी, मा. कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू, प्रा. रुबी ओझा, कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर, वित्त व लेखा अधिकारी, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य आणि विद्वत परिषद सदस्य यांच्या हस्ते गुणवंत विद्यर्थिनींना सन्मानित करण्यात आले.