- पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांचे निर्देश; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
20-May-2025
Total Views |
मुंबई: ( Road concreting stopped in Mumbai suburbs ashish shelar ) मुंबई उपनगरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे मंगळवार, दि. 20 मे रोजीपासून कोणतेही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करू नये, तसेच दि. 31 मे रोजीपर्यंत रस्ते वाहतूक सुरळीत करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी पालिका अधिकार्यांना दिले.
अॅड. शेलार यांनी सोमवार, दि. 19 मे रोजी तिसर्यांदा मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी कामे अपूर्णावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. वांद्रे पश्चिम येथील 14व्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहे. कांदिवली येथील न्यू लिंक रोड आणि डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशन परिसरातील रस्त्यांचे अपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिले.
“मालाड पूर्व येथील गोविंदभाई श्रॉफ रोड ते एस. व्ही. रोडपर्यंतच्या रस्त्यांच्या क्युरिंगचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता काही दिवसांत वाहतुकीसाठी खुला होईल,” असेही त्यांनी सांगितले. दहिसर पश्चिम येथील रंगनाथ केसकर महामार्ग आणि रिव्हर व्हॅली रोडला जोडणार्या दहिसर नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी आ. मनिषा चौधरी यांनी दहिसर परिसरातील अपूर्ण कामांची यादी अधिकार्यांसमोर सादर केली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, येत्या तीन वर्षांत मुंबईत उत्तम रस्त्यांची सोय नागरिकांसाठी केली जाईल. यावरून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबईतील रस्त्यांची जी दयनीय स्थिती होती, त्याच्या तुलनेत फक्त एका वर्षात आम्ही 60 टक्क्यांहून अधिक रस्त्यांची सुधारणा पूर्ण केली, हे लक्षात येते.”
रस्त्यांच्या पाहणी दौर्यादरम्यान महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, आ. विद्या ठाकूर, आ. मनिषा चौधरी, माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, माजी नगरसेविका हेतल गाला आणि स्थानिक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
खोदलेल्या रस्त्यांचे तत्काळ डांबरीकरण होणार
“आता नवीन रस्ता खोदू नका. दि. 20 मे रोजीनंतर काँक्रिटीकरण करणे थांबावा. कारण, पावसाळ्याच्या तोंडावर केलेल्या तात्पुरत्या कामांमुळे रस्ते पुन्हा उखडण्याचा धोका असतो. दि. 31 मे रोजीपर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करा, जे रस्ते खोदून ठेवले आहेत, त्याचे डांबरीकरण करून ते वाहतुकीस खुले होतील असे करा.
डांबरीकरण करताना ते रस्ते पावसाळ्यात उखडून खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच, सध्या लावण्यात आलेले दुभाजक हटवा, डेब्रिज, खडी, माती तातडीने हटवण्यात यावेत, गटारांमध्ये गेले डेब्रिज आणि मातीही काढा,” अशा सूचना यावेळी पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिल्या.