चार लाखांहून अधिक नागा साधू, १३ आखाड्यांपैकी सर्वात मोठा आखाडा; काय आहे जूना आखाड्याचे महत्त्वं?
24-Dec-2024
Total Views | 50
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Juna Akhada Mahakumbh 2025) उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ-२०२५ ची तयारी सध्या जोरात सुरू आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकुंभ-२०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी विविध आखाड्यांमधील ऋषी-मुनी येत आहेत. आपल्याला ठाऊक असेल की पालघरमध्ये साधू हत्याकांड झाला होता. ज्यामध्ये दोन साधूंना जमावाने केलेल्या मारहाणीत आपला जीव गमवावा लागला होता. असं म्हणतात की हे दोघेही साधू जुना आखाड्याशी संबंधित होते. वास्तविक एकूण १३ आखाडे आहेत, जे महाकुंभामध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. याच जुना आखाडाविषयी आणि नागा साधूंविषयी आपण जाणून घेणार आहोत .
जुना आखाड्याची स्थापना ११४५ मध्ये उत्तराखंडच्या कर्णप्रयाग येथे झाली. याला भैरव आखाडा असेही म्हणतात. आखाड्याचे केंद्र वाराणसीतील हनुमान घाटावर आहे. सध्या त्यांचा आश्रम हरिद्वारच्या मायादेवी मंदिराजवळ आहे. जुना आखाड्याच्या विशालतेबद्दल सांगायचे तर असे म्हटले जाते की सुमारे १३ आखाड्यांपैकी जुना आखाडा सर्वात मोठा आहे. या आखाड्यातील भिक्षूंची संख्या चार लाखांहून अधिक आहे. त्यापैकी बहुतेक नागा साधू आहेत. हे देखील विशेष आहे की, नागा साधू तीन प्रकारचे योग करतात, जे त्यांना थंडीचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचे विचार आणि खाण्याच्या सवयी दोन्हीमध्ये कमालीचा संयम ते ठेवतात. नागा साधूंच्या हातात आपण बऱ्याचदा शस्त्रे सोबत ठेवलेली पाहिली असतील. त्यांच्या हातात तलवार, त्रिशूळ, भाला, कुऱ्हाडी अशी अनेक प्रकारची शस्त्रे असतात. कुंभमेळ्यादरम्यान नागा साधू ही शस्त्रे घेऊन बाहेर पडतात.
हिंदू धर्मातील काही तज्ज्ञांच्या मते या आखाड्याची स्थापना १२५९ साली झाल्याचा उल्लेख आहे. त्याच वेळी, १८६० मध्ये या आखाड्याची सरकारी कागदपत्रांमध्ये नोंदणी झाली. जुना आखाड्याचे आवडते किंवा पूजनीय देवता भगवान शिव किंवा त्यांचे रुद्रावतार भगवान दत्तात्रेय आहेत. हिंदू धर्माची स्थापना करण्यात... तसेच तो धर्म अबाधित ठेवण्याकरीता नागा साधूंना धर्मग्रंथ तसेच शस्त्रे शिकवून युद्धकौशल्यांमध्ये पारंगत करण्यात आल्याचे म्हटले जाते. शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या आखाड्यांनी पुढे इस्लामिक आक्रमकांचाही सामना केला.
मंदिरे आणि मठांच्या रक्षणासाठी मुघलांशी लढा
अफगाण आक्रमक अहमद शाह अब्दाली मथुरा-वृंदावन लुटल्यानंतर तो गोकुळ लुटण्याच्या इराद्याने पुढे सरकला, पण नागांनी त्याला रोखले. त्यामुळे गोकुळ लुटण्याचे अब्दालीचे स्वप्न अपूरे राहिले, अशी माहिती आहे. नागा साधूंनी गुजरातमधील जुनागडच्या निजामाशी घनघोर युद्ध केले, असेही म्हणतात. या युद्धात नागा तपस्वींनी निजाम आणि त्याच्या सैन्याचा पराभव केला होता. नागा साधूंचे कौशल्य पाहून निजाम देखील प्रभावित झाला आणि शेवटी, त्याला भिक्षूंपुढे गुडघे टेकून त्यांना तहासाठी आमंत्रित करावे लागले.
जुना आखाड्याचे संरक्षक महंत हरी गिरी सांगतात की आखाड्याचे भिक्षू निजामाकडे तहासाठी गेले होते. यामध्ये जुनागड सोपवू असे सांगून साधूंना भोजनासाठी बोलावण्यात आले. या काळात निजामाने कपटाने भिक्षूंच्या जेवणात विष मिसळले. यामुळे शेकडो भिक्षू मरण पावले. जे वाचले त्यांनी जुना आखाडा स्थापन केला.
नागा साधू बनण्यासाठी काय कराल?
आखाड्याचा संन्यासी होण्यासाठी एक संकल्प पूर्ण करावा लागतो. हा संकल्प १२ वर्षांसाठीचा असतो. हा संकल्प घेणाऱ्याला ब्रह्मचारी म्हणतात. ब्रह्मचर्यादरम्यान व्यक्तीला आखाड्याचे नियम आणि परंपरा शिकवल्या जातात. या काळात गुरुची सेवा करावी लागते. जेव्हा ब्रह्मचारीचे १२ वर्षांचे व्रत पूर्ण होते, तेव्हा त्याला येत्या कुंभात नागा साधू म्हणून दीक्षा दिली जाते. सुरुवातीला संन्यासाची दीक्षा गुरूंच्या माध्यमातून दिली जाते. मंत्रोच्चार वगैरे करून सर्व वस्तू अंगावर धारण केल्या जातात. यानंतर विजय संस्कार संपन्न केला जातो. विजय संस्कारात, संन्यास घेणारी व्यक्ती पिंडदान आणि इतर प्रसाद करून सांसारिक आसक्तीपासून दूर जाते. आहुती दीक्षा मिळाल्यानंतर नागा संन्यासी होण्याची प्रक्रिया सुरू होते. या संस्कारादरम्यान, सर्व साधूंना धर्म ध्वजाखाली एकत्र केले जाते आणि नंतर नागा साधूंना दीक्षा दिली जाते.
नागा साधूंना कुंभ मेळ्यात मोठा मान
सर्वांगाला भस्म लावलेल्या या नागा साधूंना कुंभ मेळ्यात मोठा मान असतो. त्यांनी समाजापासून वेगळे राहाण्याचा आणि साधना तसेच तपश्चर्येचा संकल्प केलेला असतो. त्यामुळे ते लोकांपासून दरू एकांतात राहाणे पसंत करतात. कुंभ मेळ्यात विभिन्न अखाड्याचे नागासाधू एकमेकांना भेटतात. विचारांचे अदानप्रदान करतात. याठिकाणी त्यांना आपली परंपरा, ज्ञान आणि साधनेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. कुंभ मेळाव्यात गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात शाही स्नानाचे वेगळे महत्व होते. हे स्नान आत्मा शुद्ध करणे आणि मोक्ष प्राप्तीचे माध्यम मानले जाते. नागा साधू या खास मुहुर्तावर स्नान करुन आपले तप आणि साधना सिद्ध करतात.