नागपूर : (Nitesh Rane) संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. यावर मंत्री नितेश राणे यांनी शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
"मच्छर मारायला रेकी करायची गरज नाही"
"काल संजय राजाराम राऊत यांच्या घराची कुणीतरी रेकी केल्याची बातमी पाहिली. मच्छर मारायला रेकी करावी लागतेय हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. मच्छर मारण्यासाठी कॉइल लावावी लागते, त्यासाठी रेकी करायची गरज नाही. कदाचित खिचडीचोर नेमकं कुठे राहतो ते पाहण्यासाठी कुणीतरी आले असतील की खिचडी कुठे पोहचवायची आहे. म्हणून त्याकडे एवढं काही गांभीर्याने घेण्याची गोष्ट नाही. आणि संजय राऊत यांचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एवढं काही महत्त्व नाही की त्यांना मारण्यासाठी कोणी रेकी करेल. अश्याच कोणत्यातरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं, धमक्या द्यायच्या आणि पूर्ण दिवसाच्या बातम्या करत बसायचं. म्हणून या गोष्टीला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. अशा मच्छरांना मारण्यासाठी त्यांच्या बंगल्याबाहेर गुड नाइटचे कॉल लावून टाकू, ते आपोआप पळून जातील. सध्या मच्छराच्या मदतीला पेंग्विन आला आहे. शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणातील यांचं महत्त्व लोकांनीच संपवलं आहे.
"एकानं मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यानं लगेच जाऊन संरक्षण मागायचं"
एकानं मारल्यासारखं करायचं दुसऱ्यानं लगेच जाऊन संरक्षण मागायचं, मला या महाराष्ट्रातील एक असा व्यक्ती सांगा जो संजय राऊतांना काही करण्यासाठी आपले हात खराब करुन घेईल , याआधीही अशी घटना झाली होती, तेव्हा पोलिसांच्या चौकशीत तो त्यांचाच कार्यकर्ता असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे याला फारसं गांभीर्याने घेऊ नका, असे राणे म्हणाले आहेत.