मृत्यूचे रहस्य

    18-Dec-2024
Total Views | 31
 
  योगिराज हरकरे,
 
साधकाच्या जडजीवनातील संस्कारांना धरून या लिंगदेहाला चांगल्या वा वाईट इच्छा राहू शकतात, म्हणून लिंगदेही अवस्थेत राहणारे पिशाच्चादी जीव, इतर जडशरीरांना झोंबून त्याद्वारे आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. लिंगदेहाला जडशरीर नसल्यामुळे, त्याच्या इच्छातृप्तीकरिता त्याला इतर जडशरीरांवर कब्जा करून, इच्छापूर्ती करावी लागते. म्हणून पिशाच्चे इतरांना झोंबतात, त्यांच्या शरीराचा कब्जा घेतात आणि इच्छापूर्ती झाल्यावर ते शरीर सोडून निघून जातात. प्रबळ इच्छेने वा वासनेने प्रेरित झालेले लिंगदेही म्हणजेच पिशाच्च होत. मेल्यावर प्रत्येक लिंगशरीरी प्रेत अवस्थेत असतो. ‘प्र-एत’ म्हणजे पुढे कंपन करीत जाणारे अस्तित्व, म्हणजेच प्रेत होय. प्रबळ वासनाप्रेरित प्रेत म्हणजे पिशाच्च होय.
 
सूक्ष्मशरीर वा लिंगदेह स्थल-कालमर्यादेच्या वर असतो. या अवस्थेतील कार्ये तत्क्षण आणि त्याच स्थलात होतात. हा दिव्य अनुभवाचा भाग आहे. प्रख्यात वैज्ञानिक आईनस्टाईन यालाच time space continuum ’ असे म्हणतात. लिंगदेहाने इच्छितस्थळी जाताना, दोन स्थलांमधील सर्व प्रदेश दिसतील असे नाही. तो एक स्वतंत्र अभ्यास आहे. सूक्ष्म शरीरापलीकडे कारणदेह आणि महाकारणदेह अशा आणखी दोन, अधिकाधिक सूक्ष्म-सूक्ष्मतर अवस्था आहेत. कारणदेहावस्था प्राप्त झाल्यास, साधक त्याखालील दोन अवस्था म्हणजे लिंगदेह व जडदेह पाहू शकतो. जडदेह जो आहे तोच दिसतो, तर त्यावर त्याच आकाराचाच, पण थोडासा फिकट वर्णाचा असा लिंगदेह दिसतो. अधिक साधना पुण्य पदरी असल्यास आणि सद्गुरूंच्या कृपेने साधकाला, त्याच्या कारणदेहाची व महाकारण देहाचीसुद्धा अनुभूती येऊ शकते.
 
लिंगशरीरात सर्व जाणीव असते. त्या शरीरात दिव्य चक्षु, श्रोत्र, घ्राण, स्पर्श, मात्रा असल्यामुळे, लिंगदेही सर्वत्रपाहू शकतो, ऐकू शकतो, जाणू शकतो. ते जाणणे, पाहणे, ऐकणे स्वतःच्या शरीरापुरतेच मर्यादित नसून, त्याची कक्षा विश्वव्यापी बनू शकते. जडशरीर हे जड ज्ञानाचे उपकरण असल्यामुळे, जडशरीराबाहेर गेल्यावर लिंगशरीराला श्वासोच्छवास, रुधिराभिसरण, क्षुधा व तृष्णा यांसारख्या जडप्रक्रियांची आवश्यकता नसते. या अवस्थेतील माध्यम इच्छा असल्यामुळे , साधकाच्या जडजीवनातील संस्कारांना धरून या लिंगदेहाला चांगल्या वा वाईट इच्छा राहू शकतात, म्हणून लिंगदेही अवस्थेत राहणारे पिशाच्चादी जीव, इतर जडशरीरांना झोंबून त्याद्वारे आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. लिंगदेहाला जडशरीर नसल्यामुळे, त्याच्या इच्छातृप्तीकरिता त्याला इतर जडशरीरांवर कब्जा करून, इच्छापूर्ती करावी लागते. म्हणून पिशाच्चे इतरांना झोंबतात, त्यांच्या शरीराचा कब्जा घेतात आणि इच्छापूर्ती झाल्यावर ते शरीर सोडून निघून जातात. प्रबळ इच्छेने वा वासनेने प्रेरित झालेले लिंगदेही म्हणजेच पिशाच्च होत. मेल्यावर प्रत्येक लिंगशरीरी प्रेत अवस्थेत असतो. ‘प्र-एत’ म्हणजे पुढे कंपन करीत जाणारे अस्तित्व, म्हणजेच प्रेत होय. प्रबळ वासनाप्रेरित प्रेत म्हणजे पिशाच्च होय.
 
मृत्यूनंतर प्रत्येक जीवात्मा, प्रेत या अति वेगवान अवस्थेत परलोकात जात असतो. इहलोकी जसे ज्याचे कर्म असेल, तसाच त्याला पलीकडील लोक प्राप्त होत असतो. लोक म्हणजे दुसरे स्थान वा पृथ्वीप्रमाणे अन्य ग्रहगोल नसून, अवस्था आहे. ते कांद्याच्या पातीप्रमाणे एकात एक वा स्वतंत्र नसतात. बर्फात ज्याप्रमाणे पाणी असते, वाफ असते व प्राणवायू व उद्जनवायू असतात, तद्वत् चार देह एकात एक असे निहित असतात. भूत, प्रेत, पिशाच्च अवस्था लिंगदेहाच्याच वृत्तीनुसार अवस्था होत. प्रत्येक जीव मृत्यूनंतर लिंगदेही बनून, आपल्या गतकर्मानुसार परलोकी गमन करतो. इहजीवन साधारणतः बरे असलेले सर्वच जीवात्मे मरणोत्तर पितृलोकात जातात. तेथे केलेल्या गतकर्मानुसार, त्यांच्यावर क्रियाप्रक्रिया चालू राहतात, त्यालाच पुराणात भोग म्हटले आहे. भोग संपल्याशिवाय जीवात्म्याला परत मृत्यूलोकी प्रवेश नाही, म्हणजे तोपर्यंत जन्म घेता येत नाही. पुराणात या अवस्थेलाच यम म्हटले आहे. सर्प, विंचवावर झोपणे, अग्नित जाळले जाणे, गरम तेलात तळणे, करवतीने कापले जाणे इत्यादी सर्व कल्पना आहेत. इहजन्मात कोणी पापकर्म करु नये, म्हणून तसल्या घोर कल्पना पुराणात लिहिल्या आहेत. हा पितृलोक अन्यत्र दूर नसून, येथेच आहे. नरक आणि स्वर्ग या कल्पना वा लोक येथेच आहेत. केवळ ते अवस्थांतर आहे. महाभारतात स्पष्टच म्हटले आहे,
 
‘अत्रैव नरकः स्वर्ग इतिमातः प्रचक्षते ।
 
सूतकसिध्दांत
 
मरणाद्वारे जडशरीराचे बंधन सुटल्याबरोबर, प्रत्येक जीव मरणोत्तर पितृलोकी जातो. कारण, तो तेथूनच इहलोकी जन्म घ्यायला येतो. जेथून आले तेथे मरणानंतर परत जावे लागते, म्हणून प्रेतात्मा मृत झालेल्या जडशरीराच्या मायेत सापडू नये, यासाठी वैदिक परंपरेत मेल्यानंतर शवाला त्वरित अग्नी देऊन प्रेतात्म्याचे ते मायाकेंद्रच नष्ट करुन टाकतात. त्यामुळे प्रेतात्म्यालगत शरीर तर उपलब्ध नसते व अद्याप नवशरीर धारण करण्याची शक्यता नसल्यामुळे, तो जेथून या जड जगतात आला, त्या पितृलोकात त्याला म्हणजे मूळ अवस्थेत जावे लागते. संन्यासी मायेच्यावर असल्याने त्यांचे शरीर पुरतात.
 
पितृलोक मृत्यूलोकापेक्षा (म्हणजे आपण राहतो ते) उच्च म्हणजे शुद्ध अवस्थेत असतो. म्हणून जन्मानंतर किंवा मृत्यूनंतर, वैदिक परंपरेत सूतक पाळत असतात. सूतकाचा अर्थ विटाळ नव्हे. ज्यांच्या घरी जन्म वा मृत्यू झाला, त्याचा संबंध त्या जीवात्म्याद्वारे पितृलोकांशी येत असतो. तत्काळ त्या घरातील लोक, पितृलोकसदृश अवस्थेत असतात म्हणून, असल्या सूतक असलेल्या जनांनी इतरांना स्पर्श करू नये. पितृलोकात असणार्‍या जनांपेक्षा, मृत्यूलोकात असणारे इतर जीव अशुद्धावस्थेत असल्याने, सूतक असलेल्यांनी इतरांना शिवू नये, असा दंडक आहे. पण, आपल्या महाराष्ट्रात सूतकाचे वागणे उलट आहे. ज्यांना सूत आहे, त्यांचा इतर विटाळ मानतात. पण, शास्त्र उलट आहे. जे सूतकात असतील त्यांनी इतरांना शिवू नये, कारण इतर लोक त्यांच्यापेक्षा अशुद्ध लोकात आहेत.
 
सूतक म्हणजे प्रवेश केलेला, म्हणजे ज्यांना सूतक असते त्यांचा प्रवेश झालेला असतो. कोणत्या स्थानी? तर पितृलोकात. आता या अतींद्रिय शास्त्राचे अनुभव घेणारे जाणकार कमी झाल्याने, सूतक संस्कारात काय गहन रहस्य दडले आहे, याची शास्त्री पंडितांना सुद्धा माहिती नसते. कोणत्या प्रकारच्या जन्ममृत्यूकरिता किती दिवसांचे सूतक पाळावे, एवढेच ते सांगू शकतात. सूतक संस्काराचे महत्त्व कळल्या समान व समाजातील कोणत्याही धर्मपंथाची व्यक्ती असो, ती सूतक संस्कार पाळेलच.
 
प्रेतात्मा पूजन
 
काही धर्मपंथांत मृत्यूनंतर मृत जडशरीर कबरीत दफन करुन ठेवतात व कालांतराने त्याचे पूजन, नवस इत्यादी प्रक्रिया ते सुरु करतात. इतर धर्मीयांचे परिणाम होऊन, आपल्या हिंदूवैदिक धर्मीयांनी सुद्धा पीर-पैगंबरांना पूजणे आणि नवस करणे सुरु केले आहे. हे निव्वळ अज्ञान व अशास्त्रीय वागणे आहे. शवाभवती मायेने गुंतून राहणारा जीवात्मा स्वतःचेच भले करु शकत नाही, इतरांचे काय करणार? ही साधी तर्कबुद्धी सुद्धा, असल्या विवेकहीन लोकांजवळ नसते. इतर करतात म्हणून हेही करायला पाहतात. पंथ वा धर्म संप्रदाय जड जगता पुरताच असल्याने, त्या पलीकडील दिव्य जगतातील व्यवहारांवर योग्य मार्गदर्शन केल्यास वा चुकीच्या मार्गाबद्दल टीका केल्यास, धर्मावर टीका केली असे मानण्याचे प्रयोजन नाही. पीर-पैगंबरांची व थडग्यांची पूजा करणे किंवा त्यांना नवस करणे म्हणजे, प्रेतपूजन करणे होय. सुबुद्धजनांनी असल्या घोर मार्गाला लागू नये.
 
 योगिराज हरकरे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121