मिरा - भाईंदर : ( Smriti Irani ) काँगेस सत्तेसाठी निवडणुक लढवते तर भाजपा सेवेसाठी निवडणुक लढवते, ते काही तरी मिळविण्यासाठी लढतात तर भाजपा नागरिकांना विकासाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी लढतात, हिंदू , हिंदुत्व याकडे तिरस्कारच्या भावनेने बघणाऱ्या काँग्रेसने संत मीराच्या नावाने सुरू होत असलेल्या आणि रामाचा जल्लोष घराघरात होत असलेल्या या मीरा-भाईंदर मतदार संघात जिंकण्याचे स्वप्न सुध्दा पाहू नये. असा हल्लाबोल माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाईंदर येथील जाहीर सभेत केला.
मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या भाईंदर पश्चिम येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, काँग्रेसचे उमेदवार मुजफ्फर हुसेन आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे सांगतात. आता ते शिवभक्त सुध्दा झाले आहेत. त्यांच्यातच नव्हे तर काँगेसमध्ये पराभवाच्या भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यांचे नेते सुध्दा घाबरले आहेत, म्हणुन महाराष्ट्रात आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गुणगान करीत आहेत. जननी आणि जन्मभूमीच्या संरक्षणासाठी तसेच, विकासासाठी भाजपाच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे. मी या ठिकाणी निवडणुकीचे बिगुल वाजविण्यासाठी आली नसून उमेदवाराच्या ललाटी विजयश्रीचा टिळा लावण्यासाठी आल्याचे सांगितले. या नंतर या भूमीत संत येणार आहेत. दोन दिवसांनी योगी यांची सभा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गीता जैन मतविभाजनासाठी अपक्ष रिंगणात - मेहता
प्रचार सभेत बोलताना भाजपच्या नरेंद्र मेहता यांनी काँग्रेस च्या मुझफ्फर हुसैन सोबतच अपक्ष गीता जैन यांचाही पर्दाफाश केला. सर्व पक्षांशी धोकेबाजी केलेल्या गीता जैन मतविभाजन करण्यासाठी उभ्या आहेत. पाच वर्षात मतदारसंघात त्यांनी कोणताही विकास केला नाही. असा आरोप मेहता यांनी केला. तर, मताच्या दानासाठी भगवा झेंडा घेऊन फिरणाऱ्या मुजफ्फर हुसैन यांनी हिंदु बनुन आपल्या घरावरही भगवा झेंडा लावण्याचे आव्हान दिले आहे.