भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने विस्तारणार्या हवाई वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे. विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या धमक्यांद्वारे भारतातील विमान कंपन्यांना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे विमान उड्डाणांना आणि व्यवसायाला प्रचंड फटका बसला आहे.
गेल्या आठवड्यात कॅनडातील इकॉलुएट या ठिकाणी ‘एअर इंडिया’चे विमान उतरले होते. २११ प्रवाशांना घेऊन मुंबईहून शिकागोला जाणार्या ‘बोईंग ७७७’ विमानाला दि. १५ ऑक्टोबर रोजी बॉम्ब असण्याची धमकी मिळाल्यामुळे मार्ग बदलावा लागला होता. कित्येक तासांनंतर या खोळंबलेल्या प्रवाशांना शिकागोला नेले. मात्र, ही धमकी खोटी होती. भारतातील विमान कंपन्यांना लक्ष्य करत या महिन्यात आतापर्यंत अनेक खोट्या धमक्या देण्यात आल्या आहेत. गेल्या एका आठवड्यातच अशा किमान ९० धमक्या देण्यात आल्या होत्या.
जून महिन्यात एकाच दिवशी ४१ विमानतळांना ई-मेलद्वारे विमानात किंवा विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या खोट्या धमक्या देण्यात आल्या. यामुळे विमानतळांवरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. निम्म्या धमक्या दिल्ली आणि मुंबई या देशातील दोन सर्वांत मोठ्या विमानतळांच्या बाबतीत होत्या.
अलीकडच्या काळात भारतीय विमान कंपन्यांना लक्ष्य करून देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये व्यत्यय निर्माण करणार्या या घटनांमुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांत या धमक्यांना बळी पडलेल्या कोणत्याही मोठ्या विमान कंपनीने या विषयावर भाष्य केलेले नाही. हा सर्वांत जास्त सणासुदीचा गर्दीचा हंगाम आहे आणि त्यांना प्रवाशांमध्ये भीती निर्माण करायची नाही. एअर लाईन्सविरुद्ध हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद आहे आणि त्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे.
खोट्या धमक्यांचा वाईट हेतू
विमान कंपन्यांना लक्ष्य करण्यासाठी देण्यात येणार्या बॉम्बच्या खोट्या धमक्यांचा संबंध अनेकदा वाईट हेतू, लक्ष वेधून घेणे, मानसिक आरोग्याच्या समस्या, व्यवसायात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न किंवा खोडसाळपणा करणे इत्यादी बाबींशी आहे. गेल्या वर्षी बिहारमधील एका विमानतळावर चेक-इनची प्रक्रिया चुकल्यानंतर निराश झालेल्या एका प्रवाशाने असाच खोडसाळपणा केला आणि ‘स्पाईस जेट’च्या विमानाला उड्डाणाला विलंब करण्यासाठी बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली.
भारतातील हवाईसेवा क्षेत्रात प्रचंड विस्तार
मागील काही वर्षांपासून भारतातील हवाईसेवा क्षेत्रात प्रचंड विस्तार होतो आहे. भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्यावर्षी भारतात देशांतर्गंत विमान उड्डाणांमधून १५ कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.
देशातील ३३ आंतरराष्ट्रीय विमानतळांसह १५०हून अधिक कार्यरत विमानतळांवर भारतात दररोज तीन हजारांहून अधिक विमाने येतात आणि जातात.
गेल्या काही दिवसांत बॉम्बसंदर्भातील अफवा शिगेला पोहोचल्या असताना दि. १४ ऑक्टोबर रोजी भारतातील विमान कंपन्यांनी ४ लाख, ८४ हजार, २६३ प्रवाशांची वाहतूक केली. देशात एकाच दिवसात इतक्या प्रवाशांची वाहतूक करण्याचा हा एक विक्रम आहे.
भारतात ७०० व्यावसायिक प्रवासी विमाने सेवेत आहेत, तर १ हजार, ७००हून अधिक विमानांच्या ऑर्डर प्रलंबित आहेत. भारत ही नक्कीच व्यावसायिक विमानांची सर्वात वेगाने विस्तारणारी बाजारपेठ होईल. मात्र, अशा प्रकारच्या खोट्या बॉम्ब माहितीमुळे किंवा अफवांमुळे या क्षेत्राला फटका बसत आहे.तसेच विमान कंपन्यांना आलेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होते.
खोट्या धमकीचा काय परिणाम होतो?
बॉम्ब असल्याची धमकी किंवा माहिती मिळाल्यानंतर जर विमान आकाशात असेल, तर त्याला लगेचच जवळच्या विमानतळाकडे उतरवावे लागते. धोक्याची माहिती दिलेल्या विमानांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी लढाऊ विमानांचाही वापर करावा लागतो.
एकदा का विमान विमानतळावर उतरले की प्रवासी विमानातून उतरतात. त्यानंतर विमानातील सर्व सामान, माल आणि खाद्यपदार्थांची कसून तपासणी केली जाते. या प्रक्रियेसाठी कित्येक तास लागू शकतात. विमानातील पायलट असो किंवा इतर कर्मचारी असो, त्यांच्या कामाचे तास ठरलेले असतात. त्या मर्यादेपेक्षा अधिक तास ते काम करू शकत नाही. परिणामी, विमानातील सर्व कर्मचार्यांच्या जागी दुसर्या कर्मचार्यांची व्यवस्था करावी लागते. यातून विमानाच्या उड्डाणास आणखी विलंब होतो. या सर्व प्रक्रियेसाठी मोठा खर्च होतो आणि विमान वाहतुकीवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.
नियोजित मार्गावरून इतरत्र वळवण्यात आलेल्या किंवा विलंब झालेल्या विमानामुळे, विमानतळावर उभे असलेल्या विमानामुळे, विमान कंपनी महसूल कमावत नसते, तर त्यांचा अतिरिक्त खर्च करते. त्यामुळे ते विमान उड्डाण कंपनीसाठी पैसे गमावणारे ठरते. विमान उड्डाणास विलंब झाल्याने त्याचा वेळापत्रकावर मोठा परिणाम होतो.
बॉम्बच्या धमक्या देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर
सोशल मीडियावरील निनावी अकाऊंटवरुन टाकण्यात येणार्या बॉम्ब अफवांमध्ये नाट्यमयरित्या वाढ झाल्यामुळे यासाठी जबाबदार असणार्या गुन्हेगारांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
या धमक्या एखाद्या व्यक्तीने दिली आहे, की एखाद्या संघटनेने दिली आहे की, कोणीतरी याची नक्कल करत आहे, याबद्दल स्पष्टता नाही. गेल्या आठवड्यात भारतीय अधिकार्यांनी एका १७ वर्षांच्या शाळा सोडलेल्या मुलाला अटक केली होती.
सोशल मीडियावरील या पोस्ट कुठून टाकण्यात आल्या याचा तपास करताना ‘आयपी अॅड्रेस’चा शोध घेतला असता, काही पोस्टचा उगम लंडन आणि जर्मनीहून झाल्या आहे. बॉम्ब असल्याच्या अशा खोट्या धमक्यांमागे कोण आहे याचा छडा लावणे हे एक मोठे आव्हान आहे.
सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना ताकीद दिली आहे की, अशा प्रकारचे पोस्ट किंवा मेसेजेस सोशल मीडियावर लगेच ब्लॉक झाले पाहिजे आणि अशा पोस्ट व्हायरल होऊ देऊ नये. कारवाई न केल्यास सरकार सोशल मीडियावर कारवाई करेल.
विमानतळांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणे किंवा विमानांच्या उड्डाणांमध्ये व्यत्यय आणणे या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी भारतीय कायद्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.
एअर लाईन्स विविध कारणांमुळे तोट्यात
मागील काही दिवसांपासून भारताला एका नवीन प्रकारच्या दहशतवादाला सामोरे जावे लागत आहे. ते म्हणजे विमाने किंवा विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या. अशा धमक्यांमुळे विमान कंपन्यांना दीड हजार ते दोन हजार कोटी एवढा अतिरिक्त खर्च करावा लागला. एकूणच दर दिवसाआड घडणारा हा प्रकार एक पद्धतशीर षड्यंत्र आणि दहशतवादाचा नवीन प्रकारच म्हणावा लागेल.
हा लेख लिहून पूर्ण होत असताना अजून एक बातमी आली की, आता काही मोठ्या शहरातील मोठ्या हॉटेल्सना धमकी मिळत आहे की, त्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहे. म्हणजे आपण एका दहशतवादाच्या प्रकाराला सामोरे जात असताना, दुसरा दहशतवादाचा प्रकार पुढे येत आहेत. म्हणून सरकारने आक्रमक कारवाई करून अशा सगळ्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना अत्यंत कठीण अशी शिक्षा द्यायलाच पाहिजे, नाहीतर अशा प्रकारच्या धमक्या आणि अफवा पसरवणे थांबणार नाही.
काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध विनोदी यूट्यूबर जसपाल भट्टी यांचा 'SOS'(Shortage of staff) नावाचा एअर लाईन्सवरती व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एअर लाईन्सच्या एकच कर्मचारी (जसपाल भट्टी) सगळ्या प्रकारची कामे करताना दिसत होता. कारण, जास्त कर्मचारी ठेवणे त्यांना परवडणारे नव्हते.
आता नेमके तेच केले जात आहे. मागच्या आठवड्यामध्ये प्रयागराज वरून विमानाने पुण्याला येत असताना, प्रयागराज विमानतळावरती दोन कर्मचारी सगळ्या प्रकारची कामे करत होते. कारण, सध्या सगळ्या एअर लाईन्स विविध कारणांमुळे तोट्यात चालल्या आहेत.
फसव्या कॉलसाठी कठोर शिक्षा जरुरी
एखाद्या खोट्या धमकीसाठी किंवा बॉम्ब असल्याचा फसव्या कॉलसाठी, सरकार अशा गुन्हेगारांचा समावेश ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये म्हणजे त्यांना विमान प्रवास करण्यास प्रतिबंध करण्याबरोबरच या गुन्ह्यांसाठी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करणारे नवीन कायदे आणण्याचा विचार करत आहे.
सरकारने अनेक अशा अफवा पसरणार्या व्यक्तींना अटक केली आहे. आशा करूया यामुळे अशा प्रकारच्या धमक्या देणे, अफवा पसरवणे आणि भारताचे नुकसान करणे थांबवले जाईल.
रेल्वेच्या रूळावर दगड ठेवणे, सिमेंटचे पेव्हर ब्लॉक ठेवणे किंवा लाकडाचे मोठे स्लीपर ठेवणे हा सुद्धा घातपाताचा दहशतवाद आहे आणि यावरती सुद्धा आपण लक्ष ठेवायला पाहिजे आणि दोषींना शिक्षा द्यायला पाहिजे.
हेमंत महाजन