कोल्हापूरच्या सभेतून देवेंद्र फडणवीस यांचा मविआवर घणाघात
ठाकरेंनी बाळासाहेबांच्या नावातून हिंदूहृदयसम्राट शब्द वगळला, औरंगजेबाची नाव घेण्याची लाज वाटू लागली : देवेंद्र फडणवीस
05-Nov-2024
Total Views | 33
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात महायुतीची विजय निर्धार सभा आयोजित करण्यात आली. ही सभा दि: ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे जाहीर करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. "बाळासाहेबांच्या नावातून हिंदूहृदयसम्राट शब्द वगळला, औरंगजेबाची नाव घेण्याची लाज वाटू लागली", असल्याची टीका करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोरून हिंदूहृदयसम्राट काढून टाकले, त्यांना तसे करण्यास लाज वाटू लागली आहे. आता ते औरंगजेबाचे नावही घेत नाहीत, राष्ट्रप्रेमी मुस्लिम हा औरंगजेबाला मानत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केले. शेतकऱ्यांना आता आत्महत्या करण्याची आवश्यकता नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच कोल्हापूर उत्तरेतून पंजा गायब केल्यानंतर आता दक्षिणेतूनही पंजा गायब करू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेतून केला आहे. तसेच त्यानंतर ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरत येथे स्वारी केली. २२ वर्षांआधी सूरत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला होता. आता मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभे करून दाखवावे आम्ही त्यांची मदत करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आता विरोधकांना टीका करण्यासाठी कोणतेही मुद्दे नसून आता राज्यात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ५२ % गुंतवणूक राज्यात होणार.तसेच देशात रोजगाराचा प्रश्न मिटणार असून महाराष्ट्र राज्य रोजगाराच्याबाबतीत अव्वलस्थानी राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.