हिंदवी स्वराज्याबद्दल चुकीचे वक्तव्य करून, काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणे जनतेची दिशाभूल करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. काँग्रेसने कायमच धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यात धन्यता मानली, तर हिंदूंना फसवून जातीपातीत विभागले. काँग्रेसचा देशविघातक चेहरा म्हणूनच समजून घेतला पाहिजे.
काँग्रेसी युवराज आणि इंडी आघाडीचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या लौकिकाला जागत, केंद्र सरकार विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कोल्हापूर येथे बोलताना आगपाखड केली. ‘रेटून बोल पण खोटे बोल’ या काँग्रेसी स्वभावधर्माला अनुसरून पुन्हा एकदा त्यांनी देशातील जनतेची दिशाभूल करण्याची परंपरा कायम राखली आहे. पंतप्रधान मोदी यांची नियत खोटी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी कोल्हापूर येथे बोलताना केला. एकीकडे शिवाजी महाराजांच्या पायावर डोके टेकवायचे आणि त्यांच्या विचारधारेविरोधात काम करायचे, ही त्यांची वृत्ती असल्याचेही राहल गांधी भरसभेत म्हणाले. छत्रपती शिवरायांची विचारधारा ही समानतेची होती, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची होती, असे नमूद करायलाही ते विसरले नाहीत. तथापि, शिवाजी महाराजांनी उभारणी केली ती हिंदवी स्वराज्याची. त्यासाठी महाराष्ट्रातील हिंदू बांधवांना सोबत घेऊन, 18 पगड जातींना एकत्र करत, शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांना अपेक्षित असलेली समानता ही हिंदूंना एक करणारी होती, सुलतानी मुस्लीम आक्रमणापासून हिंदू धर्माचे संरक्षण करणारी होती, हे राहुल यांनी हेतूतः सांगितले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राहुल गांधी यांचा यथायोग्य समाचार घेतलाच. त्या प्रतिक्रियेतच त्यांनी काँग्रेसी मानसिकेतवर नेमकेपणाने अचूक प्रहार केला आहे. तथापि, या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसी विचारधारा आणि त्यांमुळे समाजात पाडलेली फूट समजून घेणे नितांत गरजेचे झाले आहे.
प्रत्येक काँग्रेसवासी स्वतःला धर्मनिरपेक्ष मानतो. नव्हे तसे ते वारंवार जाहीर सभांमधून स्वतःचा धर्मनिरपेक्षतेचा ढोल वाजवून वाजवून सांगत असतात. काँग्रेसी बोलके पोपटही त्याचे दाखले वारंवार देत राहतात. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासारखे नव्याने बाटलेले डोक्यावर जाळीदार टोपी घालण्यासाठी त्याचा दाखला देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेचे राजकारण केले हे कोणीही नाकारणार नाही. मात्र, महाराष्ट्रातील सर्व जातींना तेजस्वी, प्रखर अशा पवित्र भगव्या जरीपटक्याखाली एकत्र आणायचे काम त्यांनी केले. मुस्लीम आक्रमणकर्त्यांपासून त्याचे रक्षण करण्याच्या हेतूने छत्रपत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आपल उभेे आयुष्य वेचले. पण राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस समानतेच्या गप्पा मारते, प्रत्यक्षात ते फूट पाडण्याचेच काम करत आहे. निधर्मीवादाच्या नावाखाली मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि भारत जोडोच्या माध्यमातून हिंदूंमध्ये फूट पाडणे हाच त्यांचा खरा अजेंडा आहे. काँग्रेसच्या याच दाढ्या कुरवाळण्याच्या धोरणाने त्यांना कर्नाटकात एकहाती सत्ता दिली. लोकसभेत जिथे जिथे मुस्लीम मते निर्णायक होती, तिथे तिथे भाजपला निसटत्या मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. 78 जागा अशा निर्णायक ठरल्या, ‘व्होट जिहाद’ तो हाच.
काँग्रेसने हिंदूद्वेष जोपासता जोपासता आता भारत जोडोच्या माध्यमातून जातीजातीत फूट पाडण्याचे कारस्थान आखले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेसने किती गरळ ओकली आहे, हेही एकदा बघायला हवे. पंडित नेहरुंनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिले आहे, त्या संदर्भात काँग्रेस माफी मागणार का? काँग्रेसने मध्य प्रदेशात ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझर लावून पाडला, त्याबद्दल राहुल यांनी कधी प्रतिक्रिया दिली आहे? कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्या बद्दल राहुल गांधी बोलणार कधी? काँग्रेसकडून छत्रपतींचा वारंवार अवमान झाल्याचे असंख्य दाखले मिळतील. इतकेच नाही, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देखील काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी आजवर अवमानच करत आले आहेत. अशा व्यक्तीच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होणे हे कितपत योग्य आहे, हा खरा प्रश्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आपल्या कार्याची सुरुवात केली. त्यांनी अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजनही केले. तसेच, सबका साथ सबका विश्वास या न्यायानेच आजवर त्यांनी गेली दहा वर्षे देशाचा कारभार चालवला आहे. अरबी समुद्रातले शिवाजी महाराजांचे स्मारक का पूर्णत्वास गेले नाही, हेही तपासून पहायला हवे. ज्यांना आज शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेमाचे उमाळे दाटून आले आहेत, त्याच महाराष्ट्रद्रोही प्रवृत्तींना हे स्मारक प्रत्यक्षात येऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. ही माहिती महाराष्ट्रातील जनतेला माहित व्हायलाच हवी. शिवस्मारकाची संकल्पना ही सुशीलकुमार शिंदे यांच्या काँग्रेसी कार्यकाळात मांडली गेली असली, तरी ती केवळ कल्पनाच राहिली. प्रत्यक्षात कधीही आली नाही. प्रस्तावित शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर, लगोलग त्यासाठीच्या सर्व परवानग्याही केंद्र सरकारने देण्याचे काम केले. राष्ट्रवादीचे नेते दामोदर तांडेल यांनी या स्मारकाला पर्यावरणाचे कारण देत विरोध केला. त्याविरोधात त्यांनी याचिकाही दाखल केली. आता ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.
अशीच एक याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडेही दाखल केली गेली होती. याचे वकील अॅड. असीम सरोदे हे आहेत. त्यांनी तर हे शिवस्मारक बेकायदेशीर असल्याचा प्रतिवाद केला. अॅड. असीम सरोदे हे कोणाच्या बाजूने आहेत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या याचिकेमुळे प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्याने, कंत्राटदाराला हे काम थांबवण्याचे आदेश जारी करण्यात आले. न्यायालयाचा आदेश असल्याने कोणत्याही सरकारला कार्यवाही करता येत नाही. मात्र, आता काँग्रेससह सर्वांनाच अचानक अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे स्मरण झाले आहे. काँग्रेसी विचारसरणीने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा कधीही चालवला नाही, हेच वास्तव आहे. औरंग्या आणि त्याच्या विचारांचे उदात्तीकरण करणार्या मोगल विचारांनी म्हणूनच महाराजांना विरोध केला, हे इतिहासात नोंदवले गेले आहे. त्याच काँग्रेसी विचारधारेतील नाना पटोले पेशव्यांचा दाखला चुकीच्या पद्धतीने देत, महायुती सरकार आणि भाजपवर टीका करत आहेत. त्यांना फारसे गांभीर्याने घ्यावे इतकेही त्यांचे कर्तृत्व नाही. तथापि, काँग्रेसी विचारधारा किती विखारी आणि विषारी आहे, हे त्यांच्या विधानातून ठळकपणे समोर येते.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी भारताचा उल्लेख हिंदू राष्ट्र असाच केला असून, त्यांनी हिंदू समाजाला एक होण्याचे आवाहन केले आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी हिंदूंनी भाषा, प्रांत, जात यावरचे मतभेद आणि वाद बाजूला ठेवत, सर्वांनी एक यावे, असे आवाहन केले आहे. राहुल गांधी धर्मनिरपेक्षतेच्या नावावर हिंदूंमध्ये भेदाभेद करण्याचे काम करत असून, मुस्लिमांचे ते ध्रुवीकरण घडवून आणत आहेत. केवळ सत्ता मिळावी म्हणून काँग्रेसचे हे देशद्रोही कारस्थान आहे. हिंदू समाजाला जातीपातींत विभागून काँग्रेस आपली सत्तेची पोळी भाजून घेत आहे. म्हणूनच, सरसंघचालकांचे हिंदू एकतेचे आवाहन महत्त्वाचे ठरते. काँग्रेसला शिवरायांबद्दल वाटत असलेले प्रेम हे बेगडी, ढोंगी आणि संधीसाधू असल्याचेच आजवर वारंवार दिसून आले आहे. राहुल गांधी यांनी ती परंपरा कायम राखली इतकेच.