"ठाकरेंनी मेव्हण्याला वाचवण्यासाठी जेवढा पाठपुरावा केला तेवढा..."; नितेश राणेंचा घणाघात
04-Oct-2024
Total Views | 84
मुंबई : उद्धव ठाकरेंनी आपल्या मेव्हण्याला वाचवण्यासाठी जो पाठपुरावा केला तेवढा आग्रह मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कधीच केला नाही, असा घणाघात भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यावरून श्रेयवादाची लढाई सुरु असताना नितेश राणेंनी संजय राऊतांचे कान टोचले.
नितेश राणे म्हणाले की, "मोदी सरकारने काल एक ऐतिहासिक निर्णय घेऊन दाखवला. वर्षानुवर्षांची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी पूर्ण केली. अनेक सरकारे आली आणि त्यांनी ही मागणी लावून धरली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून ते देवेंद्र फडणवीसजी आणि आता एकनाथ शिंदेंजींच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रामाणिकपणे ही मागणी लावून धरली होती आणि काल तो ऐतिहासिक निर्णय घेतला गेला."
"पण हा निर्णय घेतल्यानंतर काही लोक आम्हीच केलं बोलायला पुढे आले आहेत. संजय राऊत आणि त्यांचे मालक आमच्यामुळेच हा निर्णय झाला असं म्हणत आहेत. पण जवळपास दहा वर्षे ते भाजपसोबत सत्तेत होते. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या मेव्हण्याला वाचवण्यासाठी जो पाठपुरावा केला, मातोश्री २ साठीच्या परवानगीसाठी जेवढा आग्रह धरला, तेवढा आग्रह मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कधीच केला नाही. त्यांनी जर त्यावेळी तो आग्रह धरला असता तर कदाचित आज श्रेय घेण्याची संधी मिळाली असती," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने केंद्राच्या संपर्कात राहून ही मागणी लावून धरली आणि मोदीजींनी ती पूर्ण केली. त्यामुळे तुम्ही मोदीजी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले पाहिजे. पण त्यांच्याकडून आपण चांगल्याला चांगलं म्हणण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. मराठी माणूस आणि मराठी माणसाचा रोजगार या विषयावर संजय राऊतांनी कमी बोलावं. कारण पत्राचाळीत अस्सल मराठी माणसं राहत होती. तुम्ही ज्यांनी बेघर केलं त्यांचा आधी विचार करा आणि मग मोदीजींना आणि देवेंद्रजींना सल्ले द्या," अशी टीकाही नितेश राणेंनी राऊतांवर केली.