मुंबई, दि.१८ : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात निष्कासन कार्यवाही जोमाने सुरू केली आहे. महानगरपालिकेने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांत म्हणजेच दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर याकालावधीत संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मिळून एकूण ७ हजार ३८९ इतके भित्तीपत्रके, फलक, बॅनर्स, झेंडे हटविले आहेत.
आदर्श आचारसंहिता कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कुठेही अनधिकृतपणे फलक आणि बॅनर्स लावू नयेत. ज्याठिकाणी अनुज्ञेय आहे, त्याठिकाणी विहित परवानगी प्राप्त करून त्यानंतरच जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स प्रदर्शित करता येतील, असे आवाहनदेखील प्रशासनाने केले आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करून व अनधिकृतपणे जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रदर्शित केल्याचे आढळल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये अतिरिक्त मनुष्यबळ तैनात ठेवून सातत्याने अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स इत्यादी प्रचार साहित्यावर निष्कासन कार्यवाही करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४८ तासांत (दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर २०२४) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भित्तीपत्रके (९४२), फलक (८१७), कटआऊट होर्डिंग (५९६), बॅनर्स (३७०३), झेंडे (१३३१) आदी मिळून एकत्रितपणे ७ हजार ३८९ साहित्य अनुज्ञापन खात्याने निष्कासित केले आहे. अनुज्ञापन खात्याच्या चमुमार्फत महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये सातत्याने अशा पद्धतीचे साहित्य निष्कासन कार्यवाही करण्यासाठीच्या सूचना उपायुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी दिल्या आहेत.