नवी दिल्ली : महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे याने झाडलेल्या गोळीने झाली नाही, असा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज रणजित सावरकर यांनी त्यांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकात केला आहे. या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन करण्यात आले.
रणजित सावरकर प्रकाशानंतर पत्रकारपरिषदेत म्हणाले, महात्मा गांधी यांची हत्या ही जगाचे राजकारण बदलणारी घटना होती. त्यांच्या हत्येचा आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लादण्यात आला. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. गांधी हत्येविषयी नेमण्यात आलेल्या कपूर समितीचा अहवाल काँग्रेसने सरकारने स्वीकारला नाही आणि नाकारलादेखील नाही. नथुराम गोडसे याची उलटतपासणीदेखील खटल्यादरम्यान घेण्यात आली नाही, असे सावरकर म्हणाले.
महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने झाली नसल्याचेही सावरकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, नथुराम गोडसेची पिस्तुल ही ९ एमएमची होती, मात्र गांधींच्या जखमांची मापे ही त्याहून लहान आकाराच्या बंदुकीतून झाडलेल्या गोळीची असल्याचे न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन किंवा त्याहून जास्त मारेकऱ्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या प्रकरणाची केंद्र सरकारने नव्याने चौकशी करावी, अशीही मागणी रणजित सावरकर यांनी केली आहे.