मुंबई : माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलण्याची धमक असेल तर ती जास्त योग्य आहे, असे प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहूल नार्वेकरांची निवड केली. यावर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना नार्वेकरांनी हे वक्तव्य केले आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले की, "उद्धव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जग जाहीर आहे. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्या राज्यातील आपल्याच एखाद्या सहकाऱ्याला अखिल भारतीय समितीची जबाबदारी प्राप्त होणे ही राज्यासाठी गौरवशाली बाब आहे. यासंदर्भात शुभेच्छा देऊन विश्वास दर्शवण्याऐवजी आपल्याच सहकाऱ्याबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य हे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाही अशा लोकांकडूनच अपेक्षित आहे."
ते पुढे म्हणाले की, "माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलण्याची धमक असेल तर ती जास्त योग्य आहे. तुम्ही केवळ बिनबुडाची टीका करत आला आहात. मी जो निर्णय दिला त्यात कायदेशीररित्या काय चुका आहेत हे दाखवून देण्याची धमक जितेंद्र आव्हाड, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यापैकी कोणातच नाही," असा निशाणा त्यांनी साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकांवर सुनावणी पार पडली. उद्या आणि परवा यावर अंतिम सुनावणी होणार आहे. याबाबत निर्णय देण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ द्यावा अशी याचिका विधिमंडळ सचिवालयाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १५ फेब्रुवारीच्या आत यावर निर्णय दिला जाईल, अशी माहितीही राहूल नार्वेकरांनी दिली.