मुंबई - सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, असे आवाहन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, तिन्ही सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांच्या वकिलातीमधील वरिष्ठ पदाधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विधानभवनात ध्वजारोहण
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत मुंबईतील विधान भवनात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष नार्वेकर यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या भारतीय प्रजासत्ताकामध्ये सर्वसमावेशी चौफेर विकासाचे उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली गाठले जात असून या प्रगतीत महाराष्ट्र राज्याचा देखील मोलाचा सहभाग असल्याचे स्पष्ट केले. भारतीय राज्यघटना हा आपल्या सर्वाचा प्रेरणास्त्रोत आणि स्फूर्तिस्थान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत ‘महाराष्ट्र स्टुडन्ट चॅलेंज’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील विजेत्या १० उमेदवारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व १ लक्ष रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्काऊट गाईड आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथ संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली.