काही दिवसांपुर्वी 'जी-२०' परिषदेच्यानिमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. त्यावेळी सुनक म्हणाले, हाऊ इज 'यूटी...' मी म्हणालो.'व्हाय...' ('यूटी' म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे) त्यावर सुनक म्हणाले, 'ते' दरवर्षी लंडनला येतात आणि संपत्ती घेतात. थंड हवा खातात आणि भारतात परतात. तुम्ही ब्रिटनला या. तुम्हाला सगळं सांगतो, असं सुनक यांनी मला सांगितलं, हे वाक्य आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच. आणि पुढे ते म्हणाले की, त्यामुळे आमच्यावर टीका करण्याआधी विचार करावा, अन्यथा 'पाटणकर काढा' देण्याची वेळ येईल. आणि तेव्हाच पाटणकर काढा म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडला. काहींना पाटणकर नावाच्या काढ्याची आठवण झाली. पण शिंदेंच्या मिश्किल बोलण्यात पाटणकर काढा म्हणजे ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर होते. यासोबतच काल दिवसभरात श्रीधर पाटणकर यांच्यासह रश्मी ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर ही दोन नाव ही चर्चेत आली.
मुळात काही दिवसांपुर्वी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनक-शिंदे भेटीवर टीका केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. आणि पाटणकर काढ्याची आठवण उद्धव ठाकरेंना करून दिली. त्यामुळे विषयाची सुरुवात आपण मातोश्रीतील महत्त्वाची व्यक्ति असणाऱ्या श्रीधर पाटणकर यांच्या पासून करूया. मुळात श्रीधर पाटणकर हे ठाकरेंचे मेहुणे म्हणजेच रश्मी ठाकरेंचा भाऊ आहे. तसेच पाटणकर व्यवसायाने बिल्डर आहेत. मुंबई आणि ठाण्यात त्यांचं प्रामुख्याने काम चालते. त्याचबरोबर पाटणकर हे सामवेद रिअल इस्टेट एलपीपी या कंपनीत ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह संचालक आहेत. इतकंच काय तर आशर प्रोजेक्ट डीएम एलपीपी ठाकोर लॅंड डिव्हेलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या कंपन्याचे संचालक पद ही श्रीधर पाटणकर यांच्याकडे आहे, अशी माहिती कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवरून मिळते.
तसं पाहायला गेलं तर पाटणकर यांच नाव ईडीने केलेल्या कारवाईनंतर प्रकाशश्रोतात आलं. ही कारवाई मनी लॉंडरिंगच्या एका प्रकरणात करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पातील ११ फ्लॅट जप्त करण्यात आले होते. त्यानंतर श्रीधर पाटणकर यांची चौकशी थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता. तर दुसरीकडे श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली होती. यावरून उद्धव ठाकरेंसाठी श्रीधर पाटणकर किती महत्त्वाचे आहेत. हे स्पषट समजते.
तसंच ज्यावेळी श्रीधर पाटणकर यांची ठाण्यातील संपत्ती ईडीने जप्त केली होती. त्यावेळी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावरच हात टाकल्याचे बोलले जात होते. कारण श्रीधर पाटणकर हे जरी उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे असले तरी, ते मातोश्रीच्या फार जवळचे आहेत. कारण डोंबिवलीकर पाटणकर गेल्या अनेक वर्षांपासून मातोश्री परीसरातच राहतात. आणि त्यामुळे ईडीची ही कारवाई म्हणजे थेट मातोश्रीवरील कारवाई असंच म्हणटलं गेले. त्यामुळेच श्रीधर पाटणकर मातोश्रीवरील महत्त्वाच्या व्यक्तिमधील एक आहेत.त्यानंतर मातोश्रीतील महत्त्वाच्या व्यक्तिमध्ये दुसर नाव येत ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं. मुळात पुर्वीपासूनच रश्मी ठाकरे राजकारणात येऊ इच्छितात अशा चर्चा सुरू आहेत. त्यात कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आल्यास रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्रीपद द्यावं, असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी मांडला असल्याचा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला. तसेच रश्मी ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंना पूरक असते. त्यामुळे त्या राजकारणात येऊ शकतात, असे नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी देताना सांगितले होतं.
दरम्यान पत्रकार परिषदेत काय बोलायचं? याचा रट्टा ही उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंसमोर मारतात,असे ही फडणवीसांनी काही दिवसांपुर्वी जाहिर सभेत सांगितलं. त्यामुळे ठाकरेंच्या राजकीय भूमिकेत रश्मी ठाकरेंचा मोठा वाटा असतो, हे दिसून येत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पक्ष टिकवण्यासाठी रश्मी ठाकरेंच वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन पक्ष बांधणीसाठी काम करणेच. रश्मी ठाकरेंच मातोश्रीवरील महत्त्व लक्षात आणून देते.त्यानंतर तिसरं नाव येत मिलिंद नार्वेकर यांच. मिलिंद नार्वेकर हे अनेकांना परिचयांच आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक म्हणून मिलिंद नार्वेकर अनेकांना परिचयाचे असले तरी मातोश्रीवरून राजकीय सूत्र हलवण्यात त्यांचा मोठा हात आहे. दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरेंना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.
'सीएम साहेबांना भेटायचं आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नव्हते;' असे पत्र शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लिहले होते. त्यावरून मिलिंद नार्वेकरांचा मातोश्रीवर किती दबदबा होता , हे दिसतं. मुळात मिलिंद नार्वेकरांचा प्रवास पाहिला तर कळत की, मिलिंद नार्वेकर साधे शिवसैनिक होते. ९२च्या महापालिका निवडणुकांआधी नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने ते मातोश्रीवर गेले. पण त्यांची हुशारी पाहुन नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरले. आणि मग सुभाष देसाईंचं बोट पकडून मिलिंद नार्वेकरांना सेनेत सक्रीय केलं. आणि त्यानंतर मातोश्रीवरील पडेल ती कामे मिलिंद नार्वेकर करू लागले. आणि पुढे जाऊन नार्वेकर उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक म्हणून रुजू झाले.त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांचे मातोश्रीवरील वजन वाढत गेले. आणि उद्धव ठाकरेंची भेट घेण ही कार्यकर्त्यांना अवघड झालं. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेच्या बंडावेळी शिंदे गटाने संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकरामुळे मातोश्री सोडल्याचं अनेक वेळा सांगितलं. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास श्रीधर पाटणकर, रश्मी ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच मातोश्रीवरील महत्त्व आपल्या लक्षात येत. तरी या तीन नावाव्यतिरिक्त असं कोणत नाव आहे, ज्याची चर्चा मातोश्रीवर होतं असते. ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.