मुंबई : केंद्र सरकार एक देश, एक निवडणूक देशात राबवण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या संकल्पनेवर विरोधकांची आगपाखड होताना दिसत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक देश एक निवडणूक महत्वाची असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. मोदींच्या नेतृत्वात देशाचा मोठा विकास झालाय. मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. लोकसभेची निवडणूक हे आमचं पहिलं टार्गेट असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवार म्हणाले, "एक देश, एक टॅक्सचा कायदा अंमलात आणताना देखील अशा गोष्टी घडल्या होत्या. काही राज्य विरोध करतातच. विरोधकांचं काम हे विरोध करण्याचंच आहे. पण सर्वसामान्य व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर मला स्वत: आणि माझ्या पक्षाला असं वाटतं की, एक देश आणि एक निवडणूक ही संकल्पना खूप चांगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन-तीन वेळा याबाबत मुद्दा मांडला होता. याबाबत समिती गठीत केली आहे आणि त्यांचा प्रस्ताव समोर येईल."
"इंडिया आघाडीचं विरोध करणं हेच काम आहे. यापूर्वी जीएसटीला विरोध केला होता. केंद्राने स्थापन केलेली समिती त्यांचा अहवाल सादर करेल. आम्हाला महायुतीला अधिक मजबूत करायचं आहे. शिंदे, फडणवीस आणि मी चर्चा करणार आहोत. महायुती आणि एनडीला मजबूत करण्यासाठी बैठक आहे. निवडणुका आल्यावर आचारसंहिता लागते. आचारसंहिता लागू झाल्यावर प्रशासकीय कामं थांबतात. यामुळे विकासकामांवर मोठा परिणाम होतो. देशात एकच निवडणूक झाल्यास हिताचं असेल." असं अजित पवार म्हणाले.