नवी दिल्ली : राज्यातील अमली पदार्थविरोधी कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी लागेल, असा इशारा पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिला आहे.
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यातील वादाला आता नवे वळण लागले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना इशारा दिला आहे की त्यांनी अधिकृत संप्रेषणाला प्रतिसाद न दिल्यास ते राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. राजभवनाने मागितलेली माहिती राज्य सरकार देत नसल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. हा घटनात्मक कर्तव्याचा अपमान आहे. सोबतच कृती अहवाल न पाठवल्यास कायदा आणि संविधानानुसार कारवाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे त्यांनी लिहिले आहे.
राज्यपाल पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पंजाबमध्ये अमली पदार्थांचे व्यसन शिगेला पोहोचले आहे. तपास यंत्रणांच्या अहवालानुसार राज्यातील औषधांच्या दुकानातही अमली पदार्थ उपलब्ध आहेत. राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या दारूच्या दुकानांमध्येही अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. संसदेच्या स्थायी समितीच्या नुकत्याच आलेल्या अहवालात पंजाबमध्ये दर पाचपैकी एक व्यक्ती अंमली पदार्थांचे व्यसनी असल्याचे नमूद केले आहे. ही वस्तुस्थिती पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकडे निर्देश करते.
आता राज्यातील गावकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली असून अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचण्यासाठी त्यांनी स्वत:च्या ग्रामसंरक्षण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना अमली पदार्थाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने केलेल्या कारवाईचा अहवाल तातडीने त्यांच्या कार्यालयात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.