मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद
22-Aug-2023
Total Views | 74
मुंबई : राज्यात कांद्याच्या प्रश्नावरुन वातावरण तापलेले असताना, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय दिला. 2410 रुपये प्रति टन दराने कांदा खरेदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्रीवर पत्रकार परिषद घेतली. केंद्राच्या निर्णयाचं स्वागत करावं, राजकारण नको. असं शिंदे म्हणाले. तर, श्रेयवादापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देणार. असं पवारांनी म्हटलं आहे.
गरज भासल्यास राज्याला पुन्हा मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मी देखील अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल, अशी खात्री केंद्र सरकारनं दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आमची केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा झाली. शेतकरी अडचणीत येतो, तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहतं. हे आतापर्यंत आपण पाहिलं आहे. जेव्ही अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीट झाली, तेव्हा सरकारने सर्व नियम बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं राहिलं. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. आता या मोठ्या संकटामध्ये देखील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. असं शिंदे म्हणाले.
इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करत आहोत. कांद्याची साठवणूक क्षमता कशी वाढवता येईल, या दृष्टीने चर्चा झाली. काही निर्णय घेतले, त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कांदा चाळी वाढवणं, त्यांचा अनुदान वाढवणं, तसेच मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून नाशवंत वस्तू जास्तीत जास्त टिकवण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेतले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
शरद पवारांना प्रत्त्युत्तर...
पहिल्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, यासाठी 2410 रुपये प्रति क्विंटल हा भाव दिला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. केंद्राने निर्णय घेतलाय, सहकार्य केलंय. राज्य सरकार देखील यामध्ये कुठे मागे राहणार नाही. यामध्ये राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायला हवं. शरद पवारांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हाही असा निर्णय सरकारने घेतला नव्हता. पण, आता मोदी सरकारने मदत केली. त्यामुळे यामध्ये राजकारण करु नये. केंद्र सरकारकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना प्रत्त्युत्तर दिलं आहे.