आता समृद्धी महामार्गावर शून्य अपघात उपाययोजना राबविणार : मंत्री दादाजी भुसे
21-Jul-2023
Total Views | 30
नागपूर : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अविकसित भागाच्या समतोल विकासाचा राजमार्ग असून या महामार्गावरील अपघातसत्र आता थांबणार आहे. राज्य सरकारकडून हे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान, जगातील उत्तमात उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून या महामार्गावर अपघात होणारच नाहीत, अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
ते म्हणाले, विदर्भ, मराठवाडा आदी मागास भागांच्या विकासासाठी या मार्गाची निर्मिती करण्यात आली असून जगातील एक महत्त्वाचा महामार्ग महाराष्ट्रात आकाराला येत आहे. अद्याप हा महामार्ग मुंबईपर्यंत पूर्ण व्हायचा आहे. एकदा हा महामार्ग आपल्या पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी यांनी घेतलेले परिश्रम, त्याची फलश्रृती व उभय नेते या रस्त्याबाबत का गंभीर आहेत हे दिसून येतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या रस्त्याची पाहणी झाल्यानंतर काही धोरणे ठरविण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी तातडीने करा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच, नियमाने चालणारे वाहन चालक, उद्योग व्यापार क्षेत्रातील दिग्गज रस्त्याचे कौतुक करतात. त्यामुळे प्रसंगी कडक शिस्त लावण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीला या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव, ए.बी. गायकवाड, एस.एस मुराडे, मुख्य महाव्यवस्थापक भारत बास्तेवाड, मुख्य अभियंता एस.के. सुरवसे, निशिकांत सुके, सुरेश अभंग, भूषण मालखंडाळे आदी उपस्थित होते.