२०२१ सालचा गांधी शांतता पुरस्कार गोरखपूरच्या ‘गीता प्रेस’ला जाहीर होताच, काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे पोटशूळ उठला. ‘गीता प्रेस’ला पुरस्कार म्हणजे घोर फसवणूक असून जणू सावरकर आणि गोडसेंना हा पुरस्कार दिल्याची असबद्ध टीकाही काँग्रेसने केली. यानिमित्ताने पुनश्च काँग्रेसचा हिंदूद्वेष्टा चेहरा समोर आलाच. शिवाय काँग्रेसने भारतीय सनातन संस्कृती, गांधी-टिळकांचे गीताविषयक विचार या सगळ्यांनाच त्यांच्या अधर्मी अजेंड्यातून कायमचीच तिलांजली दिली आहे.
जेव्हा कधीही शंकांनी मी ग्रासला जातो आणि जेव्हा निराशा माझ्या चेहर्यावर झळकू लागते, तेव्हा मी भगवद्गीतेकडे एक आशेचा किरण म्हणून पाहतो. गीतेमध्ये मला एक छंद सापडतो, जो मला सांत्वना प्रदान करतो. मी कष्टात असताना माझ्या चेहर्यावर हास्य उमटते.” महात्मा गांधी यांनी भगवद्गीतेविषयी उद्धृत केलेले हे थोर विचार. याच महात्मा गांधींच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘गांधी शांतता पुरस्कार’ गोरखपूरच्या जगप्रसिद्ध ‘गीता प्रेस’ला जाहीर झाला. ‘गीता प्रेस’ने हा पुरस्कार स्वीकारला असला तरी त्याची एक कोटींची पुरस्कार राशी मात्र स्वीकारणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. कारण, ‘गीता प्रेस’चा आजवरचा कारभार हा देणगी-दान न स्वीकारता अगदी अव्याहतपणे सुरू आहे. गेल्या १०० वर्षांपासून ‘गीता प्रेस’ अविरतरणे सनातन धर्मसाहित्याची छपाई तसेच सामाजिक, धार्मिक कार्यातही अग्रेसर.
१९२३ साली स्थापना झालेल्या अशा या ‘गीता प्रेस’चे हे शताब्दी वर्ष. जयदयाल गोयंका, घनश्यामदास जालान, हनुमान प्रसाद पोद्दार यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये सनातन धर्माचे कालातीत विचार लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी धर्मांतर करू नये, या उद्देशाने स्वस्तात धार्मिक पुस्तके उपलब्ध करण्याच्या हेतूने ‘गीता प्रेस’ची स्थापना केली. काही कार्यकर्त्यांनी या कार्यासाठी आपली जमीन दिली, तर कोणी आपले अवघे आयुष्य या धर्मकार्यासाठी समर्पित केले. गीताभवन, गीता सेवा दल, आयुर्वेद संस्थान, वैदिक विद्यालय यांसारख्या माध्यमातूनही ‘गीता प्रेस’ आपले ‘अहर्निशं सेवामहे’ हे व्रत आजही जोपासत आहे. कोविड काळातही गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिला. विशेष म्हणजे, हे सगळे कार्य कुठलीही जाहिरातबाजी न करता, देणग्या न स्वीकारता अविरतपणे सुरू आहे.
आजवर ‘गीता प्रेस’ने त्यांच्या १०० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तब्बल ४१.७ कोटी पुस्तकांची विक्री केली असून, त्यापैकी १६.२१ कोटी पुस्तकांच्या प्रती या एकट्या भगवद्गीतेच्या आहेत, हे विशेष. केवळ गीताच नाही, तर तुलसीदासांचे रामचरितमानस, वेद, उपनिषदे, रामायण, अवघ्या दोन रुपयांत उपलब्ध असलेला हनुमान चालीसा अशी या ‘गीता प्रेस’ची धर्मसंपन्न साहित्य संपदा आणि हे सगळे साहित्य ‘गीता प्रेस’ उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये असल्यामुळे हिंदीमध्येच उपलब्ध नसून, तब्बल १४ भाषांमध्ये पाहायला मिळते. या शंभरी गाठलेल्या संस्थेचे संकेतस्थळही कार्यरत असून त्यावरही तीन हजार पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. २०१६ साली ३९ कोटींची विक्री नोंदवणार्या गीता प्रेसने २०२२ साली १०० कोटींच्या विक्रीचा टप्पाही ओलांडला. म्हणजेच ‘जीएसटी’, नोटाबंदी, कोरोना महामारी, महागलेली छपाई अशा कोणत्याही बदलांचा परिणाम ‘गीता प्रेस’ला आपल्या दायित्वपूर्तीपासून रोखू शकला नाही. त्यामुळे खरं तर अशा या ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्वप्राप्त प्रकाशन संस्थेचा आणि तोही ‘गांधी शांतता पुरस्कारा’ने गौरव होणे, ही समस्त भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब. परंतु, दुर्दैव हेच की, जी भगवद्गीता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांसारख्या काँग्रेसच्या एकेकाळच्या दिग्गजांच्या जीवनातील प्रेरणास्थान होती, जी गीता नेहमी सुभाषबाबूंच्या खिशात असायची, त्याच गीतेच्या प्रचार-प्रसार करणार्या प्रकाशन संस्थेला आज काँग्रेसकडून अनाठायी विरोध होताना दिसतो.
खरं तर महात्मा गांधींच्या १२५व्या जन्मवर्षानिमित्त १९९५ पासून ‘गांधी शांतता पुरस्कारा’चा पायंडा पडला. त्यातही केवळ भारतीय व्यक्तीच नव्हे, तर जगातील कुठल्याही देशाचे नागरित्व बाळगणारी व्यक्ती, जात-धर्म-लिंगभेदापलीकडे या पुरस्कारासाठी पात्र ठरते. तसेच, उल्लेखनीय कार्य करणार्या संस्थांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. म्हणजे अगदी पहिला पुरस्कार टांझानियाचे नेते ज्युलियस यांना प्रदान करण्यात आला. तसेच, ‘रामकृष्ण मिशन’, ‘इस्रोे’, ‘भारतीय विद्या भवन’, ‘विवेकानंद केंद्र’, ‘सुलभ इंटरनॅशनल’ यांसारख्या संस्थाही या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. विशेष म्हणजे, २०१९ साली ओमानचे सुलतान कबूस बिन सईद अल सईद यांना आणि २०२० साली बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबुर रेहमान यांनाही त्यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाबद्दल ‘गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर झाला होता. याचाच अर्थ, मोदी सरकारने हे पुरस्कार जाहीर करताना कोणताही भेदाभेद केला नाही. याउलट संपुआच्या कालखंडावर नजर टाकली असता, गांधींचे नाव उठसूठ घेणार्यांनी, त्यांचाच वारसा मिरवणार्यांनी २००६-२०१२ या कालावधीत हे पुरस्कारच जाहीर करण्याचे साधे औदार्यही दाखवले नाही. म्हणजे एकीकडे मुस्लीम लीगला सेक्युलर मानणारी, ‘पीएफआय’सारख्या दहशतवादी संघटनेला पाठीशी घालणार्या याच काँग्रेसला ‘गीता प्रेस’ ही पुरस्कार्थी म्हणून खटकावी, यातच सर्व काही आले.
म्हणजेच काय तर ज्याप्रकारे ब्रिटिशांनी भारतीय संस्कृती, हिंदू धर्म-परंपरा यांना कुत्सितपणे, कुटीलपणे चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला, त्याचीच री काँग्रेसनेही ओढली. काँग्रेसचा हा हिंदूद्वेष म्हणा आजचा नाहीच. रामायणाचे अस्तित्व अमान्य करण्यापासून ते रामसेतूला काल्पनिक म्हणणे असो की राममंदिराला विरोध, काँग्रेसने कायमच हिंदू आस्था, प्रतीके, पवित्र धर्मग्रंथ यांचे अस्तित्व सदैव नाकारले. देशातील बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या धार्मिक भावनांशी सदैव खेळ केला. अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करून मतपेढीच्या राजकारणाला खतपाणी घातले. हे सगळे कमी की काय म्हणून, ‘२६/११’च्या पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतरही ‘हिंदू दहशतवाद’ नावाचे कुभांड रचले. म्हणजेच हिंदूंच्या आस्थांना पायदळी तुडवण्याचे, त्यांना गृहीत धरण्याचेच उद्योग काँग्रेसने आजवर केले. आताही कर्नाटकमध्ये सत्तेत आल्या आल्या तेथील धर्मांतरबंदी कायदा काँग्रेसने रद्दबातल ठरवला. गोहत्या, हिंदूंचे धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’ हे विषय तर काँग्रेसच्या लेखी आजही काल्पनिक असून ते त्यांच्या खिसगणतीतही नाहीत. पण, २०१४ पासून हिंदुत्ववादी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेसनेही ‘आम्ही हिंदूविरोधी नाही,’ हे दाखविण्याचाही भरपूर आटापिटा केला. मंदिरांच्या वार्या केल्या, पूजाअर्चांची नाटकं रचली, गंगेला आरती ओवाळली.... पण, हे केवळ मतप्राप्तीसाठी रचलेले दिखाऊ, ढोंग होते, हे काँग्रेसने ‘गीता प्रेस’ला केलेल्या विरोधातून अधोरेखित व्हावे.
त्यामुळे काँग्रेसची ही पोटदुखी ‘गीता प्रेस’पुरती मर्यादित नक्कीच नसून, भगवद्गीतेला, गीतेतील सर्वोच्च तत्वज्ञानाला, गीतेनुसार वाटचाल करणार्या प्रत्येकाचीच काँग्रेसने अवहेलना केली आहे. पण, काँग्रेसला गीतेवर तसूभरही विश्वास नसला तरी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला खालील उपदेश मात्र त्यांनी सदैव स्मरणात ठेवावा-
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४-८॥