मुंबई : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून बुधवार, दि. १० मे आणि गुरुवार, दि. ११ मे रोजी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणार्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
बुधवारी महानगरपालिकेच्या ‘सी’ प्रभागमध्ये कॉन्फरन्स हॉल, सी विभाग कार्यालय, चंदनवाडी, मरीन लाईन्स येथे, तर गुरुवारी ‘डी’ प्रभागमध्ये कॉन्फरन्स हॉल, डी विभाग कार्यालय, ग्रँट रोड (प.) येथे सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत दीपक केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमास पालकमंत्री यांच्यासोबत संबंधित विभागांचे लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.