’जनकल्याण’च्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीच्या पाऊलखुणा!

    06-May-2023
Total Views | 152
janakalyan-Samiti

भैय्याजी जोशी आणि सुहासराव हिरेमठ यांचे मनोगत जनकल्याण समितीच्या प्रयोजनाचे आणि वाटचालीचे मर्म सांगणारे. प्रस्तुत स्मरणिका जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा मागोवा घेते. मात्र, त्याचे तेवढेच महत्त्व नाही. हजारो कार्यकर्ते अशा सेवाकार्यांत स्वतःस निरपेक्षपणे झोकून देतात; आपल्या तज्ज्ञतेचे क्षेत्र नसूनही अशी सेवाकार्ये देखील संघटनेच्या आणि तळमळीच्या जोरावर साकार करून दाखवितात आणि हे सगळे करीत असताना कोणताही गाजावाजा करीत नाहीत, हा यातील सर्वाधिक लक्षणीय भाग. गेल्या ५० वर्षांत जनकल्याण समितीची सेवाकार्ये उभी राहताना त्यांत किती मोठ्या प्रमाणावर ध्येयवेडे आणि समर्पित कार्यकर्ते, स्वयंसेवक सहभागी झाले असतील, याची जाणीव ही स्मरणिका करून देते.
 
पुण्यात ‘सेवाभवन’ ही आठ मजली वास्तू उभी राहिली आहे. पुण्यात पुणे आणि अन्य जिल्ह्यांतून अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर येणार्‍या नातेवाईकांची राहण्याची आणि चहा-भोजनाची सवलतीच्या दरात व्यवस्था ‘सेवाभवन’मध्ये करण्यात येणार आहे. याच ‘सेवाभवना’त डायलिसिस केंद्रही आहे. गरजू रुग्णांसाठी अल्पदरात ही सुविधा लवकरच सुरु होईल. रा. स्व. संघ जनकल्याण समितीने महाराष्ट्रभर ज्या सेवाप्रकल्पांचे जाळे गेल्या ५० वर्षांत विणले आहे, त्यात ही नवी भर. ‘सेवाभवना’ची माहिती जनकल्याण समितीचे संघटनमंत्री शरद खाडिलकर आणि प्रांत सरकार्यवाह विनायक डंबीर यांनी आस्थेने दिली आणि त्याचवेळी ’अहर्निशं सेवामहे’ ही सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेली स्मरणिकाही दिली. जनकल्याण समितीचा ५० वर्षांचा प्रवास या दस्तावेजात शब्दबद्ध करण्यात आला आहे. तो करताना त्याला अनेक छायाचित्रांची जोड आहे. तसा त्या त्या वेळच्या बैठकांमधील नोंदींचाही अंतर्भाव आहे. त्यावरून त्यावेळच्या कार्यकर्त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. पाच दशकांमधील माहितीचे संकलन करणे सोपे नसते. मात्र, दीनदयाळ वैद्य आणि मिलिंद वाडेकर यांनी हे जटिल काम मेहनतीने पूर्ण केले आहे. त्यामुळेच जनकल्याण समितीच्या या दीर्घकाळच्या नि:स्वार्थ सेवेचा हा दस्तावेज सर्वांसमोर येऊ शकला आहे.
 

janakalyan-Samiti

सुमारे २०० पृष्ठांचा हा घसघशीत दस्तावेज आहे आणि पाच विभागांतून ही मांडणी करण्यात आली आहे. त्याची सुरुवात जनकल्याण समितीच्या प्रारंभीचा काळ उभा करण्यापासून होते. १९७२च्या दुष्काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-महाराष्ट्र दुष्काळ विमोचन समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या बैठकीचा वृत्तांत स्मरणिकेत आहे. या समितीतर्फे मदतकार्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत सुरु झाले; मात्र ती समिती तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना फारशी रुचली नव्हती. सरकार असताना ही निराळी समिती कशासाठी, असा त्यांचा सवाल होता. मात्र, प्रल्हादजी अभ्यंकर त्यांना भेटले आणि सरकारला जे करता येणार नाही, ते ही समिती करेल, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. दुष्काळाच्या दोन वर्षांच्या काळात समितीने दुधवाटपापासून भोजनगृहे, पुस्तकपेढ्या, दत्तक कुटुंब योजना अशा विविध प्रकारचे सेवाकार्य केले. तात्पुरत्या उपाययोजनांबरोबरच स्थायी कामांची योजना करण्याची दिशा या समितीला १९७३च्या बैठकीत मिळाली. सेवाकार्य हे काही दुष्काळापुरते मर्यादित राहाणार नाही, याची जाणीव ठेवून समितीच्या उद्देशांत नव्या विषयांचा समावेश करण्यात आला. १९७३ साली बाळासाहेब देवरस सरसंघचालक झाल्यानंतर एकूणच सेवाकार्यांवर भर देण्यात आला आणि जनकल्याण समितीच्या स्थापनेला त्याच सुमारास चालना मिळाली.
 
जनकल्याण समितीची बीजे होती ‘दुष्काळ विमोचन समिती’च. मात्र, १९७९ साली ‘दुष्काळ विमोचन समिती’चे नामकरण ‘जनकल्याण समिती’ करण्याचे निश्चित झाले. नावात रा. स्व. संघ असावे का, यावर खल झाला. या मंथनात जे सहभागी होते, त्यांची नावे पाहिली तरी संघाचे नेतृत्व किती तपशीलात जाऊन कोणत्याही बाबीचा विचार करते, याचा प्रत्यय येईल. तसेच कोणतेही नवे कार्य सुरु करताना ‘संघ’ त्याच्या पाठीशी किती भक्कमपणे उभा राहतो, हेही स्पष्ट होईल. मोरोपंत पिंगळे, बाबाराव भिडे, प्रल्हादजी अभ्यंकर, रामभाऊ म्हाळगी, दामुअण्णा दाते, वसंतराव भिडे प्रभृती या मंथनात सहभागी होते. संघाच्या नावाची जोड दिली की जनकल्याण समितीला विश्वासार्हता, प्रतिष्ठा प्राप्त होईल, हा त्यामागील विचार. त्यानंतर जनकल्याण समितीचा व्याप सतत वाढत गेला आहे आणि गेल्या ५० वर्षांत असंख्य सेवाकार्ये उभी राहिले आहेत. त्यांचा मागोवा या स्मरणिकेत घेण्यात आला आहे.


janakalyan-Samiti 
तो घेताना केवळ रुक्ष आकडेवारी किंवा जंत्री असे त्याचे स्वरूप नाही. जनकल्याण समिती आकार घेताना, सेवाप्रकल्पांची उभारणी करताना आलेल्या आव्हानांची, आलेल्या अनेक अनुभवांची माहिती यात आहे. ती इतकी बोलकी आहे की, जनकल्याण समितीने आजवरचा प्रवास किती खाचखळग्यातून तरीही कल्पकतेने, मात्र सेवेच्या बाबतीत नि:स्वार्थपणे आणि निरलसपणे केला आहे, याचे दर्शन पानोपानी घडेल. ही सेवाकार्ये आता समाजातील वस्तुपाठ ठरले आहेत; मात्र त्यांची बीजे कोणती, याची माहिती यातून मिळेल. कोणत्याही संस्थेला आर्थिक पाठबळ लागतेच; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे असते ते मनुष्यबळ! तोच कामाचा आधार असतो. सुरुवातीस संघाचे कार्यकर्ते हेच जनकल्याण समितीचे कार्यकर्ते होते. मात्र, सेवाकार्यासाठी लागणारी मनोभूमिका निराळी असते. त्यामुळे जनकल्याण समितीला समर्पित कार्यकर्ते मिळावेत म्हणून केलेली धडपड या समरणिकेत विशद करण्यात आली आहे. पुढे सेवाव्रती कार्यकर्त्यांची फळी कशी उभी राहिली, हेही विशद करण्यात आले आहे. संघाची जबाबदारी नसलेले, मात्र सेवाभावी वृत्ती असणार्‍या कार्यकर्त्यांचा शोध सुरु झाला आणि त्यादृष्टीने तालुका स्तरावर कार्यकर्त्यांचा ‘जनकल्याण समूह’ तयार करण्यात आला. सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत असे ३२ समूह तयार झाले आहेत. बैठका,अभ्यासवर्ग, अधिकार्‍यांचे प्रवास यांतून कार्यकर्त्यांचे जाळे आकार घेऊ लागले.

समाजात सेवाकार्याससाठी आर्थिक मदत करण्याची मानसिकता असलेले अनेक दाते होते. जनकल्याण समितीने कमावलेल्या विश्वासार्हतेमुळे अनेक दाते पुढे आले. त्यातून अनेक सेवाकार्यांना चालना मिळाली. अशा सेवाकार्यांचा मागोवा स्मरणिकेत घेण्यात आला आहे. पुण्यानंतर नाशिक, नगर, ठाणे येथील रक्तपेढींच्या वाटचालीवर स्मरणिकेत दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. यातील अनेक अनुभवही हृद्य असेच आहेत. नाशिक रक्तपेढीच्या नावात रा. स्व. संघाचे नाव असल्याने काही मुस्लीम तरुणांना आपल्याला रक्त मिळेल का, याविषयी शंका होती. ‘हम को यहाँ खून मिलेगा क्या?’ या त्यांच्या प्रश्नाला ‘जरूर मिलेगा’असे उत्तर रक्तपेढीकडून देण्यात आले. नाशिकच्याच रक्तपेढीने एकदा नाशिकच्या चर्चमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले होते. नगरच्या रक्तेपेढीत २००५ साली रक्तविघटनाची सुविधा सुरु झाली आणि रोटरी संस्थेकडून १२ लाखांचे अर्थसाहाय्य मिळाले. ठाण्याच्या रक्तपेढीने २०२० साली करोना काळात ७६९ रक्तपिशव्यांचे रक्तसंकलन केले.

पनवेलचे डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय, अनेक वनवासी पाड्यांवर आरोग्यरक्षक योजना, आरोग्य केंद्रे अशा सेवाकार्यांच्या माध्यमातून शेकडो जणांनी स्वतःस समाजाच्या सेवेत झोकून दिले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात देखील जनकल्याण समितीने मूलभूत सेवाकार्ये सुरु केली आहेत. १९९३ सालच्या विध्वंसक भूकंपांनंतर भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहावे म्हणून लातूरला वसतिगृहाची केलेली व्यवस्था असो किंवा त्याच वसतिगृहाचे रूपांतर कायमस्वरूपी निवासी विद्यालयात करण्याचा निर्णय असो; त्यामागील भावना ही समाजाविषयीच्या तळमळीचीच! ‘वसतिगृहात भोजन घरच्यासारखे असावे; पण घरच्या जेवणाला विद्यार्थ्याने नावे ठेवावीत असे नसावे’ अशी मौलिक सूचना भैय्याजी जोशी यांनी केली होती, हा उल्लेख महत्त्वाचा. या जनकल्याण निवासी विद्यालयाची कहाणी स्मरणिकेत विस्ताराने कथन केली आहे. फिरत्या विज्ञान प्रयोगशाळांपासून बालकामगार शाळा, अभ्यासिका, संस्कार वर्ग, किशोरी विकास प्रकल्प, बहुविकलांग मुलांसाठी ’संवेदना’ प्रकल्प, मेघालयातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातील जनकल्याण निवासी विद्यालयात शिक्षणसासाठी व्यवस्था करण्यापासून समितीच्या अंतर्गत पूर्वांचल विकास विभागाची झालेली स्थापना, किल्लारी भूकंपानंतर मदत आणि पुनर्वसनाच्या सबबीखाली धर्मांतराची सुरु झेली मोहीम आणि त्याला समितीने भारतमाता मंदिर प्रकल्पाच्या माध्यमातून दिलेले उत्तर, अशी अनंत सेवाकार्ये गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत उभी राहिली आहेत. त्यांचा धावता आढावा घेण्याबरोबरच त्या सेवाकार्यांचा दृश्य परिणामही नोंदविण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या काळात जनकल्याण समितीच्या वतीने शिधा किट आणि भोजन पाकिटांचे संकलन-वितरण करण्यात आलेच; पण समिती संचालित कोविड केअर सेंटरमध्ये शेकडो रुग्णांनी उपचार घेतले आणि सहाशेहून अधिक कार्यकर्ते तेथे सक्रिय होते.

सेवाकार्याच्या आकारावरून त्याचे मोल ठरत नाही; तर त्याच्या परिणामकारकतेवरून ठरते. जनकल्याण समितीने हाच दृष्टिकोन ठेवला आहे. जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी नमूद केल्याप्रमाणे २००० साली सेवाकार्यांची संख्या २०० होती; ती वाढत जाऊन आता १८७५ पर्यंत पोहोचली आहे. या वाटचालीतील महत्त्वाच्या टप्प्यांचे दर्शन प्रस्तुत स्मरणिका घडविते. भैय्याजी जोशी आणि सुहासराव हिरेमठ यांचे मनोगत जनकल्याण समितीच्या प्रयोजनाचे आणि वाटचालीचे मर्म सांगणारे. प्रस्तुत स्मरणिका जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा मागोवा घेते. मात्र, त्याचे तेवढेच महत्त्व नाही. हजारो कार्यकर्ते अशा सेवाकार्यांत स्वतःस निरपेक्षपणे झोकून देतात; आपल्या तज्ज्ञतेचे क्षेत्र नसूनही अशी सेवाकार्ये देखील संघटनेच्या आणि तळमळीच्या जोरावर साकार करून दाखवितात आणि हे सगळे करीत असताना कोणताही गाजावाजा करीत नाहीत, हा यातील सर्वाधिक लक्षणीय भाग. गेल्या ५० वर्षांत जनकल्याण समितीची सेवाकार्ये उभी राहताना त्यांत किती मोठ्या प्रमाणावर ध्येयवेडे आणि समर्पित कार्यकर्ते, स्वयंसेवक सहभागी झाले असतील, याची जाणीव ही स्मरणिका करून देते. पु. ल. देशपांडे यांनी वेगळ्या संदर्भात म्हटल्याप्रमाणे, ‘या स्मरणिकेतून लढा दिसतो; पण लढवय्ये दिसत नाहीत.’ तथापि, हेही खरे की अशी आत्मविलोपी वृत्ती हेच स्थायी कार्याचे वैभव असते!

 
 
-राहूल गोखले



अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पक्षातर्फे जागतिक योग दिवस कल्याण पश्चिमध्ये उत्साहात साजरा माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी

भारतीय जनता पक्षातर्फे "जागतिक योग दिवस" कल्याण पश्चिमध्ये उत्साहात साजरा माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी

निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजेच योगाभ्यासानिमित्त संपूर्ण जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचे निमित्त साधून भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाचही मंडलांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या या मंडलांमध्ये झालेल्या 30 हून अधिक कार्यक्रमांमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121