जम्मू-काश्मीरमधील वादग्रस्त ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर खोर्यामध्ये अक्षरशः आग लागेल, अशा वल्गना करणारे फुटीरतावादी नेते आज मंदिरात जाऊन प्रसादाच्या रांगेत थांबताना दिसतात, तर जम्मू-काश्मीरमधील युवक हा रोजगाराच्या नवनव्या संधी मिळवताना दिसून येतो. भारताचे हे नंदनवन विकासाच्या मार्गात आपले पुरेपूर योगदान देताना दिसते.
जम्मू-काश्मीरसाठीचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. येत्या वर्षासाठी १ लाख, ४० हजार, ५०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यात भांडवली खर्चच ४० हजार कोटींपेक्षा जास्त आहे, हे महत्त्वाचे. राज्याचा ‘जीडीपी’ दहा टक्के इतका राहील. तसेच, येत्या पाच वर्षांत तो दुपटीने वाढेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेशाची आर्थिक वाढ १४.६४ टक्के इतकी झाली असून, कर संकलनही ३१ टक्क्यांनी वाढले आहे. तसेच काश्मीर खोर्यात मागील तीन वर्षांत ५०० ‘स्टार्टअप’ उभे राहिले आहेत, ही बाब नक्कीच उत्साहवर्धक अशी. खोर्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारली असल्यानेच, गेल्या वर्षी १.८८ कोटी पर्यटकांनी खोर्याला भेट दिली. येत्या काळात हा आकडा कित्येक पटीने वाढेल, असे म्हणता येते. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना या सर्वाधिक जम्मू आणि काश्मीरमध्ये राबवण्यात येत आहेत, असेही दिसून येते.
‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजना’ असो वा ‘आझादी का अमृत महोत्सव’ असो, जम्मू आणि कश्मीरमध्ये या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेतला गेलेला दिसून येतो. बहुतांश ‘सामाजिक सुरक्षा योजना’ या येथे संपृप्त झाल्या आहेत. यातच सारे आले. यंदाच्या वर्षी चित्रपटाच्या अथवा मालिकेच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी देखील नंदनवनाला प्राधान्य दिले. म्हणूनच जवळपास तीन दशकांनंतर आता पुन्हा चित्रपटातून भूलोकीचे हे नंदनवन रसिकांच्या भेटीला येईल. पण, हा सगळा क्रांतिकारी बदल एकाएकी घडलेला नाही. त्यासाठीची जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती केंद्राने दाखवली आणि त्यानंतर इतिहास घडून आला.‘कलम ३७०’ हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीर खर्या अर्थाने आता कुठे स्वतंत्र झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या काही वर्षे आधी त्याला खरे स्वातंत्र्य मिळाले. मात्र, मिळालेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा जम्मू-काश्मीरने घेतलेला दिसून येतो. ‘आत्मनिर्भर भारत’ यात जम्मू आणि काश्मीर आपले संपूर्ण योगदान देत आहे.
‘कलम ३७०’ हटवल्यानंतरच खर्या अर्थाने येथे विकासाची रुजवण झाली. तरुणांमध्ये जगलेला विश्वास त्यांना उद्योग-व्यवसायासाठी प्रवृत्त करू लागला. नवनवे उभे राहणारे ‘स्टार्टअप्स’ हे त्यांच्या विश्वासाचे प्रतीक. त्यामुळेच येत्या काही काळात काश्मीर हा उद्योगाचे प्रमुख केंद्र बनला, तर त्यात कदापि आश्चर्य वाटायला नको. उद्योगाला आवश्यक अशा पायाभूत सुविधा तेथे उभारल्या गेल्या. कच्च्या मालासाठी तसेच विक्रीसाठी रस्ते मार्गाचा, रेल्वेचाही पर्याय उभारण्यात आला. कोणी एकेकाळी केवळ पर्यटन हाच येथील प्रमुख रोजगार होता. तेथे आज ‘स्टार्टअप’ कंपन्या उभारल्या जात आहेत, ही बाब बदलत्या भारताला साजेशी अशीच. लष्करीदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा हा भाग. त्यामुळे येथे लष्कराला बळ देणारे पायाभूत सुविधांचे जाळे उभे करणे हे जितके गरजेचे होते, तितकेच ते कठीणही होते. हिमालयाच्या उंचच उंच, आकाशाला स्पर्श करू पाहणार्या चंदेरी शिखरांवरून मार्ग काढणे, हे सोपे नव्हते. मात्र, भारताने हे आव्हान यशस्वीपणे स्वीकारले.
जगातील सर्वात उंच पूल जो आयफेल टॉवर पेक्षाही अधिक उंच आहे, येथे उभारला जात आहे. त्याचे काम पूर्ण झाले असून, लवकरच त्याचे लोकार्पणही होईल. हा पूल उभारताना अनंत अडचणींचा डोंगर होताच. खडतर आव्हाने होती. पावलोपावली तितकाच धोकासुद्धा होता. मात्र, त्या सार्यांवर मात करत भारतीय अभियंत्यांनी आपले कौशल्य पणाला लावत तो पूर्ण केला. म्हणजेच हे काम सुरू असताना त्यांना दहशतवादाचा कोणताही धोका नव्हता, हे सिद्ध होते. आता तर खोर्यामध्ये जे सक्रिय दहशतवादी आहेत, ते केवळ दोन आकडी संख्येइतकेच मर्यादित आहेत. पोलिसांची माहिती हीच आहे की, दहशतवाद्यांनी दहशतवादी संघटनेत नवीन भरती होत नाही. झालेली टिकत नाही आणि त्यामुळे नव्याने संघटनेत यायला फारसे कोणी उत्सुक नाही, असे हे सकारात्मक चित्र. आता हे असेच सुरू राहिले, तर येत्या एक-दोन वर्षांतच या उरल्या-सुरल्या सक्रिय दहशतवाद्यांचा पुरता बीमोड सुरक्षा यंत्रणांनी केलेला दिसून येईल.
कोणे एकेकाळी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणे म्हणजे अग्निदिव्य. आता १५ ऑगस्ट तसेच २६ जानेवारी या दोन्ही दिवशी संपूर्ण खोर्यातून तिरंगा फडकवला जातो. विशेष रॅली निघते. लहान लहान मुलेही छातीवर तिरंगा लावून निर्भयपणे फिरताना दिसून येतात. भूलोकीचे हे नंदनवन गेली दोन दशके दहशतवाद्यांच्या दहशतीखाली दबलेले होते. येथील बर्फही लाल झाला होता. बर्फाच्या खाली लावले गेलेले सुरंग त्यावर पाय ठेवण्यासही परवानगी देत नव्हते. त्यामुळेच निसर्गही जणू रुसला होता. त्याच नंदनवनात आता पुन्हा एकदा निसर्ग पुन्हा नव्याने बहरू लागला आहे. हिमाच्छादित शिखरे साद घालत आहेत, तर उद्यमशील युवकांना नवनव्या संधी खुणावत आहेत. भारताचे हे भूलोकीचे नंदनवन आपले वैभव पुन्हा प्राप्त करत आहे इतकेच!