महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे आणि बंदरे आणि खनिकर्ममंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गेल्या तीन दशकांपासून आपल्या मैत्रीचा धागा दृढ केला आहे. दूरदृष्टी, संयम तसेच आपल्या नेमके अन् निर्णायक कार्यकौशल्याने समाजसेवेचा वसा घेऊन मार्गक्रमण करणारे कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दादा भुसे यांच्याकडून वाढदिवसाचे हे शब्दरुपी अभीष्टचिंतन...!
ऐन तारुण्यात आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रभाव लाभलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे जीवाभावाचे आहेत. थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना पक्षातील इतरही बहुसंख्य आमदारांनी साथ दिली. त्यामागे वेगवेगळी कारणे असली, तरी मालेगाव बाह्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना मी शिंदे यांच्याशी असलेली मैत्री आणि महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर शिंदे यांनी केलेल्या कामांमुळे त्यांच्यासोबत गेलो.
मी ठाण्यात असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रभावित झालो होतो. त्यावेळी युवा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क आला. तेव्हापासूनच आमच्या दोघांमधील मैत्रीचा धागा विणला जाऊन पुढे तो अधिकच दृढ झाला. तो आजतागायत सुरूच आहे.
समाजकार्याच्या विचारांनी भारावलेले मन घेऊन मी मालेगाव तालुक्यातील सोयगाव या आपल्या गावी परतल्यावर 1992 मध्ये ‘जाणता राजा मंडळा’ची स्थापना केली. शिवसेनेचे कार्य जसे चालायचे, अगदी तशीच कार्यपद्धत ठेवली. मंडळाच्या माध्यमातून लहान-मोठ्या स्वरुपात समाजिक कार्य सुरू केले. कालांतराने मी शिवसेनेत प्रवेश केला. ‘जाणता राजा मंडळ’ही सेनेत विलीन झाले. त्यानंतर मला मिळालेली कार्यकर्त्यांची साथ, प्रत्येकाच्या सुखदु:खाप्रसंगी धावून जाण्याची वृत्ती, यामुळे मी राजकारणात एकेक वरची पायरी चढत गेलो. सलग चारवेळा विधानसभेची निवडणूक जिंकली. या प्रत्येक टप्प्यावर द्रष्टा मित्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या मैत्रीची साथ मिळाली.
’कोविड’ काळात संपूर्ण जग वेठीस धरले गेले होते. सर्व यंत्रणा ठप्प पडल्या होत्या. जनजीवन विस्कळीत झाले होते. या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठींवरही बरेच निर्बंध आले. अशा प्रसंगी नगरविकासमंत्री असलेले एकनाथ शिंदे कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतः मैदानात उतरले. सर्वच आमदारांबरोबर महापौर तसेच सामान्यांतील सामान्य कार्यकर्ता यांच्याशी ते संपर्क ठेवून होते. यासोबतच एप्रिल 2021 मध्ये मालेगावात आमचे चिरंजीव आविष्कार यांचा विवाह ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या कन्येशी झाला. त्यावेळी कोरोना निर्बंधांमुळे या विवाहास अगदी मोजकेच जण उपस्थित होते. त्यात एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासही शिंदे आवर्जून उपस्थित राहिले. एवढेच नव्हे, तर त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत असल्याची घोषणाही यावेळी केली होती. हे प्रसंग आजही सुखावतात.
आपल्या कामाच्या वेगळ्या शैलीने शिंदे यांनी राज्यात विकासाची गंगा निर्माण केली असून, त्यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन तसेच दूरदृष्टी यामुळे राज्यातील अनेक प्रलंबित प्रश्न निकाली लागण्यास मदत होत आहे. तळागाळापर्यंत शासनाच्या विकासाच्या योजना पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम शिंदे सरकारच्या काळात झालेले दिसून येते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नेत्रदीपक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले.
या मैत्रीबरोबरच समाजाचा विकास हे ध्येय घेऊन निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी दिसून आली. भविष्याचा वेध घेत पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा विविध कामांतील हातखंडाही दिसून येतो. अशा या विकासपुरुष मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा...!
(लेखक बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.)
(शब्दांकन : अमित यादव)