...म्हणून 'ती' मिमिक्री योग्यच! शरद पवारांचा मोठा दावा
21-Dec-2023
Total Views | 96
नवी दिल्ली : खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची संसदेबाहेर केलेली मिमिक्री ही ठिकच आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. गुरुवारी दिल्ली येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
१४४ खासदारांच्या निलंबन प्रकरणी दिल्लीमध्ये विरोधी पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये शरद पवारदेखील सहभागी झाले आहेत. उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, "ते ठीकच होतं. सभागृहात कुणी काही केलं तर त्याची जबाबदारी संबंधित नेत्याची असते. परंतु, संसदेच्या बाहेर जर कुणी काही केलं तर ते इथपर्यंत वाढवणं योग्य नाही. जर समजा माझ्याविरुद्ध काही झालं तर मी मराठा आहे, शेतकरी आहे आणि हा मराठ्यांचा आणि शेतकऱ्यांचा अपमान आहे, असं मी म्हणणं योग्य नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "जे संसदेचे सदस्य नव्हते ते लोक संसदेत कसे आले, याबाबत सरकारने उत्तर द्यावे ही विरोधकांची मागणी होती. यासाठी संसदेतील खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या देशातील जनता हे सगळं बघत आहे. १४४ लोकांना संसदेतून बाहेर काढणं हे योग्य नाही. जे इतिहासात कधी घडलं नाही ते संसदेत घडलं आहे. त्यामुळे देशातील जनता त्यांना धडा शिकवेल," असेही ते म्हणाले आहेत.