अमित साटम यांचा विरोधकांवर हल्लाबोल! ड्रग्ज, गांजा, ललित पाटील सगळंच काढलं

    20-Dec-2023
Total Views | 92

Amit Satam


नागपूर :
भाजप आमदार अमित साटम यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी ड्रग्ज, गांजा, एमडी, ललित पाटील, दिशा सालियान हे सगळे मुद्दे उपस्थित करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच अंतिम आठवडा प्रस्ताव अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले.
 
अमित साटम म्हणाले की, "अंतिम आठवडा प्रस्ताव वाचल्यावर मला 'सौ चुहे खा के बिल्ली चली हज को' आणि 'उलटा चोर कोतवाल को डाँटे' या दोन ओळी आठवतात. अतिशय हास्यास्पद असा हा प्रस्ताव आहे. हे लोकं ड्रग्ज आणि ललित पाटीलवर बोलतात. पण ललित पाटीलला डिसेंबर २०२० मध्ये अटक झाली होती. त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यावेळी कुणाचं सरकार होतं? गृहमंत्री, मुख्यमंत्री कोण होते. त्याला ससून हॉस्पीटलमध्ये का भरती करण्यात आलं? १४ दिवसानंतरही त्याची चौकशी का केली गेली नाही? ललित पाटील कोणत्या पक्षाचा पदाधिकारी होता आणि कुणाच्या जवळचा होता? हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे," असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच थोडी जरी शरम असेल तर ललित पाटीलचा उल्लेख इथे करु नये, असेही ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "ड्रग्ज आणि एमडीचा बाऊ केला जातो. पण गेल्या काही महिन्यात ५० हजार कोटींचे ड्रग्ज महाराष्ट्र पोलिसांनी जप्त केले आहे. २०१९-२० च्या कालावधीत ते का केले गेले नाही? यांच्या सरकारने कशा प्रकारची कारवाई केली आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ड्रग्जबाबत कशी कारवाई केली याचं विवरण केल्यास एक तास हेच बोलावं लागेल. ड्रग्ज, गांजा आणि चरस कोण करतं हे सुशांत सिंह राजपूतच्या विषयात एनसीबीच्या तपासात रेकॉर्डवर आलेलं आहे. कुणाचे कुणाबरोबर ड्रग्जविषयी चॅट होते हे रेकॉर्डवर आलं आहे."
 
"१ जुलै २०२२ ते १ जुलै २०२३ यावर कारवाई झाली असून ४ हजार ९०० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत आणि त्याची विल्हेवाटही लावण्यात आली. मग २०१९ मध्ये ही विल्हेवाट का लावली गेली नाही. महिलांचे अत्याचार, पॉक्सो याबाबतच्या कारवाईबद्दल आपल्याकडे खूप आकडेवारी असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे हिंमत असेल तर २०१९ ते २०२२ मध्ये काय केलं यावर बोला," असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. तसेच पालघरच्या साधूच्या हत्याकांडामध्ये काय झालं? ८ जून २०२० ला दिशा सालियानचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर ११ जून २०२० ला तिचं पोस्टमार्टम का झालं? ९ जून २०२० ला सुशांत सिंह राजपूतच्या घरी त्याच्याकडे असलेले हार्ड डिस्क, लॅपटॉप, फोन शोधण्यासाठी कोण गेलं होतं? सचिन वाझे गेले होते का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
 
मुंबई शहरात स्वप्नं घेऊन येणाऱ्या एका तरूणाचा १३ जून २०२० रोजी संशयास्पद मृत्यू होणं हे संपुर्ण देशाच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतं. त्यामुळे 'कर नाही तर डर कशाला?' बिहारच्या अधिकाऱ्याला कशाला थांबवलं होतं. सचिन वाझे कोण होता. त्याला कामावर कुणी घेतलं. तुम्ही गांजा, ड्रग्ज, एमडी, महिलांचे अत्याचार यावर बोलता पण तुमच्या राज्यात तर पोलिसच बॉम्ब ठेवतात. तेच मर्डर करतात. असं कधी झालं होतं का? असेही ते म्हणाले. हे विचारतात की, गृहमंत्री कुठे आहेत. तुमच्या काळातल्या गृहमंत्र्यांनी काय केलं? असा सवाल त्यांनी केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतला असता मला जितकं अडवाल तितकं खोलात जाईल, माझ्याकडे भरपूर माहिती आहे, असेही अमित साटम म्हणाले.


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121