मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दिनांक १ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान “निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा” आयोजित करण्यात यावी असे निर्देश राज्याचे कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका शिक्षण विभागाला पत्राद्वारे दिले आहेत. प्रभू श्री राम हे सर्व समाजासाठी एक आदर्श आहेत, या स्पर्धांमुळे पुढील पिढीला श्री रामांच्या आदर्श व्यक्तिमत्वाबद्दल तसेच सुशासन कौशल्याबद्दल ज्ञान मिळेल.
आपल्या देशावासियांची आस्था असणाऱ्या प्रभू श्री राम मंदिराची प्रतिष्ठापना येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होत आहे, त्या अनुषंगाने ही स्पर्धा १ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान नियोजित करावी असे मंत्री लोढा यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवत असतात. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची माहिती व्हावी म्हणून मनपा शाळांमध्ये कौशल्य केंद्र सुरु करणे, विद्यार्थ्यांसाठी रात्र अभ्यासिका सुरु करणे, विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास शिबीर, अध्ययनात चॅट जीपीटीचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करणे असे अनेक उपक्रम आज यशस्वीरित्या सुरु आहेत.