ग्रीनफिल्ड गुंतवणुकीसाठी भारतीय अर्थव्यवस्थेवर विदेशी गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवला आहे. जागतिक पुरवठा साखळीत म्हणूनच भारत झपाट्याने पुढे येत असून, देशांतर्गत रोजगाराला चालना देणारी, अर्थव्यवस्थेला बळ देणारी ग्रीनफिल्ड गुंतवणूक म्हणूनच भारतात मोठ्या प्रमाणावर होत आहे.
भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) घट झालेली असली, तरी ग्रीनफिल्ड गुंतवणुकीमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी स्वारस्य दाखवले आहे. एका अहवालानुसार, ग्रीनफिल्ड गुंतवणुकीच्या पहिल्या पसंतीच्या तीन देशांत भारताचे नाव आहे. जागतिक पुरवठा साखळीत भारत हा झपाट्याने पुढे येत असून, नवनवीन गुंतवणुकीला आकर्षित करून घेत आहे. साथरोगानंतरच्या कालावधीत चीनने गमावलेली विश्वासार्हता याला कारणीभूत असून, २०२४ पर्यंत देशात सर्वाधिक गुंतवणूक झालेली असेल, असे मानले जाते. चीनने यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्यांदाचा तूट दाखवली असून, चीनवर अवलंबून असलेल्या देशांना त्याने चिंतेत टाकले आहे. कर्जाचा बोजा, गृहनिर्माण क्षेत्राची निराशाजनक कामगिरी यामुळे चीनअंतर्गत समस्यांना तोंड देत आहे. म्हणूनच चीनवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतासारख्या विश्वासार्ह देशाचा विचार प्राधान्याने होत आहे. चीनमधून गुंतवणूक काढून घेत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी भारत हा एकमेव पर्याय अर्थातच नाही. अन्य काही देशही पुरवठादार देश म्हणून उदयास येत आहेत. व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स हे देशही चीनला पर्याय म्हणून उदयास आले आहेत.
ग्रीनफिल्ड गुंतवणूक म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे. नवीन प्रकल्पामध्ये केलेली गुंतवणूक ही ग्रीनफिल्ड गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. जसे की, मर्सिडिझ बेंझने २००७ मध्ये भारतात १०० एकर जमीन खरेदी करून, आपले नवे उत्पादन केंद्र सुरू करत भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. पूर्णपणे शून्यातून हा प्रकल्प उभा राहत असल्याने, यात केलेली गुंतवणूक ही देशातील बाजारपेठेत राहते. एखाद्या कंपनीला विदेशी बाजारपेठेत प्रवेश करताना, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीसाठी ज्या मर्यादा तसेच निर्बंध असतात, त्यांचे पालन करावे लागते. म्हणूनच ‘ग्रीनफिल्ड इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी’चा वापर केला जातो. देशात थेट विदेशी गुंतवणुकीला ती चालना देते. तसेच, संबंधित कंपनी नवीन उत्पादन सुविधा, त्यांचे वितरण केंद्र याची उभारणी करते. अशा प्रकारची गुंतवणूक ही दीर्घकाळ परतावा देणारी ठरते. तसेच यात देशात रोजगाराची निर्मिती होण्याबरोबरच त्यातील अधिकाधिक पैसा हा देशातच राहतो. निव्वळ पैसे गुंतवणे असे याचे स्वरुप नसते, तर संपूर्ण व्यावसायिक मदतही याअंतर्गत केली जाते.
याअंतर्गत भारतात अलीकडच्या काही वर्षांत वाढ झालेली दिसून येते. सर्वात मोठी बाजारपेठ, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि सर्वाधिक संख्येने असणारा मध्यमवर्ग, ज्याची क्रयशक्ती अधिक आहे, या कारणांमुळे विदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहेत. त्याचवेळी देशातील सर्वाधिक युवा लोकसंख्या, आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देते, हेही प्रमुख कारण ठरत आहे.
ग्रीनफिल्ड गुंतवणुकीत होत असलेली वाढ ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अर्थातच सकारात्मक आहे. रोजगार निर्मिती, आर्थिक वाढीला चालना तसेच नवोद्योगांना मिळणारे बळ यातून साध्य होत आहे. या गुंतवणुकीला ‘एफडीआय’ असेच संबोधले जाते. विदेशी बाजारपेठेत प्रवेश करण्याचा राजमार्ग म्हणून ग्रीनफिल्ड गुंतवणुकीचा पर्याय वापरला जातो. गुंतवणूकदार संपूर्ण व्यवसायात गुंतवणूक करत असल्याने, ही गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी राहते. तसेच, गुंतवणूकदार वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करतो.
१९८० च्या दशकात चीनची लोकसंख्या ही सर्वाधिक होती. त्याचा फायदा घेत, चीनने देशांतर्गत उत्पादनाला चालना दिली. मात्र, साथरोगानंतर संपूर्ण जगाची पुरवठा साखळी चीनमुळे विस्कळीत झाली. म्हणूनच चीनला पर्याय शोधण्यात येऊ लागला. संपूर्ण जग मंदीच्या सावटाखाली असताना, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने करत असलेली वाटचाल म्हणूनच ग्रीनफिल्ड गुंतवणुकीला आकर्षित करत आहे. त्याचवेळी भारत सरकार गुंतवणुकीला चालना देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहे. उत्पादनातील नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी करही कमी करण्यात आला आहे. ‘उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्हही’ सुरू करण्यात आला आहे.
जून तिमाहीत भारतातील थेट विदेशी गुंतवणूक कमी नोंद झाली असली, तरी येत्या काळात ती पूर्ववत होईल, असा विश्वास आहे. उच्च व्याजदरांचा फटका जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांना बसतो आहे. यातून भारतीय अर्थव्यवस्था लवकरच सावरेल आणि पुन्हा एकदा विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करेल. चिनी अर्थव्यवस्थेची वाढ कमी वेगाने होत आहे. चीनच्या जाचक नियमांमुळे विदेशी कंपन्यांना तेथे व्यवसाय करणे आव्हानात्मक झाले आहे. तसेच, भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांचा पर्याय विदेशी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध झाल्यामुळेच येत्या काळात भारत जगाचे उत्पादन केंद्र झालेले दिसून येईल.
ग्रीनफिल्ड गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मूळ कंपनीचे कामकाजावर नियंत्रण राहते. गरजेनुसार विस्तारासाठी त्यात गुंतवणूक केली जाते. कंपनीची प्रतिमा म्हणजे ब्रँड व्हॅल्यू आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तारते. देशांतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते. कोणत्याही मध्यस्थाशिवाय नव्या बाजारपेठेत कंपनीचा प्रवेश सहजपणे होतो. तसेच ग्राहक आणि गुंतवणूकदार या दोघांच्यात एक सकारात्मक भावना निर्माण होते. एक नवी बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे गुंतवणूकदार कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ होते.
भारतीय बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्याशिवाय येथील मध्यमवर्गाची क्रयशक्ती जास्त असल्याने, उत्पादनांना मागणी राहते. अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा गुंतवणुकीचा मार्ग असल्यानेच, भारत सरकार ग्रीनफिल्ड गुंतवणुकीला चालना देत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेवर दाखवलेला विश्वास गुंतवणुकदारांना भारतात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहे, असे नक्कीच म्हणता येते. येत्या काही काळात म्हणूनच भारत हे जगाचे प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयाला आले असेल.