खानिवडे: पालघर जिल्ह्यातील नामशेष होणारे ऐतिहासिक डोंगरी दुर्ग चर्चेत येत आहेत ते येथे गर्दीचा उच्चांक मोडणाऱ्या पर्यटकांमुळे. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी असणारी शासकीय नियमावली सुध्दा गडकोट दुर्गावर आलेल्या हौशी पर्यटकांनी थेट भिरकावून दिल्याचे दिसून येत आहे. यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पालघरच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन अनेक अडचणींचा सामना करून दुर्गमित्रांकडून करण्यात येत आहे ते याचसाठी का असा सवाल दुर्गमित्रांकडून करण्यात येत असून शासनाकडून याची दखल घेण्याची मागणी दुर्गमित्रांकडून करण्यात येत आहे. यात येथे भेट देणारे सारेच पर्यटक हुल्लड आहेत असे नाही. अनेक जण आपल्या इतिहासाला जवळून अनुभवण्यासाठी वीरांना आठवण करण्यासाठी येतात .मात्र यात जे काही हुल्लड गट येतात त्यांना ना इतिहासाची जाण, ना शुरांची आठवण, ना वास्तूंची कदर असे हुल्लडबाज पवित्र वास्तूंचे पावित्र्य भंग करतात. त्यांना येण्यापासून नव्हे तर त्यांच्या वागणुकीला अटकाव करण्यासाठी काही नियमावली घालणे आवश्यक असल्याचे दुर्गमित्रांकडून सांगण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यातील प्रामुख्याने आशेरी गड (खडकोना गाव), काळदुर्ग (मनोर वाघोबा खिंड), टकमक गड (सकवार गाव), कोहोज गड (नाणे सांगे गाव) आसावा दुर्ग (बोईसर), सेगवा दुर्ग (डहाणू) या किल्ल्यांवर सणा सुदींच्या सुट्टीत पर्यटकांची अत्यंत मोठ्या संख्येने गर्दी पाहण्यास मिळते. इतिहासाच्या वास्तूंना भेट देणे ही चांगली बाब असली तरी या गडावर जमा झालेली गर्दी, गडावर ठिकठिकाणी पेटलेल्या जेवणाच्या चुली, सर्वत्र दारुबाजांच्या बैठका, गडावरील परिसरातील कर्कश बेताल गाणी, बालेकिल्ला राजसदर भागात बेधुंद फिरणारी तरुणाई, गडावरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांत येथेच्छ उड्या घेणारी तरुणाई, गडावरील सर्वोच्च भागात सेल्फी घेण्यासाठी धोका स्वीकारून धाव घेणारे तरुण तरुणी, प्लास्टिक व दारूच्या बाटल्यांचा अमाप कचरा, गडाच्या पायथ्याशी वाहनांच्या लागलेल्या रांगा, गडावरील वास्तूंवर चढून किंचाळणारे पर्यटक, गडावर धोकादायक ठिकाणी लावण्यात आलेले संरक्षक रेलिंग पर्यटकांनी पार वाकवून मोडले, गडाच्या कड्यावरील चिरेबंदी दगड खाली लोटून जल्लोष साजरा करणे, गडावर चित्रविचित्र कर्कश आवाजातील गाणी व त्यावर बेभानपणे नाच इत्यादी प्रकार दिसून येत असल्याने गेली अनेक वर्षे दुर्गमित्रांनी अत्यंत कष्टाने व प्रतिकूल परिस्थितीत शारीरिक कष्ट घेऊन स्वच्छ केलेल्या गुंफा, वास्तू, सदर यांच्या मागे घाण करून गडावर दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण केले आहे. गुजरात, मुंबई, स्थानिक पायथा भागातून येणारे हे पर्यटक गड दर्शनासाठी आलेले होते का, की पालघरला लाभलेल्या अनमोल ऐतिहासिक वारश्यांची विटंबना करण्यासाठी आले होते असा सवाल दुर्गमित्र उपस्थित करत आहेत.
हौशी पर्यटकांकडून ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य जपण्याऐवजी जो धिंगाणा घातला जात आहे त्यामुळे आता खरोखर जे मनापासून आपला वेळ पैसा श्रमदान देऊन संवर्धनाचे काम करतात त्यांच्यावर गडावर जाण्यासाठी बंधने आली आहेत . कारण संवर्धक कोण व पर्यटक कोण हेही ओळख असणे गरजेचे आहे . यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून दुर्गमित्रांना ओळखपत्र देण्यात आले तर संवर्धनाचे काम सुरळीत चालेल . तर होंशी पर्यटकांना गडावर किंवा ऐतिहासिक स्थळांवर जाताना अस्वच्छता करणाऱ्या वस्तूंना नेण्यास बंधने येतील. पुरातत्वीय नियमावली अंतर्गत राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाने सातत्याने दक्ष राहून काम करणे आवश्यक.
-श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक