मुंबई : आसामवासींसाठी श्रद्धेचे स्थान असलेल्या कामाख्या देवीचे मंदिर आता लवकरच महाराष्ट्रात बांधणार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. पत्रसूचना कार्यालयाने (पीआयबी) महाराष्ट्रातील काही पत्रकारांचा मेघालय व आसाम या ईशान्येतील दोन राज्यांचा दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात काही पत्रकारांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची येथील सचिवालयात भेट घेतली. या वेळी हिमंता यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधत ही माहिती दिली.
दरम्यान आसाममध्ये ही काशी विश्वनाथ कॉरिडोरप्रमाणे कामाख्या कॉरिडोर बांधले जाणार असल्याची माहिती सरमा यांनी दिली. दरम्यान शिवरायांच्या कर्तृत्वावर आधारलेले 'जाणता राजा' हे महानाट्य बघण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले त्यामुळे 'जाणता राजा' या महानाट्याचे प्रयोग आसाममध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सरमा म्हणाले.