ग्रामीण विकासाला देणार चालना

    17-Oct-2023
Total Views | 41
gramin vikas kendra

मुंबई : प्रमोद महाजन ‘ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. राज्यातील ५११ प्रमोद महाजन ‘ग्रामीण कौशल्य विकास केद्रां’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्याला प्राधान्य दिले आहे, अशा या महाराष्ट्राच्या ‘अभिनव’ संकल्पनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, ही बाब देखील गौरवाची आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी येथे दिले. दरम्यान, या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीला ऑनलाईन हजर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ”हा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी संबंधित असल्याने त्याच तोलामोलाचा व्हावा. फ तरुणांच्या रोजगार संधी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारे हे महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमासाठी वेळ देऊन या योजनेला पाठबळ दिले आहे. त्यामुळे या केंद्रांची माहिती या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीयस्तरावर दखल घेतला जाईल असा आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी सज्ज व्हावे,” असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

कौशल्य विकास, उद्योग यांच्याबरोबरच महसूल, ग्रामविकास यांच्यासह महिला व बालविकास विभागांनीही यामध्ये सहभाग द्यायचा आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांनाही यात सहभागी होता येईल, असे नियोजन करा. ही एक सुरुवात आहे. पुढे जाऊन या केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ज्या- ज्या गावात हे केंद्र सुरू होणार आहे. त्याच्या आजूबाजूच्या गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटक यात कसे सहभागी होतील, यासाठीचे नियोजन करण्यात यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी मैदान असेल, तर मंडपाची उभारणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, इंटरनेटची सुविधा, स्क्रीनची उभारणी, वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठीची व्यवस्था याबाबतही सूचना दिल्या.

कोकण विभागात ५४ ठिकाणी कार्यक्रम

ठाणे जिल्ह्यात ९ केंद्र, पालघर जिल्ह्यात १२, रायगड जिल्ह्यात १४, रत्नागिरी जिल्ह्यात ११ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ अशा एकूण ५४ ठिकाणी एकाच वेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोकण विभागातील कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन होणार आहे.

ग्रामीण भागात कौशल्य विकास

राज्यातील ग्रामीण भागात कौशल्य विकासाची व्यवस्था नाही. हे लक्षात घेऊन आपण ही संकल्पना राबवत आहोत. हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्य क्रमावरील विषय आहे. रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. त्या दृष्टीने या कौशल्य केंद्राची ही संकल्पना महत्त्वाची आहे. भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढवण्यात येईल.
- मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121