आत्महत्येची 'कोटा फॅक्टरी' : विद्यार्थ्यांच्या नैराश्येची नेमकी कारणे काय ?
मानसोपचार तज्ज्ञ सुप्रिया नायर यांची विशेष मुलाखत
11-Oct-2023
Total Views | 64
राजस्थानातील कोटा येथील 'कोचिंग सेंटर'मध्ये विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला. कमी गुण मिळण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांची होणारी घालमेल आणि त्यांना होणारा मानसिक तणाव यातून बाहेर कसे पडावे याबद्दल बराच उहापोह झाला. मात्र, विद्यार्थ्यांची बाजू नेमकी काय? त्यांना होणाऱ्या तणावातून मुक्त होण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल परखडपणे चर्चा झाली नाही. अखेरचे खापरही विद्यार्थ्यांवरच फोडण्यात आले. मोबाईल, इंटरनेट आणि एआय कुत्रिम बुद्धीमत्ता या युगात प्रत्येक गोष्टीवर उपाय शोधण्यात आपण यशस्वी झालो. मात्र, मानसिक तणावासारख्या गंभीर विषयावर आजही मोकळेपणाने संवाद होत नाही. किंबहूना ही समस्या म्हणूनच ग्राह्य धरली जात नाही. मुंबईसारख्या शहरांमध्ये ही अवस्था असेल तर खेड्यापाड्यांतील विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल जनजागृती असणे अशक्यच. याच पार्श्वभूमीवर जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून शहीद मेजर राजेश नायर संस्थेच्या संस्थापक आणि मानसोपचार तज्ज्ञ सुप्रिया नायर यांच्याशी दै.'मुंबई तरुण भारत'च्या प्रतिनिधी साक्षी रावणंग यांनी साधलेला हा संवाद
१.मानसिक ताण म्हणजे नक्की काय? याची लक्षणे आणि पातळ्या काय आहेत ?
खूप लोकांना असं वाटतं की, मानसिक तणाव म्हणजे उपचार करण्यायोग्य नैराश्य. पण नैराश्य हे मानसिक आरोग्याचे विकार या प्रकारात येते. आपले दररोजचे जे ताण असतात त्यांना आपण नैराश्य नाही म्हणू शकत. कारण मानसिक तणावाचा गुणधर्म वेगळा असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दल असहाय्य, निराशावादी, अनियंत्रित भावना वाटू लागतात तेव्हा असलेला ताण हा त्याच्या मानसिक स्थितीवर परिमाण करत असतो. त्यावेळी वाटणाऱ्या स्थितीला आपण मानसिक तणाव म्हणू शकतो. हळूहळू आपली इच्छाशक्ती कमी होऊ लागते, इतरांशी बोलण्यात रस वाटत नाही, भूक लागत नाही, वेळेवर झोप येत नाही, निर्णय क्षमता कमी होते या छोट्या - छोट्या गोष्टी जरी आपल्याला स्वतःमध्ये आढळून आल्या तरी आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपला मानसिक संतुलन बिघडत आहे.
२. 'कोटा'तील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या गोष्टीकडे आपण स्वतः एक मानसशास्त्रज्ञ म्हणून कुठल्या दृष्टीकोनातून पाहता ?
भारतातल्या ज्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था आहेत तिथल्या शिक्षण प्रकारात आणि इतर भागातील शिक्षणाच्या प्रकारात फरक आहे. त्यामुळे आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलाला मिळावे, त्याने उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रत्येक पालक झगडत असतात. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बघितला तर लक्षात येईल की, उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. काही ठराविक जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. अशावेळी कोटासारख्या ठिकाणी प्रवेश परीक्षांचा अभ्यास करायला विविध भागातून विद्यार्थी येतात. इतरांना बघून त्यांना वाटत की, आपण एवढा अभ्यास नाही करू शकत आणि तिथून त्यांची निराशावादी स्थिती सुरू होते. ही मानसिक स्थिती जरी विद्यार्थ्यांनी ओळखली तरी त्यातून बाहेर यायला मदतीला कोणी नसतं. शिक्षकांना सांगितला तर ते बोलणार की, हे तू आता नाही सहन केलंस तर तू पुढे उच्चादर्जाच्या महाविद्यालयात कसा प्रवेश मिळवणार. ही सामान्य परिस्थिती तुला हाताळता यायला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल कमीपणा वाटू लागतो. यातून मानसिक ताणतणाव अधिक वाढू लागतो. त्यामुळे कोटासारखी ठिकाण ही अतिताणाचे क्लस्टर बनले आहेत. याठिकाणी संरक्षणात्मक घटकांचा अभाव आहे आणि जोखमीचे घटक अधिक आहे. अशा परिस्थितीत मदत मिळेपर्यंत विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतलेला असतो.
३. विद्यार्थ्यांचे पालक म्हणून सर्वांनीच ही परिस्थिती कशी हाताळली पाहिजे?
जेव्हा विद्यार्थी मानसिक तणावातून जात असतो तेव्हा त्याचातली प्रेरणा कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असता. समजा आपला हात दुखतोय तर आपण आपोआप डॉक्टरकडे जाणार. पण तेच मानसिक त्रासासाठी मदत शोधणे याचे प्रमाण फार कमी आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे याबाबत शक्यता कमी असते. यावेळी आजूबाजूच्या इतर विद्यार्थ्यांनी, पालकांनी त्या विद्यार्थ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नैराश्येमुळे विचारात, वागण्यात, स्वभावात, बोलण्यात बदल होत जातो त्यावेळी ही स्थिती पालकांच्या लक्षात आली तर त्यांनी आपल्या मुलाची अधिक विचारपूस केली पाहिजे. पाल्याला धीर दिला पाहिजे तसेच तज्ज्ञांकडे घेऊन गेले पाहिजे. पालकांप्रमाणेच सोबतच्या मित्रमैत्रिणींनीसुद्धा जागृत राहणे गरजेचे आहे. काहीवेळा विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतात की, "मला काही झालं तर माझी पुस्तकं तू वापर" किंवा त्यांच्या वागण्यात बदल होत जातो. त्यावेळी सोबतच्या मित्रमैत्रिणींनी समजून घेऊन धीर देणे गरजेचे असते. पण खूप वेळा शक्यता अशी असते की, मदतीसाठी प्रयत्न करताना वेळ खूप कमी मिळतो. दरम्यान विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल गाठलेले असते. म्हणून लक्षण लवकर लक्षात येणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अशावेळी पालक, शिक्षक, मित्रमैत्रिणी यांनी मदत केली पाहिजे.
४. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखल्या जाऊन त्यांना पुढे नव्याने सुरुवात करण्याची उमेद देण्यासाठी प्रशासकीय व सामाजिक कुठली पावले उचलणे गरजेचे आहे?
२०१७ मध्ये मानसिक आरोग्याविषयी अधिनियम तयार करण्यात आले आहे. त्यानुसार मानसिक आरोग्य केंद्र उभारणे प्रशासनाला अनिवार्य आहे. पण मानसिक आरोग्य केंद्र उभारायच तर त्याची व्यवस्था कोण बघणार?, त्यासाठी निधी किती मिळणार, तज्ज्ञांची निवड कशी करणार यासर्व गोष्टी ठरणे गरजेचे आहे. सध्या गरजेच्या तुलनेत ०.००३ टक्के मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध आहेत. जसा १०० हा पोलिसांचा हेल्पलाईन नंबर आहे त्याप्रमाणेच मानसिक आरोग्याविषयी हेल्पलाईन नंबर तयार केला पाहिजे. आत्महत्या प्रतिबंध योजना आखल्या पाहिजेत. आत्महत्या स्थळी प्रथम पोहचणाऱ्यांनी काय केलं पाहिजे, पालकांना कसा धीर दिला पाहिजे, पोलिस, माध्यमे, डॉक्टर यांनी ही स्थिती कशी हाताळली पाहिजे याविषयी जागरूकता करणारी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.
५. विद्यार्थी आत्महत्या करतो मात्र, त्यांच्या पालकांवर बेतणारा प्रसंग मोठा मानसिक आघात असतो, अशावेळी पालकांनाही मानसिक आधाराची गरज लागतेच. तर अशा पालकांना काय सांगाल?
यावेळी फक्त पालकच नाही तर त्यांचे मित्रमैत्रिणी, सोबती या सगळ्यांनाच आधाराची गरज असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती दुःखात असते तेव्हा व्यक्त होण्याची कोणतीच योग्य किंवा अयोग्य पद्धत नाही आहे. खूपदा असं होतं की, ते लोक महिन्याभरात कामाला जातात तेव्हा लोक विचारतात की एवढा अपघात झाला त्याबद्दल काही वाटत नाही का ? पण दुःखातून बाहेर येण्यासाठी काय करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. विद्यार्थ्याला गमावल्यानंतर वेळेआधी ही परिस्थिती आपल्या लक्षात आली नाही, आपण समजून घ्यायला कमी पडलो अशी अपराधी भावना पालकांच्या, मित्रमैत्रिणींच्या मनात खूप काळ राहते. घटनेनंतरचा हा जो पश्चाताप आहे तो सामान्य आहे. नैसर्गिक पद्धतीने दुःख व्यक्त करण्याचा हा भाग आहे. त्यांनी सुद्धा गरज पडल्यास तज्ज्ञांकडे गेले पाहिजे.
६. नव्या शिक्षण धोरणामुळे यात काही फरक पडेल का?
संधी, समानता, गुणवत्ता, क्षमता आणि जबाबदारी हे पाच नवीन शैक्षणिक धोरणाचे स्तंभ आहेत. यामुळे कमी दर्जाच्या शैक्षणिक केंद्रावर लक्ष दिले जाईल आणि कोटा, आयआयटी सारख्या ठिकाणी जाऊनच मला उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल ही धारणा कमी होईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्थलांतर करायची गरज नाही पडणार. कारण जेव्हा तुम्ही स्थलांतर करता तेव्हा कुटुंब, इतर नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यापासून आपण लांब जातो त्यामुळे तो एक वेगळा ताण असतो. हा ताण कमी होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाचा नक्की उपयोग होईल.
७. मानसशास्त्र हा विषय महाविद्यालयीन स्थरावर शिकवला जातो. मात्र, शाळेपासूनच मानसशास्त्राविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली तर फरक पडेल का?
विषय म्हणून शिकवण्यापेक्षा शिक्षकांनी शालेय पातळीपासून मानसिक ताणतणावांना कसे सामोरे जायचे याबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे. त्याविषयी परीक्षा घेऊन त्याला गुण देणार तर याबाबत जागरूकता नाही करता येणार. याऐवजी मानसिक संतुलन विस्कळीत झाल्यावर काय प्रथमोपचार केले पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन करावे. किंवा भावनिक विकास कसा होईल याबाबत अभ्यासक्रम तयार करावा.
सावध ऐका पुढल्या हाका!
सर्व शाळांमध्ये आत्महत्या प्रबंधक शिबिरे आयोजित केली पाहिजेत. मानसिक तणावाबाबतची लक्षणे पालक, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी यांनी ओळखली पाहिजेत. तसेच गरज पडल्यास तज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे शारीरिक त्रासने आपण आजारी पडतो त्याचप्रमाणे मानसिक आजारसुद्धा असतात. त्यामुळे यात कमी वाटण्यासारखं काही नाही आहे. आत्महत्या याविषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे.