नवी दिल्ली : पहलगाममध्ये दहशतवाद्य़ांनी धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतले. त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानचा कणा मोडला आणि त्या चक्रव्युहात पाकला गुडघे टेकावे लागले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील बिकानेर येथे केले. राजस्थानमधील बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करताना ते बोलत होते.
दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर निष्पाप लोकांना लक्ष करत त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारताच्या सैन्यदलांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कंबर कसली होती, केंद्र सरकारनेदेखील त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. अत्यंत काळजीपूर्वक राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेत भारताच्या तिन्ही दलांनी एकत्रितपणे पाकिस्तानची संरक्षण यंत्रणा उध्वस्त केली आणि पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. 22 एप्रिलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने 22 मिनिटांत कारवाई करत पाकिस्तानातील नऊ प्रमुख दहशतवादी अड्डे नष्ट केले. या कृतीने देशाची ताकद जगासमोर प्रकट झाली आणि जेव्हा पवित्र सिंदूर अग्निशक्तिमध्ये बदलतो तेव्हा परिणाम निश्चितच प्रभावी असतो, हे सिद्ध केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत या हल्ल्यानंतर गप्प राहिल असे ज्यांनी गृहीत धरले होते ते आता लपून बसले आहेत, तर ज्यांनी आपल्या युद्धशक्तीबद्दल बढाया मारल्या होत्या ते आता ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हे सूडाचे कृत्य नव्हते, तर न्यायाचे एक नवीन रूप आहे. ऑपरेशन सिंदूर ही केवळ संतापाची अभिव्यक्ती नव्हती तर भारताच्या अटल शक्ती आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन होते. राष्ट्राने आता शत्रूवर थेट आणि निर्णायक प्रहार करून धाडसी दृष्टिकोन स्वीकारला आहे. दहशतवादाचा नाश करणे ही केवळ एक रणनीती नाही तर एक तत्व आहे, असे पंतप्रधानांनी निक्षून सांगितले.
भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून स्थापित झालेल्या तीन प्रमुख तत्त्वांचा पंतप्रधानांनी सविस्तर ऊहापोह केला. यातील पहिले तत्त्व - भारतावर झालेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल, मात्र ते प्रत्युत्तर कोणत्या वेळी, कोणत्या स्वरुपात द्यायचे याचा निर्णय सर्वथा भारताच्या सैन्य दलांच्या संमतीने घेतलेला असेल. दुसरे म्हणजे, भारत यापुढे अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तिसरे, भारत यापुढे दहशतवादी हल्ल्यांमागचे सूत्रधार आणि त्यांना पाठबळ देणारी सरकारे यांच्यात भेद करणार नाही असे सांगत त्यांनी पाकिस्तानचा सरकारी आणि बिगर - सरकारी हा फरक फेटाळला.
पाकचा हवाईतळ ‘आयसीयू’मध्ये
पाकिस्तानने बिकानेरमधील नल हवाईतळास लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या हवाईतळाचे अल्पही नुकसान करणे पाकला शक्य झाले नाही. भारताने मात्र येथून थोड्या अंतरावर सीमेपलीकडे असलेला पाकचा रहिमयार खान हवाईतळावर अचूक हल्ले करून उध्वस्त केले असून तो आता ‘आयसीयू’मध्ये आहे, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.