नवी दिल्ली: देशाला १५ ऑगस्ट, १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर संविधान सभेपासून आपल्या इच्छा व आकांक्षांच्यानुसार देश चालविण्याच्या तंत्राचा प्रारंभ झाला. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असून अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी ‘स्व’च्या आधारावर ‘तंत्राची’ युगानुकूल पुनर्रचना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी नागपुर येथे केले.
भारताला १५ ऑगस्ट, १९४७ रोजी दीर्घकाळानंतर इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले. भारतासारखा एवढा मोठा भुभाग शतकांनंतर भारतीयांच्या राजकीय सत्तेखाली आला. तसे होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यामध्ये सशस्त्र संघर्ष, समाजामध्ये राजकीय जागृती घडवून आंदोलन, समाजाची एकता आणि समाजामध्ये देशभक्ती व स्वत्व जागरण अशा चार मार्गांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करण्यात आला. हा संघर्ष करताना आपल्या समाजाची उन्नती व आकांक्षा साधून समाजाला महान बनविण्याचे ध्येय होते, असे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
‘स्व’च्या आधारावर ‘तंत्राची’ युगानुकूल पुनर्रचना करणे आवश्यक असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ज्याला स्वतंत्र रहायचे आहे, त्यांना प्रत्येक बाबतीत स्वनिर्भर होणे गरजेचे असते. जागतिक संबंध ठेवताना ते आपल्या इच्छेनुसार ठेवायचे सामर्थ्य प्राप्त करावे लागते. त्याचप्रमाणे सुरक्षेसाठीदेखील सदैव सज्ज रहावे लागते. त्यासाठी देशात संविधान सभेच्या स्थापनेपासून त्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. या प्रक्रियेमध्ये परिश्रम गरजेचे असून त्यासाठी आपला राष्ट्रध्वज सदैव मार्गदर्शक ठरतो, असेही मोहनजी यांनी यावेळी नमूद केले.
मी देशासाठी काय करू शकतो, ही भावना महत्वाची
संपूर्ण जगाला दिशा दाखविण्याची क्षमता आपल्या देशामध्ये असून ती साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमांना पर्याय नाही. जगाला शांतीपूर्ण समृद्धीचा मार्ग दाखविण्यासाठी आपल्या देशाला सामर्थ्यसंपन्न, समरसतायुक्त आणि शोषणमुक्त बनविणे आवश्यक आहे. हे ध्येय साध्य होईपर्यंत “मला काय मिळेल”, या भावनेऐवजी “मी देशाला काय देऊ शकतो”; या भावनेने काम करण्याची गरज असल्याचेही सरसंघचालक म्हणाले.