संतांचे श्रीविठ्ठलाशी असलेले नाते, विठ्ठलभेटीची आस त्यांनी आपल्या अभंगात मांडली. शतकानुशतके वारकरी पंढरीच्या वारीला जात आहेत. संतश्रेष्ठांच्या मांदियाळीपासून ते आज भक्तापर्यंत श्रीविठ्ठलाप्रती असेलेले प्रेम, भक्ती याचे पुनश्च दर्शन, आज देवशयनी एकादशी निमित्ताने...
आपल्या कोणाची तरी वाट पाहणे ही किती सुंदर गोष्ट आहे. या वाट बघण्यात एकाच वेळी किती विविध पैलू आहेत. त्यात विरह आहे, शृंगार आहे, हलकीच कारुण्याची रेघ आहे, अनामिक ओढ आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निष्ठा आणि विश्वास आहे आणि वाट पाहण्याचे आदर्श उदाहरण झालेले आहेत ते म्हणजे हे चातक आणि चकोर. मी माझ्या कोणाची किती वाट पाहात होते, हे सिद्ध ’मी चातकासारखी तुझी वाट पाहतेय...’ अशा काही वाक्यांचा अगदी सहज प्रयोग करतो. म्हणजेच काय तर चातक पक्षी पावसाप्रती आणि चकोर चंद्रप्रकाशाप्रती आपली निष्ठा व्यक्त करतो. चातक आणि चकोर हे ग्रंथांमधून आलेले ’काल्पनिक पक्षी’ आहेत, असे म्हटले जाते. कारण, किती लोकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिले आहे देव जाणे! परंतु, आपल्या देवाला- पंढरीला पाहण्यासाठी, त्याची भेट घेण्यासाठी आसुसलेले वारकरी आपण नक्कीच पाहिले आहेत.
आपल्या महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे आणि या मांदियाळीत प्रत्येक संतांची अंतिम इच्छा ही परमेश्वर भेटीची आहे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून ही कळकळ व्यक्त करत म्हणतात,
भेटीलागीं जीवा लागलीसे आस।
पाहे रात्रीं दिवस वाट तुझी॥
तर संत सावतामाळी म्हणतात, “मी आत्ता जरी तुझ्या भेटीसाठी येऊ शकत नसलो तरी माझ्या श्वासात, ध्यासात, कर्मात फक्त विठ्ठलच आहे, माझे कामात परमेश्वर आहे.” हे सांगताना म्हणतात,
कांदा-मुळा-भाजी अवघी विठाई माझी।
एवढेच नाही, तर जेव्हा श्रीमुखाचे दर्शन त्यांस होते, तेव्हा ते तेज त्यांच्या आकलनापलीकडे असते, हे सांगताना संत सावतामाळी भारावून जातात आणि म्हणतात-
विकासिला नयन स्फुरण आले बाही।
दाटले हृदयी करुणाभरिते॥
जाता मार्गी भक्त सावता तो माळी।
आला तया जवळी पांडुरंग ॥
जिथे या संतश्रेष्ठांचा जीव श्रीविठ्ठलाच्या भेटीसाठी कासावीस झाला आहे तिथे आज वारकरी बंधू-भगिनींची गत काय वेगळी असणार आहे. जणू त्या चकोर-चातकाप्रमाणे वारकरीदेखील आषाढ महिन्याची आणि विशेषतः आषाढी एकादशीची आतुरतेने वाट बघत असतात. आपले दैनंदिन जीवन, सुख-दुःख सर्व काही बाजूला ठेवून सर्व वारकरी बंधू-भगिनींची पाऊले ’सुखाचे सुख ते श्रीमुख पाहण्यासाठी पंढरीच्या भेटीसाठी निघतात. आषाढ बरसत असताना टाळ-मृदुंगाच्या नादात विठूमाऊलीच्या भेटीसाठी उत्सुक झालेल्या वैष्णवांचा सोहळा बघणे हा खरच एक अनुभव आहे.
श्रीविठ्ठलाची भेट घेत, त्याला डोळे भरून बघत, रात्रंदिवस विठूचा गजर करत, हे सर्व वारकरी आषाढ मासाच्या प्रत्येक क्षणाचा सण करतात. या वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला त्या ज्ञानोबांनी विठूमाऊलीचे जे वर्णन केले आहे-
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती।
रत्नकीळ फाकती प्रभा॥
अगणित लावण्य तेज: पुंजाळले।
न वर्णवे तेथेची शोभा॥
अशा पंढरीच्या तेजाने दशदिशा व्यापून टाकलेली दिव्य कांती ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी हे वैष्णव एकत्र येतात. हे लावण्य ती कांती पाहून आषाढ मनात दाटतो आणि डोळ्यांची चंद्रभागा कशी होते, ते कळतही नाही.
विठ्ठलाचे बाह्यरूप तर आपण पाहतोच. परंतु, त्याचे विशाल अंतःकरण जाणवण्यासाठी आणि आपल्या अंतःकरणातून श्रीविठ्ठल पाहण्यासाठी जे अंतर आहे ते व्यक्त करताना व इहोेकातल्या वैकुंठी जाण्यासाठी संत सोपानदेव म्हणतात-
उघडली दृष्टी इंद्रियासकट।
वैकुंठीची वाट पंढरी जाणा॥
आणि एकदा का ही अनुभूती आली की संत सोपानदेव म्हणतात-
दृष्टीभरी पाहे विठ्ठल दैवत।
पूर्ण मनोरथ विठ्ठलदेव॥
म्हणजे आपल्या जीवनातील इतर विषय दूर करून मनोभावे दर्शन घेतल्यास तो आपली कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाही, एवढे सामर्थ्य विठ्ठल भेटीत आहे, असे सोपानदेव म्हणतात. असे मनोभावे दर्शन घेण्यासाठी सारे वैष्णव चंदनाचा टीळा लावून, तुळशीच्या माळा घालून, टाळ-मृदुंगाच्या नादात पुष्पवर्षाव करत एकत्र येतात, या सोहळ्याचे वर्णन करताना संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात-
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा।
टाळ-मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुख सोहळा॥
आणि हा अनुपम्य सुखाचा सोहळा अनुभवण्याहून मोठी पर्वणी ती काय असू शकते आणि सोहळा का कशासाठी तर आपला देव चराचरात आहे. आपण जेथे पाहू तेथे तो आहे, माझ्या दुःखात तो मला कुशीत घेतो, मला लढण्याची जिद्द देतो; माझा आनंद तर त्याच्याच कृपेमुळे आहे; म्हणजे ज्याप्रमाणे ’घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी.’ म्हणजे आई कोठेही असली तरी आपल्या बाळाकडे तिचे लक्ष असते, तसेच माझ्या पांडुरंगाचे-विठूमाऊलीचे माझ्याकडे लक्ष असते आणि म्हणूनच देवशयनी आषाढी एकादशीला हे सर्व वैष्णव विठ्ठलाच्या भेटीसाठी दाखल होतात. ‘माझा हरी नाही असा एक अंशही नाही,’ असे सांगताना मुक्ताई म्हणते-
जेथे जेथे पाहे ते तेथे आहे।
उभारुनी बाहे वेद सांगे॥
म्हणजे फक्त चलांनीच नाही, तर वेदांनीदेखील जाणले आहे की, श्री विठ्ठल हा चराचरात आहे, जिथपर्यंत दृष्टी जाईल जिथपर्यंत अंतःकरण पोहोचू शकेल तिथपर्यंत किंबहुना त्याच्याही पुढे पांडुरंग आहे.
वारी म्हणजे यात्रा आणि मैलोन्मैल प्रवास करत हे यात्रेकरी म्हणजेच वारकरी पंढरीची वारी करत आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात याचे आणखी एक कारण आहे; ते म्हणजे या दिवशी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या, देहूहून तुकाराम महाराजांच्या, पैठणहून संत एकनाथांच्या, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांच्या तर उत्तर भारतातून संत कबीर अशा अनेक संतश्रेष्ठांच्या पालखीचे आगमन चंद्रभागेच्या तिरी वसणार्या या पंढरपूर तीर्थक्षेत्रात होते. या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’देखील म्हटले जाते. ‘देवशयनी’ म्हणजे देवांच्या निद्रेचा कालावधी. मनुष्याचे जे एक वर्ष असते ती देवांची एक संपूर्ण रात्र असते आणि ‘देवशयनी एकादशी’पासून पुढील चार मास हा देवांच्या निद्रेचा काळ असतो. हे चार महिने भगवान शंकर पृथ्वीचे रक्षण करतात, असे म्हटले जाते. त्यामुळे वाईट शक्तींपासून बचाव करण्यासाठी अनेक जण व्रतवैकल्य करत असतात आणि म्हणून ‘देवशयनी एकादशी’ला वारकरी लाखोंनी एकत्र येऊन हरिनामाचा गजर करतात.
आपल्या विठ्ठलाच्या कीर्तीचे गुणगान गाताना अशुभाचा, महापातकाचा नाश होतो, एवढे सामर्थ्य ’श्रीविठ्ठलाच्या’ नामात आहे, असे वर्णन करताना संत जनाबाई म्हणतात,
सर्व सुखाचा आगर।
उभा असे विटेवर॥
आठविता पाय त्याचे।
मग तुम्हा भय कैचे॥
मनुष्य देह म्हटले की, त्यात न संपणार्या इच्छा, वासना, सुख-दुःख येतात. परंतु, सर्व सुखाचा आगर श्रीविठ्ठलच आहे, असे मानण्यासाठी मनसुद्धा या संतांसारखे असावे लागते. किंबहुना, म्हणूनच ते संत आहेत.
कधी आता होणार तें होवो पंढरीनाथा।
न सोडी सर्वथा चरण तुझे॥
असे म्हणत तर कधी,
अग्निमाजिं पडे बाळू। माता धांवे कनवाळू॥
तैसा धांवे माझिया काजा। अंकिला मी दास तुझा॥
असे म्हणत संत नामदेव महाराज तर विठ्ठलाच्या शरणी जातात. जिथे नामदेव महाराज स्वतःला ‘विठ्ठलाचे दास’ म्हणतात तिथे आपल्यासारख्या भक्तांची काय वेगळी भावावस्था असू शकते आणि परोपकार, भूतदया, समाधानी वृत्ती याहून मोठी विठ्ठलाची पूजा काय असू शकते, हे सांगताना संतांच्या मांदियाळीतील संत सेना महाराज म्हणतात-
समचरण विटेवरी।
पाहता समाधान अंतरी॥
असे किती तरी संत आज महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेत, ज्यांनी आयुष्याचे सार सांगितले, जीवनाची दृष्टी दिली, अंतिम सत्य हे शिव आहे, हे सांगितले. पंढरीची वारी शतकानुशतके सुरू आहे. सर्व भक्त तीर्थस्थळी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात. वारीत सहभागी होतात. कित्येक मैल पायी चालत, हरिनामाचा गजर करत येतात आणि म्हणूनच सर्व वातावरण होते आनंदाची डोही आनंद तरंग...