नवी दिल्ली: जर मी निवडून आलो तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू होणार नाही, राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा बुधवारी दि. १३ रोजी म्हणाले. ते म्हणाले, “मी राष्ट्रपती भवनात असल्यास, सीएए लागू होणार नाही याची मी खात्री करेन.” सिन्हा म्हणाले की, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी अद्याप पत्रकार परिषदेला संबोधित न केल्याने मी निराश आहे.
आसामच्या विरोधी खासदारांशी संवाद साधताना सिन्हा म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सीएएची अंमलबजावणी करू शकले नाही. त्यांनी घाईत "मूर्खपणे मसुदा" तयार केला होता. नागरिकत्व हा आसामसाठी एक प्रमुख मुद्दा आहे आणि सरकारला हा कायदा देशभरात आणायचा होता, परंतु अद्याप ते करू शकले नाही. राज्यघटना बाहेरील शक्तींपासून नाही तर सत्तेत असलेल्यांकडून धोक्यात असल्याचा आरोप सिन्हा यांनी केला. राष्ट्रपतीपदाची ही निवडणूक संविधान वाचवण्याची लढाई असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे, असे ते म्हणाले.