मुंबई(प्रतिनिधी): चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात चारगावमध्ये एका गोठ्यात वाघ शिरल्यामुळे गावात गोंधळ उडाला. रविवारी दि. १० रोजी दुपारी चारच्या सुमारास संजय लाखे यांच्या गोठ्यात वाघ शिरला. त्यांनी त्वरित वन विभागाला कळवले. वन विभागाने घटनास्थळी पोचून वाघाला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने शेतशिवारातून आसरा शोधत वाघ गावात आला असल्याची शक्यता आहे.
विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे. तसेच या पावसाचा फटका वन्य प्राण्यांना ही बसल्याचे दिसून येते. हा वाघ आसऱ्याच्या शोधात गावात शिरला असावा असे सांगितले जात आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी आणि आरडाओरडा केल्यामुळे वाघ पोटमाळ्यावर ठाण मांडून बसला होता. या बाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाने घटनास्थळी पोचून वाघाला आपल्या ताब्यात घेतले आहे. वाघाची वैद्यकीय तपासणी करून, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. मानवी वस्तीत वाघ शिरल्याने मानव- प्राणी संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.