मुंबई : " माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला मातोश्रीवर कधी जाणार हे वेळ आल्यावरच समजेल " अशी सूचक प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात नवाच ट्विस्ट आणला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर गोव्यात आपल्या गटाची भेट घेण्यासाठी पोहोचले. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी वरील सूचक विधान केले. शिंदे गटाकडे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार असल्याने हाच गट अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळवणार अशीच चिन्हे दिसत आहेत.
बहुमत चाचणी आता फक्त एक औपचारिकता उरली असून आम्ही ती सहज जिंकू असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. भाजप ,आपला गट आणि इतर मित्रपक्ष मिळून १७५ चे संख्याबळ असल्याने आपण अतिशय सहज बहुमत सिद्ध करू असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी बोलवण्यात आले आहे याच अधिवेशनात नव्या सरकारची बहुमत चाचणी होणे अपेक्षित आहे.