मुंबई: राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. रविवार दि. २६ जून पासून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे ' नॉट रिचेबल' होते. मात्र आता, ते सुरतेहून गुवाहाटीला जात आहेत. उदय सामंत हे शिंदे गटात सामील होणारे आठवे मंत्री आहेत. तर, विधानसभेत निवडून आलेले आदित्य ठाकरे हे एकेमेव मंत्री शिवसेनेत उरल्याचे बोलले जात आहे.
गुवाहाटीला असणाऱ्या आमदारांपैकी आठ मंत्री आहेत. यामध्ये-
१. एकनाथ शिंदे - नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री
२. दादा भुसे- कृषी मंत्री
३. गुलाबराव पाटील-पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
४. संदीपान भुमरे- रोजगार हमी , फलोत्पादन मंत्री
५. उदय सामंत- उच्च आणि तंत्रशिक्षण
६. शंभूराज देसाई- गृह राज्यमंत्री
७. अब्दुल सत्तर- महसूल , ग्रामविकास राज्यमंत्री
८. बच्चू कडू- जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास राज्यमंत्री
९. राजेंद्र शामगोंडा यड्रावकर -सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री
यांचा समावेश आहे.
दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री आता शिवसेनेत उरले आहेत. अनिल परब, सुभाष देसाई, आणि उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. उदय सामंत यांचे मातोश्रीशी आणि आदित्य ठाकरेंशी घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा आहे. मात्र सध्या ते, सुरतहून गुवाहाटीला जाणार आहेत. विधानसभेत निवडून आलेले आमदार हे पक्षाची खरी ताकद असतात. जनमताचा कौल त्यांच्या बाजूने असतो. त्यांच्या विधानसभा क्षेत्रात या आमदारांना समर्थन असते. अशातच आता उदय सामंत या आठव्या मंत्रांच्या गुवाहाटीला जाण्याने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.