मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ सुरु आहे. ठाकरे सरकार पडेल का? यासंबंधी चर्चांना वेग आला आहे. अनेक विरोधी पक्षनेत्यांकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विधानसभेचे गटनेतेपद हटवून अजय चौधरी यांची शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून नियुक्ती केली आहे. या सर्व घडामोडीवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत सेनेवर निशाणा साधला आहे.
"औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांचा पाठींबा घेणारे कोसळणार……वसुली सरकार बाय बाय !" असे म्हणत राजू पाटलांनी सेनेवर खोचक टीका केली आहे. "भविष्य वर्तवण्यासाठी पंचांग हवेच असे नाही. काही माणसांची वृत्ती आणि इतिहास हा भविष्याची आणि पूर्वकमाईची वासलात लावायला पुरेसा असतो." असेदेखील ते ट्विटरवरून म्हणाले.