मुंबई : राज्यसभा निवडणुकीचे निकाल हे अजिबात धक्कादायक वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी येथे दिली. मात्र या निवडणुकीत सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी जो चमत्कार झाला तो मान्य करावा लागेल असेही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी यशस्वी झाल्याचे देखील ते म्हणाले. या निकालामुळे आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही असेही पवार यांनी सांगितले. तिन्ही पक्षात उत्तम समन्वय असल्याचे ते मानले.
पटेलांना जादा मिळालेले मत शिवसेनेला जाणार नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना जादा मिळालेले मत शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाले असते, तर सहावा उमेदवार विजयी होऊ शकला असता का? यावर त्यांनी पटेलांना मिळालेले मत हे शिवसेनेला जाणार नव्हते, ते त्यांच्या विरोधात होते असे पवार यांनी सांगितले. जो चमत्कार झाला तो देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाल्याचे ते म्हणाले. सहाव्या जागेसाठी अपक्षांची मतांची संख्या आघाडीमध्ये कमी होती,अपक्षांच्या लॉटमध्ये गंमत झाल्याचेही ते म्हणाले.