मुंबई : सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन स्वरूपात घेण्यात याव्या यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची मागणी सुरु होती, पण ती मागणी आता पूर्ण होऊ शकणार नाही. कारण यापुढील सर्व प्रकारच्या परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात होणार असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. कुलगुरूंच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे असे उदय सामंत यांनी सांगितले.
परीक्षा ऑनलाईन घेतल्या गेल्या तर विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीचा कस लागणार नाही. हुशार विद्यार्थ्यांचे या मध्ये नुकसान होते. "उद्योग विभाग या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेमध्ये फरक करून विद्यार्थ्यांचे नुकसान करीत असल्यामुळे या पुढील सर्व परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. एकूण १३ अकृषी विद्यापीठातील कुलगुरूंनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याला महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे", असे उदय सामंत यांनी सांगितले.
"ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा असा आदेश आम्ही काढला नाही हे देखील त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले. सर्व विद्यापीठांनी ऑफलाईन परीक्षा घेणार असल्याची भूमिका घेतली असून, आता विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी तयार रहावे", असेही उदय सामंत म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या मागण्यानूसार, ऑफलाईन परीक्षेमध्ये एका तासाला १५ मिनिटे वाढवून देण्यात आली आहे, दोन परीक्षेमधील अंतर हे दोन दिवस ठेवण्यात आले आहे, १० प्रश्नांचा मिळून एक प्रश्नसंच देण्यात येणार आहे. अशी योजना केली गेली असून विद्यार्थ्यांनी कृपा करून ऑनलाईन परीक्षेची मागणी करू नये, अशी उदय सामंत यांनी हात जोडून विनंती केली आहे.