ठाणे: तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ‘ठाणे’ शहरातील शेकडो विहिरी मरणपंथाला लागल्या आहेत. ठाण्यात निम्मे तलाव गायब झाले असून, तब्बल 800 विहिरींपैकी 555 विहिरी शिल्लक आहेत. त्यापैकी 150 विहिरी जुन्या ठाण्यात आहेत. नळपाणी योजना सुरू झाल्यानंतर गेली कित्येक वर्षे वापराविना पडून असलेल्या या विहिरींचे पुनरुज्जीवन करून पाणी वापरात आणल्यास टंचाईच्या काळात मोठा आधार मिळू शकेल. दरवर्षी ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडून या विहिरींच्या पाण्याची गुणवत्ता तपासली जात असली तरी एकाही विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे उघड झाले आहे. तेव्हा, अतिरिक्त पाण्याची नितांत आवश्यकता असतानाही वाढत्या नागरीकरणाच्या रेट्यात याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शिलाहार काळापासून ब्रिटिश कारकिर्दीत ठाणे शहर तलावांचे शहर गणले जात असे. ठाण्यात एकूण 65 तलावांपैकी निम्मे म्हणजेच 33 तलाव अस्तित्वात आहेत, तर एक तपापूर्वी 2009 मध्ये महापालिकेने केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत 150 विहिरी आणि 16 कूपनलिका आहेत. संपूर्ण पालिका क्षेत्रात 555 विहिरी आहेत. पूर्वी ठाणे महापालिका हद्दीतील जुन्या वस्त्या, गावठाणे, पाडे आणि कोळीवाड्यांची तहान भागवण्याचे काम विहिरी करीत होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विहिरींची संख्या नोंदवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये यापैकी अनेक विहिरी शहरीकरणाच्या आणि विकासाच्या बळी पडल्या आहेत. बांधकामांचे अतिक्रमणे करून विहिरींवर काँक्रिट टाकून विहिरी बुजवण्यात आल्या. नळाचे पाणी उपलब्ध असल्यामुळे विहिरींच्या पाण्याचा वापर बंद करून त्या नष्ट करण्याचा सपाटा शहरात सुरू झाला. त्यामुळे पालिकेकडून नोंदवलेल्या विहिरींपैकी सध्या अस्तित्वातील विहिरींची संख्या कमी होऊ लागल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे शहरात अस्तित्व टिकून असलेल्या विहिरींच्या पाण्याला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. महापालिकेच्या मलनि:स्सारण वाहिन्या, सांडपाणी वाहिन्या, गटारे आणि नाले यांचे नियोजन करताना आजूबाजूंच्या विहिरींचा विचार होत नसल्यामुळे अनेक विहिरींना प्रदूषित पाण्याचा विळखा पडल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळेच अशा अनेक विहिरींचे पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये दरवर्षी अधोरेखित होऊ लागले आहे.
ठाणे शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून घोडबंदरपट्ट्यात वाढलेल्या ग़ृहसंकुलांवर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहेत. अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशावेळी शहरातील विहिरींमधील पाणी वापरायोग्य नसल्यामुळे त्याचा उपयोग पूर्णपणे थांबला आहे. काही ठिकाणी या पाण्याचा दुय्यम वापरासाठी उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा शहरातील या विहिरींमधील पाण्याचा जास्तीत जास्त वापर सुरू केल्यास पिण्याच्या पाण्यावरील ताण दूर होण्यास मदत होऊ शकणार आहे. तसेच, भूमिगत जलस्त्रोत खुले होण्यासही मदत होईल.
‘विहिरींचे पुनरुज्जीवन करा’
शहरातील अनेक विहीरी कचरा अथवा राडारोडा टाकल्याने पडीक बनल्या आहेत. अनेक ठिकाणी लोखंडी जाळी लावून विहीरीचे तोंड बंद करून टाकण्यात आले असून काही विहीरी तर बुजवण्यात आल्या आहेत. तेव्हा या विहिरी पुनरुज्जीवित करून पाण्याचा वापर सुरु केल्यास पाणी टंचाई रोखण्यास काही अंशी मदत होऊ शकेल, असे मत ज्येष्ठ नागरीकांनी व्यक्त केले आहे.
स्वतःचे धरण नाही, किमान विहिरी सांभाळा
ठाणे महानगरपालिकेला शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अजूनही स्वतंत्र धरण उपलब्ध करता आलेले नाही. त्यामुळे पर्जन्य जलसंधारण योजना राबविणे, विहिरी आणि कूपनलिका दुरुस्त करणे हे उपाय प्राधान्याने योजावे लागणार आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी शहरातील विहिरींच्या स्वच्छतेसाठी जिल्हा नियोजनमधून विशेष योजना जाहीर केली होती. त्यातून ठाण्यातील प्रत्येक विहिरीची डागडुजीदेखील करण्यात येणार होती. मात्र, त्यांची बदली होताच ही योजना मागे पडली.
विहिरींमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत
ठाण्याला खाडीने वेढले आहे. त्यामुळे भुगर्भातील सॉफ्ट वॉटरचे प्रमाण घटले, तर खाडीचे पाणी आत शिरून पाण्याची गुणवत्ता नष्ट होईल. पारशी समाज आजही विहिरींचे पाणी पितो. कारण प्राधिकरणांकडून येणारे पाणी ‘क्लोरीनेटेड’ असते. पूर्वी पावसाचे पाणी विहिरीत साठवण्याची प्रक्रिया केली जात असल्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होई. तेव्हा, वाढत्या नागरीकरणात संबंधित प्राधिकरणांकडून व्यापक प्रयत्नांची गरज आहे.
-राजेंद्र भट, जलतज्ज्ञ