ई-वाहनांच्या ई-साधनांचा निर्माता

    01-Apr-2022
Total Views | 102

startups
 
 
‘आयआयटी कानपूर’मधून ‘बी.टेक’ची पदवी संपादित केल्यानंतर रुळलेली नोकरीची वाट सोडून या उद्योजकाने आपल्या स्वप्नांना, कल्पनांना स्वतः आकार देण्यासाठी उद्योजकतेची स्वतंत्र वाट चोखाळली. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणार्‍या ‘कुलॉम्ब लायटेक प्रा. लि.’च्या अमेय साठे यांच्या उद्योजकीय प्रवासाची ही कहाणी....
आयआयटी कानपूर’सारख्या भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेत अमेय साठे यांनी ‘मटेरियल आणि इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयांत ‘बी.टेक’ ही पदवी मिळवली. अशा मोठ्या संस्थेत शिक्षण घेऊन स्वतःचे आयुष्य घडवावे, हे बर्‍याच तरुणांचे स्वप्न असते. तसेच यांसारख्या संस्थांतून शिक्षण घेणार्‍यांना देशात तसेच परदेशात मोठ्या पगाराच्या नोकर्‍यांची संधी खुणावत असते. या सर्व गोष्टी अनुकूल असतानासुद्धा या सर्व संधी नाकारून नव्या तयार होणार्‍या संधींचा फायदा उचलून स्वतःचे विश्व स्वतः तयार करायचे, हा निश्चय अमेय यांनी केला. कोरोना काळानंतर ‘पर्यावरण’ हा सगळ्या जगासाठी खूपच महत्त्वाचा अन् तितक्याच गांभीर्याचा विषय ठरला. पर्यावरणाचे संवर्धन, प्रदूषण कमी करणे हे किती महत्त्वाचे आहे, याची जगालाही जाणीव झाली. फक्त नफा कमविणे हेच आपले एकमेव उद्दिष्ट न ठेवता, आपल्या ज्ञानाचा, त्यातूनही तंत्रज्ञानातील आपल्या शिक्षणाचा देशाला, समाजाला काहीतरी योगदान देण्यासाठी उपयोग झाला पाहिजे, याच भावनेतून अमेय आणि त्यांचे ‘कानपूर आयआयटी’मधले सहाध्यायी दर्शील धरोड यांनी ‘कुलॉम्ब लायटेक प्रा. लि.’ची स्थापना केली.
 
‘कुलॉम्ब लायटेक प्रा. लि.’ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणार्‍या बॅटरीजची निर्मिती करते. तसेच या वाहनांचे चार्जिंग स्टेशन्स, चार्जर्स, त्यांच्या संबंधी नवनवीन संशोधन यावर ही कंपनी काम करते. या बॅटरीजची डिझाईन्स, त्यांची निर्मिती, त्यांच्या चाचण्या, त्यांची प्रत्यक्ष देखभाल-दुरुस्ती या सर्व व्यावसायिक बाबींकडे ‘कुलॉम्ब लायटेक प्रा. लि.’ लक्ष केंद्रित करते. ‘भौतिकशास्त्र’ विषयातील एका शास्त्रज्ञाच्या नावाने सुरू झालेली ही कंपनी त्या शास्त्रज्ञासारखीच वेगळ्या, अवघड गोष्टींचे संधींमध्ये रूपांतर करत पुढे चालली आहे. “कोरोनासारख्या अत्यंत अनिश्चिततेच्या काळात काळाची पुढची पावले ओळखून व्यवसाय सुरू करता आला पाहिजे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे,” असे अमेय सांगतात. घरात व्यावसायिक पार्श्वभूमी असल्याने घरातून व्यवसाय सुरू करतोय, म्हटल्यावर फारसा विरोध झाला नाही. लहानपणापासूनच उद्योजक होण्याचे अमेय यांचे स्वप्न होते. स्वतःच्या संकल्पनांना स्वतः आकार देण्यासाठी आपल्या हातात संपूर्ण सूत्रे असणे गरजेचे आहे, याच भावनेतून त्यांची पावले व्यवसायाकडे वळली. आपण व्यवसायसुद्धा समाजाला काहीतरी उपयोग होईल, अशाच क्षेत्रांत करायचा, हे पक्के ठरलेले असल्याने त्यांनी विषयही असाच हटके निवडला, तो म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांचा. भारतासह जगात कोरोना काळानंतर इलेक्ट्रिक वाहनांबद्दल जागरूकतादेखील वाढली आहे. जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती, त्यांना उपयुक्त ठरतील, अशा पायाभूत सुविधा तयार करणे, यांसाठी खूप संशोधन होणे गरजेचे आहे. भारत सरकारसुद्धा आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेते आहे आणि या क्षेत्राला पूरक योजनासुद्धा राबवित आहे. त्यामुळे या क्षेत्राला भविष्यात खूप चांगली मागणी असेल, हे निश्चित. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वात मोठी समस्या ही ‘चार्जिंग स्टेशन्स’ची आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजनिर्मिती निर्माण करणे, हे खूप मोठे आव्हान असले, तरी त्यावर अपारंपरिक ऊर्जा हा अत्यंत व्यवहार्य मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे, असे अमेय या व्यवसायाच्या भविष्याबद्दल सांगतात.
 
“जरी घरच्यांकडून व्यवसाय करायला आडकाठी झाली नसली, तरी इलेक्ट्रिक वाहनांचे क्षेत्र हे खूपच नवीन असल्याने ग्राहकांना या संकल्पना, त्यांची व्यवहार्यता, प्रशिक्षित मनुष्यबळ यांसारख्या समस्यांना आम्हाला तोंड द्यावेच लागले,”असे अमेय सांगतात. या प्रश्नावर मार्ग काढताना आम्हाला आमचे तंत्रज्ञानातील ज्ञान उपयोगास पडले. आम्ही दोघेही इंजिनिअर असल्याने व्यवसायातील खाचखळगे समजून घेऊन त्याच्यावर लगेच कृती करणे, आम्हाला चांगले जमते. तेच आम्ही येथे केले. आम्हाला हवे तसे मनुष्यबळ आम्हाला लोकांना प्रशिक्षण देऊन तयार करावे लागले. अमेय आणि त्यांचे मित्र दर्शील यांनी या उत्पादनाचा खूप बारकाईने, अगदी छोट्या पातळीपासून विचार केला असल्याने त्यांना त्यांचा व्यवसाय उभे करणे फारसे अवघड गेले नाही. सतत ध्येये ठरवून काम करत असल्याने किती काळात आम्हाला काय सध्या करायचे आहे, हे माहीत असल्याने दोघानांही एकत्र उत्तम काम करता आले. अमेय यांनी हासुद्धा अभ्यास केला आहे की, आपल्याला कुठले उत्पादन घेताना किती मनुष्यबळ लागणार आहे? त्याला काय प्रशिक्षण द्यावे लागेल, याचा अभ्यास असल्याने आम्हाला निर्णय घेणे सोपे गेले. पहिल्यांदा घरच्यांकडूनच भांडवल घेऊन काम सुरू केले. नंतर आपल्या कामातून आपल्या गुणवत्तेची लोकांना खात्री पटवून देत आम्ही गुंतवणूकदार मिळवले. त्यातून आम्ही आमच्या व्यवसायाची वाटचाल करत आहोत. प्रदूषण आणि त्यापासून होणारे धोके यांचा साराच जगणे भरपूर अनुभव घेतला असल्याने त्यावर उपाय म्हणून आता सर्व जण इलेक्ट्रिक वाहनांकडे बघत आहेत. प्रदूषण कमी करणे, भारतासारख्या देशासमोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे खनिज तेलावरचे अवलंबित्व, शहरांमध्ये वाढते प्रदूषण यांसारख्या प्रश्नांवर इलेक्ट्रिक वाहने हा नक्कीच एक उपाय ठरू शकतो. या इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रचंड प्रमाणात लागणारी वीज आपण अपारंपरिक स्रोतांपासून मिळवू शकतो, जेणेकरून आपला खर्च आणि गरज दोन्ही व्यवस्थित भागू शकतील.
 
 
“भारतात सध्या स्टर्टअप्सना सध्या खूप ग्लॅमर मिळत आहे, जे एका मर्यादेपर्यंत चांगले असले तरी असे काहीतरी ग्लॅमर मिळेल, म्हणून व्यवसाय सुरु करत असाल, तर ती खूप चुकीची गोष्ट आहे. व्यवसाय ही गोष्ट फक्त ’ग्लॅमर’साठी न करता एक खूप गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे जर खरेच जर तशी प्रेरणा मनातून असेल, तरच व्यवसायात उतरले पाहिजे,” असे अमेय सांगतात. “व्यवसाय सुरु करताना मी जे करतोय ते खरेच फायद्याचे आहे का? यातून नक्की कोणाला फायदा होणार आहे? माझा ग्राहकवर्ग नेमका कोणता असणार आहे? माझ्या उत्पादनाने समजाला खरेच फायदा होणार आहे का? याची सर्व माहिती आणि सखोल अभ्यास व्यवसाय सुरु करण्याच्या पूर्वी असणे गरजेचे आहे. कुठलाही व्यवसाय करताना आधी आपल्याला आपल्या स्वतःच्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर यावे लागेल. मनाची तयारी करावी लागेल की, मला अडचणी या येणारच आहेत. जर अडचणी येत असतील, तर मी योग्य मार्गावर आहे असे स्वतःला सांगावे. अडचणींमधून मार्ग काढताच पुढे जावे लागते आणि तसे केल्यानेच यशस्वी होता येते. कुठलाही व्यवसाय करताना पहिले आपले ‘व्हिजन’ स्पष्ट असले पाहिजे. पुढच्या किती वर्षांनंतर आपण कुठल्या पातळीवर पोहोचलेलो असू, याचे ठोकताळे आधीच मांडले पाहिजेत, तरच आपल्याला नियोजन करता येते.”
 
 
कोरोनासारख्या बाहेर अतिशय निराशाजनक काळात व्यवसाय सुरु करताना मनाची खूप तयारी करावी लागल्याचेही अमेय सांगतात. अशा अत्यंत निराशेच्या वातावरणातून जायचे असेल तर सर्वप्रथम आपण करतोय, ते काम खरेच आपल्याला आवडतेय का, हे बघितले पाहिजे. कारण, जर खरेच जर आपल्याला ते काम आवडत नसेल, तर आपण ते करून काहीच फायदा होणार नाही. कुठल्याही चांगल्या दीर्घकाळ टिकणार्‍या गोष्टींचा दृश्य परिणाम दिसण्यासाठी थोडा काळ जावा लागतो. लगेच काहीच मिळणार नाही, तेव्हा अतिशय संयम ठेवून मनाची तयारी ठेवून सातत्याने प्रयत्न केले, तर कुठलाही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, असा यशाचा मूलमंत्र अमेय देतात.
- हर्षद वैद्य
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल;

दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल; 'महाराष्ट्र मेड लिकर' बाजारात आणणार

महाराष्ट्राच्या तिजोरीत थेट १४ हजार कोटी रुपयांची भर घालण्यासाठी महायुती सरकारने मद्य धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मंगळवार, दि. १० जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क ३ पटीवरून ४.५ पट वाढवण्याचा, तर देशी मद्याचा दर १८० रुपयांवरून २०५ रुपये प्रति प्रुफ लिटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 'महाराष्ट्र मेड लिकर' या धान्याधारित मद्याच्या नव्या प्रकारालाही मंजुरी देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121