नलिनीबाई गजानन पुरंदरे हायस्कूल, मुलुंडच्या निवृत्त मुख्याध्यापिका सुमती बर्डे बाई यांचे आत्मचरित्र ‘मागे वळून पाहताना’ म्हणजे तरुण पिढीसाठी दिपस्तंभ आहे. आत्मकथनाबरोबरच त्यात मानवी जीवनाचे सुक्ष्म निरीक्षण आहे.
बाईंनी नुकतेच नव्वदव्या वर्षांत पदार्पण केले. एक कृतार्थ निवृत्ती जीवन त्या जगत आहेत. वार्धक्यातील निराशेवर मात करून बाईंनी एक अतिशय सुंदर आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे. त्यांचा जीवन प्रवास नाशिक गावापासून सुरू होतो. बाईंचा जन्म १९३२ साली नाशिकला झाला. त्यावेळेचे नाशिक गाव, वाडे, अंधारी घरे यांचे वर्णन तुम्हाला जुन्या नाशिक गावात घेऊन जाते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुलींच्या शिक्षणाचा प्रसार नगण्य होता. ‘व्हर्नक्युलर फायनल’ (सातवी) पास झाल्यावर बर्याचशा मुलींची लग्ने १४-१५व्या वर्षांत व्हायची. इंग्रजी शिकून ‘मॅट्रिक’ची परीक्षा देण्याच्या वाटेला त्याकाळात मुली सहसा जात नव्हत्या. बाईंचे वडील वामन काशिनाथ जोशी हे उच्च शिक्षित व पुढारलेल्या विचारांचे होते. महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भागही घेतला होता. आपल्या दोन्ही मुलींना त्यांनी मुलासारखे शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. शालेय जीवनात बर्डेबाईंनी १९४२ची ‘चले जाओ’ चळवळ जवळून पाहिली. त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार होते. मार्च १९४९ साली बाई ‘एसएससी’ झाल्या. त्या नाशिकच्या रुंगठा हायस्कूलच्या विद्यार्थिनींमध्ये पहिल्या आल्या. १४-१५ वर्षे हे त्या वेळेसच्या मुलींच्या लग्नाचे वय असल्यामुळे बाईंच्या लग्नाविषयी नातेवाईकांकडून विचारणा होऊ लागली. बाईंच्या वडिलांनी त्यांना निक्षून सांगितले, “माझ्या मुली ‘ग्रॅज्युएट’ झाल्याशिवाय मी त्यांची लग्ने लावणार नाही.” १९५३ साली बाई ‘बीए’ झाल्या. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या ‘टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन’मधून ‘बीटी’केले. त्यांचा विवाह जून १९५७ साली शंकरराव बर्डे यांच्या बरोबर झाला. लग्नानंतर नाशिकच्या प्रशस्त बंगल्यातून बाई डोंबिवलीच्या दोन खणी घरात आल्या. तेथून त्या मुलुंडमध्ये स्थलांतरीत झाल्या. मुलुंड आणि पुरंदरे हायस्कूल ही त्यांची कर्मभूमी होणार होती.
१९५९ साली नव्याने स्थापन झालेल्या शिक्षण संस्थेच्या शाळेत बाई अर्धावेळ शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. छोट्या रोहिणीला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या जाऊबाई मालती वहिनी यांनी घेतली. शिक्षकी पेशाला जेमतेम सहा महिने झाले असताना बाईंनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. दुसर्या बाळंतपणानंतर आपल्याला नोकरी झेपणार नाही, असे त्यांना वाटले. दुसर्या मुलाच्या जन्मानंतरचे त्यांचे आजारपण त्रासदायक होते. त्यामुळे नोकरी हा विचारदेखील बाईंच्या डोक्यात नव्हता. बाईंच्या आई-वडिलांची इच्छा होती की, बाईंनी शिक्षिकी पेशा सोडू नये. मे १९६० साली मोठी मुलगी रोहिणी हिला नाशिकला आई-वडिलांकडे ठेवून सहा महिन्याच्या रवीला घेऊन त्या मुलुंडला आल्या. बाईंमधल्या आईचे मन या निर्णयाशी सहमत होत नव्हते. बाई अक्षरश: काळजावर दगड ठेवून मुलुंडला आल्या. जून १९६० साली त्या पुरंदरे हायस्कूलमध्येपूर्णवेळ शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. याच शाळेत त्या पुढे ‘सुपरवायझर’ झाल्या. डिसेंबर १९६९ मध्ये त्या शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या. १९९० मध्ये त्या यशस्वी कारकिर्दीनंतर निवृत्त झाल्या. एक सुशिक्षित यशस्वी गृहिणी, आदर्श शिक्षिका, आदर्श माता, उत्कृष्ट प्रशासक अशा वेगवेगळ्या भूमिका बाईंनी पार पाडल्या. आपल्या मुलीला नाशिकला आपल्यापासून लांब राहावे लागले, याची खंत बाईंना कायम होती. पुढे त्यांचा मुलगा रवीदेखील पाचवीपासून नाशिकच्या शाळेत गेला व आपल्या आजी-आजोबांबरोबर राहू लागला. शिक्षिका, सुपरवायझर आणि मुख्याध्यापिका अशा तिन्ही जबाबदार्या बाईंनी व्यवस्थित पार पाडल्या. इंग्रजी शिकविण्याची त्यांची खास पद्धत होती. वर्गातल्या सर्व मुलांना समजावे म्हणून त्या वेगवेगळी उदाहरणे देऊन विषय समजावून सांगत. बाईंनी कुणाला शिक्षा केल्याचे प्रसंग फार क्वचितच आले असतील.
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्या सतत प्रयत्नशील असत. त्या मुख्याध्यापक झाल्यावर शिक्षक आणि संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य यांच्यामधील त्या दुवा बनल्या. आठ वर्गांची आणि दोन मजल्यांची शाळा आता पुष्कळ मोठी झाली होती. निधी संकलनासाठी ठेवण्यात आलेल्या सर्वच कार्यक्रमात बाईंनी अनेक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन संस्थेस निधी गोळा करून दिला. कठोर निर्णय घेण्याची वेळ आली, तर त्यांनी तो योग्य वेळेवर घेऊन शाळेचे नाव मोठे केले. त्यांच्या काळात शाळेला भरपूर लोकप्रियता मिळाली. मुलुंडमधील नंबर एकची मराठी शाळा म्हणून पुरंदरे हायस्कूल ओळखली जाऊ लागली. शाळा प्रवेशासाठी मागणी वाढू लागली. या शाळेत शिकलेले बाईंचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात नावारुपाला आले. अनेक विशेष शैक्षणिक प्रकल्प त्यांनी शाळेत राबविले. मुलांचे इंग्रजी हस्ताक्षर सुधारावे म्हणून त्यांनी चार व दोन आखीव ओळींचे खास ‘ब्लॅक बोर्ड’ तयार करवून घेतले. त्यांच्या प्रकल्पाचा केंद्र सरकारच्या शैक्षणिक खात्यातर्फे गौरव करण्यात आला. निवृत्तीनंतरही बाईंनी आपले शैक्षणिक आणि सामाजिक कार्य चालू ठेवले. स्कॉलरशीपच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्या अनेक वर्षे करत होत्या. त्यांच्यासाठी सराव परीक्षा वेगवेगळ्या केंद्रावर घेणे, हा देखील उपक्रम त्या राबवत होत्या. हे काम एवढे वाढले की, त्याच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी ‘सावित्रीबाई फुले अकॅडमी’ची स्थापना केली. ‘नवनीत प्रकाशन’च्या अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांचे पती शंकरराव बर्डे यांनी मुलुंडमध्ये ‘साने गुरूजी बाल विकास मंदिर’ या संस्थेच्या शाखेची स्थापना केली. या संस्थेच्या कार्यात देखील बाईंचा सक्रिय सहभाग असायचा. शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावत असताना आपल्या मुलीला दूर ठेवायला लागले, याची बाईंना सतत खंत असायची. ही खंत त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केली.
आई होऊन दिलेच नाही काही कशी होऊ मी उतराई?
स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या बर्डे बाईंचा जीवनपट म्हणजे एका आदर्श शिक्षिकेचा जीवनपट. मुलीमध्ये शिक्षण लोकप्रिय नसलेल्या काळात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. बालपणी झालेल्या चांगल्या संस्कारांचा उपयोग त्यांनी चांगली पिढी घडविण्यासाठी केला. आयुष्यात अनेक चढउतार आले. परंतु, बाई कधी डगमगल्या नाहीत. आपले कर्तव्य त्या निष्काम भावनेने पार पाडत गेल्या. त्या आदर्श जीवनाचे प्रतिबिंबच ‘मागे वळून पाहताना’ या त्यांच्या आत्मचरित्रात दिसते. या पुस्तकाचे सुंदर शब्दांकन बाईंचे विद्यार्थी माधव शिरवळकर यांनी केले आहे. प्रसिद्ध बाल साहित्यिका डॉ. विजया वाड यांची प्रस्तावना पुस्तकास लाभली आहे. बाईंचे सहयोगी श्रीकांत देशमुख सर आणि मीना देशपांडे बाई यांच्या लेखाचा देखील या पुस्तकात समावेश आहे. हे पुस्तक शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक व आम वाचकांनी अवश्य वाचावे. सध्या सार्वजनिक जीवनात चुकीचे आदर्श निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बाईंचा जीवनपट तरुण पिढीसाठी दिपस्तंभ ठरू शकेल.
पुस्तकाचे नाव : मागे वळून पाहताना
लेखिका : सुमती बर्डे
शब्दांकन : माधव शिरवळकर
प्रकाशक : अल्टिमेट असोसिएट, नाशिक
संपर्क : ९८२२०१७०९१
पृष्ठसंख्या : १७०
मूल्य : २०० रु
- डॉ. मिलिंद शेजवळ