उद्ध्वस्त स्वप्नांचा प्रवास...

    19-Mar-2022
Total Views | 75

The Kashmir Files1
 
 
 
‘पृथ्वीवरील स्वर्ग’ मानल्या जाणर्‍या काश्मीरमधील सत्य काही औरच होते, हे दाखवणारा, मन सुन्न करणारा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट. १९९० साली घडलेली, मन विषण्ण करणारी घटना-आपलेच घर, आपलेच राज्य सोडून जायला भाग पाडणारा दहशतवाद, स्त्रियांवर झालेले बलात्कार, खुलेआम झालेल्या कत्तली बघून प्रत्येकाचे मन हेलावते. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, तरीही काश्मिरी पंडितांच्या पलायनामागील कटू वास्तव मांडण्याचा प्रयत्न चित्रपटांच्या माध्यमातून झाला नाही, हे दुर्दैवच! पण, हेच धाडस केले ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी. अग्निहोत्री यांनी यापूर्वीही ‘द ताश्कंद फाईल्स’, ‘बुद्धा इन ट्रॅफिक जाम’ असे राजकीय-सामाजिक विषय हाताळणारे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. अशा विविध चित्रपटांमधून निर्भिडपणे वास्तव समोर आणायचा त्यांनी केलेला प्रयत्न हा वाखाणण्याजोगाच म्हणावा लागेल. त्यामुळे भारतीय चित्रपट हा नक्कीच रंजकतेच्या चौकटीबाहेर येण्याचा प्रयत्न करतोय, हे या चित्रपटाने सिद्ध केले.
 
 
 
काश्मीर म्हटले की, आपल्या नजरेसमोर येते सौंदर्याने नटलेली देवभूमी आणि आल्हाददायक वातावरण. परंतु, या चित्रपटात बर्फाच्छादित शुभ्र रंग हा अक्षरश: अंगावर येतो. सौंदर्यापलीकडची शांतता ऐकताना मनावर अनामिक दडपण येते. शुभ्र रंग शांततेचे प्रतीक आहे. पण, चित्रपटात हिमाच्छादित शुभ्र रंग बघून कित्येक पुरलेल्या, दाबलेल्या किंकाळ्या कानठळ्या बसवतात. काश्मीरच्या भूमीला हजारो-हजारो वर्षांचा ऋषीमुनींचा,विचारवंतांचा, तत्त्ववेत्त्यांचा, शास्त्रकारांचा इतिहास आहे. ज्या भूमीत शिवशंकाराचा वास होता, जिथे सरस्वतीची उपासना केली गेली, ज्या भूमीत इतिहास लिहिला गेला, नाट्यशास्त्र लिहिले गेले, पंचतंत्र लिहिले गेले, तिथे हत्यारांचे, हिंसेचे तंत्र वापरले जावे; ज्या भूमीवरून ज्ञानगंगा वाहत आली, तिथे रक्ताच्या नद्या वाहव्यात हे विचार मन अस्वस्थ करणारे आहेत.
 
 
 
‘वास्तव’ आणि ‘आभासी वास्तव’ यात अडकलेल्या, आपल्या प्राध्यापकाकडून (पल्लवी जोशी) ब्रेनवॉश झाल्यामुळे भरकटलेल्या कृष्णा (दर्शन कुमार) या व्यक्तिरेखेचा हा खडतर प्रवास आहे. ज्ञानदेवता सरस्वतीचीउपासना करणारे, शंकरावर आणि आपल्या जन्भूमीवर, कर्मभूमीवर असलेले प्रेम, निष्ठा, भारतातून ‘कलम ३७०’ रद्द व्हावे, ही तळमळ, त्यासाठी अविरत अखंड लढणारे पुष्करनाथ पंडित (अनुपम खेर) यांचा हा प्रवास आहे. न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार्‍या ब्रह्मदत्त (मिथुन चक्रवर्ती)चा हा प्रवास आहे. एवढी विदारक परिस्थिती डोळ्यांनी पाहूनही ‘सिस्टीम’ नावाच्या दगडाखाली अडकलेल्या ‘डीजीपी’ हरी नारायण (पुनीतइस्सर) यांचा हा प्रवास आहे. जीव पणाला लावून खरी बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार्‍या विष्णू राम (अतुल श्रीवास्तव)यांचा हा प्रवास आहे. मुख्य म्हणजे, काश्मिरी पंडितांच्या उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांचा, आयुष्यांचा हा प्रवास आहे.
 
 
 
दि. १९ जानेवारी, १९९०चा तो दिवस, ज्या दिवशी ‘यहाँ क्या चलेगा, निजाम-ए-मुस्तफा’ ‘काश्मीर में अगर रेहना हैं, अल्लाहू अकबर केहना हैं’ असे नारे लगावत ‘असि गछि पाकिस्तान, बटव रोअस त बटवेन सान’ म्हणजेच आम्हाला पाकिस्तान तर हवेच आहे, पण हिंदू पुरुषांशिवाय त्यांच्या स्त्रिया आम्हाला हव्या आहेत, अशा किळसवाण्या धमक्या काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांकडून मिळत होत्या. या चित्रपटात गाणी जरी नसलीत तरी चित्रपटाची एकूणच वातावरणनिर्मिती, अभिनय आणि संवाद मात्र प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. आता हेच वाक्य बघा - ‘काश्मीर का सच इतना सच हैं की वो हमेशा झूट ही लगता हैं’ या एका वाक्यातच काश्मीरचे दाहक वास्तव,काश्मिरी पंडितांची करूणता व्यक्त होते. ‘रालीव ,त्सालीव, गालीव’ म्हणजेच ‘इस्लाम स्वीकारा, घर सोडून निघून जा किंवा मरा,’ अशा घोषणा करत काश्मीरच्या खोर्‍यात मन गोठवून टाकणारा नरसंहार झाला. चित्रपटात या नरसंहाराचे दृश्य दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी जसेच्या तसे उभे केले आहे. चित्रपटात हे आणि अशी अनेक दृश्य हिंसेचे टोक नक्कीच गाठतात. परंतु, हेच काश्मीरचे सत्य होते.
 
 
 
१९९० साली ७५ हजार, ३४३ कुटुंब काश्मीरमध्ये वास्तव्यास होती. परंतु, १९९० ते १९९२च्या दरम्यान तब्बल ७० हजार कुटुंबानी काश्मीर खोरे सोडले. असे म्हटले जाते की, १९९० ते २०११ दरम्यान तब्बल ३९९ काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या असून, मागील ३० वर्षांपासून केवळ ८०० हिंदू कुटुंब काश्मीर खोर्‍यामध्ये शिल्लक आहेत. हे आकडे बघून, चित्रपट बघून, हा विषय सर्वांसमोर यायला ३० वर्षं का लागली असावीत? हा व असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, भाषा सुंबळी, प्रकाश बेलवाडी, पुनीत इस्सर अशा अनेक दिग्गजांनी या चित्रपटात भूमिका निभावल्या आहेत. त्यांच्या वास्तववादी अभिनयामुळे चित्रपटाला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. त्यामुळे चित्रपटात केलेल्या वातावरण निर्मितीमुळे प्रेक्षक शेवटपर्यंत चित्रपटात गुंतून राहतो. चित्रपटात एकच गाणे आहे. काश्मिरी मुलांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना कसे भरकटवले गेले हे ‘हम देखेंगे’ या गाण्यातून, प्रोफेसर राधिका हिच्या भाषणातून दिसून येते. हे फुटीरतावादी लोकांचे उत्तम उदाहरण आहे. या व्यतिरिक्त चित्रपटात इतर गाणी नसली तरी पार्श्वसंगीत हे वातावरण निर्मितीला अधिक गहन करण्यास मदत करते. प्रसंगातील गंभीरता, पात्रांची वेदना, दहशतवाद्यांचे क्रौर्य, पुढे काय घडेल याची उत्सुकता ताणून धरण्यात चित्रपटाचे पार्श्वसंगीत यशस्वी ठरले आहे.
 
 
 
मैलाची दगड ठरणारी कलाकृती साकारायला नेहमीच वेळ लागतो, तसेच याही चित्रपटाबाबत घडले. सुमारे चार-साडेचार वर्ष या चित्रपटासाठी संशोधन सुरू होते. खरेतर चित्रपटाचा विषयच असा आहे की, त्याला वेगळ्या प्रमोशनची आवश्यकता नाही. परंतु, हा विषय आणखी खोल समजावा, आपल्याला आलेले अनुभव, चित्रपटात मांडता न आलेले काही प्रसंग चित्रपटविषयी चर्चासत्रात दिग्दर्शक आणि कलाकारांनी सांगितले. एवढा मोठा विषय हाताळणे नक्कीच जोखमीचे काम होते, यासाठी कुटुंबाला आपल्या टीमला विश्वासात घेणे आवशयक होते. शिवाय विषय मांडण्यात जर थोडी जरी चूक झाली तरी इतक्या वर्षांची मेहनत ही पाण्यात जाणार होती. चित्रपटाच्या संशोधनासाठी भारतातील-भारताबाहेरील ७०० पेक्षा अधिक काश्मिरी पंडित पीडितांची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) घेण्यात आली. ज्यांच्याबरोबर बसून हसतखेळत पाहुणचार केला, गप्पा मारल्या त्यांच्या आयुष्यात जे अकल्पनीय दुःख होते, ते ऐकून देखील लोकांचे डोळे ओलावत होते. आपल्या आठवणी सांगताना काश्मिरी पंडितांच्या डोळ्यात आलेले यावेळचे पाणी, भोगलेल्या दुःखाचे नव्हते, तर आजपर्यंत कुणी त्यांची विचारपुसच केली नव्हती, असे पल्लवी जोशी यांनी सांगितले. अशी चर्चासत्र होणे आवश्यक असते. कारण, यातून आपल्याला दिग्दर्शकाचा, कलाकारंचा दृष्टिकोन जवळून अनुभवताही येतो. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट आजचा सर्वात यशस्वी - ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. सुरुवातीस या चित्रपटास अवघे ४०० ते ५०० चित्रपटगृहे उपलब्ध होती. परंतु, एका आठवड्याच्या आतच पाच हजारांहून अधिक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट ‘हाऊसफुल’ आहे. राष्ट्रप्रेमी सर्वांना वंदना म्हणून चित्रपटगृहाबाहेर, आत, सोशल मीडियामधून ‘वंदे मातरम्!’ ‘भारतमाता की जय!’ ‘ जहा हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा हैं!’ असे नारे गुंजत आहेत .
 
 
 
भारताच्या प्रत्येक नागरिकाने हा चित्रपट पाहायलाच हवा! आपल्याला गोध्रा हत्याकांड, ‘२६/११’ या सर्व घटना माहीत आहेत. परंतु, कितीतरी नागरिक, खासकरून तरुण पिढी अशी आहे, ज्यांना काश्मिरी हिंदूंचे दुःखच माहीत नव्हते, त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा कोणाला एवढी वर्षे थांगपत्ताच नव्हता, आपल्याच घरातून राज्यातून निर्दयीपणे हाकलून दिल्यानंतर भारताच्या, जगाच्या कोणत्याही भागात हे कसे आश्रितांसारखे राहिलेत, जी भूमी कलेची, साहित्याची जननी आहे, तिथे आजही मुलांना कला-साहित्याचे ज्ञान मिळवता येत नाही, सतत दहशतवादाच्या सावटाखाली त्यांना जगावे लागत आहे - हे सर्व एक भारतीय म्हणून आपल्याला माहीत असावे, यासाठी आपण हा चित्रपट नक्की बघायला हवा. ‘द काश्मीर फाईल्स’ फक्त चित्रपट नाही, ते एक धगधगते सत्य आहे! काश्मीरच्या सौंदर्यामागचे खरे रूप दाखवणारा, मन सुन्न करणारा ‘द काश्मीर फाईल्स’ हा वेगळा चित्रपट आहे हे नक्की!
 
 
 
- वेदश्री दवणे
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121