पुणे : विविध विषयांवरील वैचारिक चर्चा, कथा, माहितीचा उलगडा तज्ज्ञांनी मांडल्याने उपस्थितांना बौद्धिक आंनद झाला. ‘रमेश पतंगे साहित्य संगिती’ सोहळयात तब्बल सहा वेगवेगळया परिसंवादाच्या माध्यमातून विषय उलगडले गेले. उत्तरोत्तर वाढत जाणारा सोहळयाचा समारोप मंगळवारी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत झाला.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने आयोजित चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, येथे ‘रमेश पतंगे साहित्य संगिती’ समारोह परिसंवाद दोन दिवस रंगला. यात विविध मान्यवर आणि तज्ज्ञांनी वेगवेगळया विषयावर उहापोह केला. मंगळवारी शेवटच्या दिवशीच्या सत्रात तीन परिवसंवाद पार पडले.
या वेळी पहिल्या परिवसंवादातील भारतीय संविधान आणि आपली दृष्टि या विषयावर बोलतना विभावरी बिडवे म्हणाल्या की, संविधानाचा व्यवहारीक उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यात झाला पाहिजे. तर, आपण आपले संविधान यावर सुनंदा भगत यांनी नागरिक म्हणून प्रत्येकाने संविधान साक्षर होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
पुढे आपले मौलिक संविधान या विषयावर प्रशांत यादव यांनी संविधान ही राष्ट्राची गीता आहे म्हणून ती शाश्वत आहे, असे सांगून घटना दुरुस्ती करता येते, पण त्याची चौकट बदलता येत नाही, असे नमूद केले.त्यानंतर आपले संविधान तत्वविचार, मुल्ये, ध्येयवाद या विषयावर दिगंबर ढोकले यांनी संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा असल्याचे सांगितली.
परिसंवादाच्या पाचव्या भागात कथामृत विषयावर श्रीकांत चौगुले यांनी कथा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. तसेच, तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटन असल्याचे सांगितले. कथा लोक प्रज्ञेच्या यावर रुपाली कालेकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांच्या विविध प्रकारांच्या कथाचा विस्तृत आढावा घेतला. सांस्कृतिक भारताच्या लोककथा यावर स्मिता जोशी यांनी विचार मांडले. तर, परिसंवादाच्या सहाव्या भागात कथा गौतम बुद्धांची, तथागत आणि श्री गुरुजी, गांधी समजून घेताना या विषयावर अनुक्रमे मारुती वाघमारे, रुपाली भुसारी आणि अॅड. सतिश गोरडे यांनी विचार मांडले.