मुंबई : शिवसेनेचे आमदार स्व. रमेश लटके यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सुरु झालेल्या घडामोडींना अखेर सोमवारी भाजपच्या घोषणेनंतर ब्रेक लागला. 'रमेश लटके यांच्याप्रती सहानुभूती आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अनुसरून आम्ही या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे बावनकुळे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महाराष्ट्र भाजप आणि केंद्रीय भाजपच्या नेत्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीवरून सुरु झालेला वाद आणि त्यात फडणवीसांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा यामुळे त्यांचे आणि प्रदेश भाजपचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
काहींची पाठीमागून मदतीसाठी साद !
भाजपच्या भूमिकेविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्याकडे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती केली होती. तसेच काही मागच्या हातानी देखील मदतीसाठी आपल्याला साद घातल्याचे सूचक विधान करत फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे पाठीमागून मदतीसाठी साद घालणारे ते हात नक्की कुणाचे होते ? हे विचारू नका कारण राजकारणात सगळंच काही सांगायचं नसतं असे विधान फडणवीसांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
पटेल अपक्ष लढणार नाहीत
'केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने मुरजी पटेलांचा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके निवडून याव्यात यासाठी आमचे त्यांना समर्थन असेल. मुरजी पटेल हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते अपक्ष किंवा कुठल्याही प्रकारे ही निवडणूक लढणार नाहीत हे निश्चित आहे. ते कधीही पक्षाने घेतलेला निर्णयाच्या विरुद्ध जाणार नाहीत,' असे म्हणत मुरजी पटेल निवडणुकीच्या रिंगणातून पूर्णपणे बाहेर पडत असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
भाजप मैदानात कायम आहे आणि राहिल
महाविकास आघाडीच्या आरोपांवर बावनकुळे म्हणाले की, 'त्यांना काय आरोप करायचे ते करू द्या. पण शेवटी आमची देखील हीच भावना आहे की एक महिला ज्यांच्या आज पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्यांच्या विरोधात उमेदवार उतरवणे योग्य नाही. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती आपण पाळली पाहिजे, म्हणून भाजपने हा निर्णय घेतला आहे. भाजपने पराभवाची भीती मनात ठेऊन पळपुटी भूमिका घेतली असा आरोप विरोधक करत असले तरी त्यांना आम्ही सांगू इच्छितो की एक्कावन्न टक्के मतदानाची लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. २०२४ विधानसभेत तुम्हाला अंधेरीमध्ये त्याचा प्रत्यय येणार असून त्यात भाजप विजयी होईल हा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे भाजप पूर्वीही मैदानात होता, आजही आहे आणि कायम मैदानात सज्ज राहिल,' असा इशाराही बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.
मी पक्षादेश मानणारा कार्यकर्ता
'अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून मी माघार घेत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी मी पूर्णपणे सहमत असून यामुळे माझी कुठलीही नाराजी नाही. इथून पुढेही पक्ष मला जो आदेश देईल तो मला शिरसावंद्य असेल. मी निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेतली असल्यामुळे अपक्ष लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.'
- मुरजी पटेल, उमेदवार, अंधेरी पूर्व, भाजप
लटकेंनी मानले भाजपचे आभार
भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांनी यांनी भाजपचे आभार मानले आहेत. निवडणुकीत उमेदवार न उतरवण्याच्या भाजपच्या निर्णयाचे आपण स्वागत करत असून प्रदेश भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांचे आपण आभार मानत आहोत, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली आहे.