इंदूर : हिंदी मालिका विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूर येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून तिने आत्महत्या केली. तिच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट देखील मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून तिच्या आत्महत्येचे कारण प्रेमभंग असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अद्याप वैशालीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल अद्याप येणे बाकी आहे. वैशाली ठक्कर सारख्या एका गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्रीच्या अशा जाण्याने मनोरंजन विश्वाला तसेच तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
३० वर्षीय वैशाली 'ससुराल सिमर का' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' यांसारख्या हिंदी मालिकांमधून घरा- घरांत पोहोचली होती. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील तिची संजनाची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती. गेल्या वर्षी व्यवसायाने डेंटल सर्जन असलेल्या डॉ. अभनिंदन यांच्याशी तिचा विवाह देखील ठरला होता. मूळच्या उज्जैनच्या असलेल्या वैशाली ठक्कर हीने आपल्या अभिनयाने हिंदी मालिका विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. वैशालीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला किंवा तिच्या सुसाईड नोट मध्ये काय लिहिले आहे याची पोलिसांकडून कुठलीही स्पष्टता करण्यात आलेली नाही.
मनोरंजन विश्वातील चमकत्या सिताऱ्यांची अशी अकाली आणि दुर्दैवी एक्झिट होण्याची ही काही पहिली वेळ नाही. आजवर अनेक गुणी अभिनेते - अभिनेत्रींनी अशा प्रकारे आपले जीवन संपवण्याचा मार्ग पत्करला आहे. प्रत्युषा बॅनर्जी, जिया खान, संदीप नहर यांच्यासारखे अनेक गुणी कलाकारांनी अशा प्रकारे जीवन संपविले आहे. वैशाली ठक्कर हिच्या अशा प्रकारे जाण्याने एकूणच मनोरंजन विश्वातील स्पर्धा, औटघटकेची प्रसिद्धी, वलयांकितता या सर्वच गोष्टींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.