
ठाणे:बंजारा भवनासाठी नवी मुंबईत भूखंड उपलब्ध करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करणार.अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकदा शब्द दिला की, माघार नाही.हा माझा स्वभाव आहे. म्हणुनच ५० आमदार सोबत आल्याचा पुनरुच्चार करून त्यांनी, सहकारी जेव्हा संकटात असतात तेव्हा त्यांना वाऱ्यावर सोडायचे नसते.असा टोला पक्षप्रमुखांचे नाव न घेता लगावत मंत्री संजय राठोड यांची भलामण केली.
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार ठाण्यात करण्यात आला या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
ठाण्याच्या ढोकाळी हायलँड परिसरातील मैदानात झालेल्या या कार्यक्रमास अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, कर्नाटकातील खासदार डॉ उमेश जाधव, खा. डॉ. श्रीकांत शिंदे , शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के आणि बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित बंजारा समाजातील मान्यवरांनी आपल्या भाषणात समाजाच्या विविध समस्या मांडल्या. तसेच देशभरात १२ ते १४ कोटी बंजारा समाज असला तरी देशाच्या या समाजाचे कुठेही बंजारा भवन नसल्याने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वास्तू नसल्याची खंत बोलुन दाखवली. त्यावर, बोलताना भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी, नवी मुंबईत बंजारा समाजासाठी भुखंड उपलब्ध करणार असल्याची ग्वाही दिली.
एकदा शब्द दिला कि माघार नाही - मुख्यमंत्री
एकदा शब्द दिला कि कधी मागे फिरत नाही हा माझा स्वभाव आहे. असे स्पष्ट करून बंजारा समाजाला न्याय देण्याचे काम हे सरकार करेल, तीन महिन्यात ६०० अध्यादेश, ७२ मोठे निर्णय घेतले, शेतकऱ्यांसाठी कृती आराखडा, असंघठीत कामगारांसाठी मोठा निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर बंजारा समाजासाठी तांडा वस्ती विकास, ऊसतोड कामगार प्रश्न, पोहरा देवीचे बंद पडलेले काम तत्काळ सुरु करणार, तसेच सेवालाल महाराजांच्या जयंतीला सुट्टी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.